सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फुलांवर फिरवला नांगर

एका एकरातील झेंडूतून दिड लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. पण कोरोनामुळे मंदिरे, कार्यक्रम, लग्न, यात्रा बंद झाल्याने फूलांना मागणीच राहिली नाही. परिणामी दीड महिना शेतातच फुले वाळली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. - हणमंतराव माळी, फुल उत्पादक शेतकरी, उंडाळे, जि. सातारा.
लॉकडाउनमुळे मागणी नसल्याने दोन महिन्यांपासून शिवारात फुले वाळत होती. मार्केटची आशा मावळल्याने शेतकऱ्यांनी फुलांवर नांगर फिरवला.
लॉकडाउनमुळे मागणी नसल्याने दोन महिन्यांपासून शिवारात फुले वाळत होती. मार्केटची आशा मावळल्याने शेतकऱ्यांनी फुलांवर नांगर फिरवला.

कऱ्हाड, जि. सातारा ः लॉकडाउनमुळे फुले बाजारपेठेत येत नाहीत. त्यामुळे गेल्या महिना-दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतातच फुले सडत आहेत. आज ना उद्या हे लॉकडाउन संपेल या आशेवर शेतकरी होते. मात्र कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आता लॉकडाउन लवकर संपण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता लाखो रुपयांचा तोटा सोसून नाईलाजाने काळजावर दगड ठेवत फुलांवर नांगर, रोटाव्हेटर फिरवण्यास सुरुवात केली आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकरी आता शेत मोकळे करु लागले आहेत. फुलांसाठी केलेला उत्पादन खर्चही भरुन न निघाल्याने फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

सातारा जिल्ह्यातील शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत नवीन पिके, फुले, फळांचे उत्पादन घेत आहेत. त्यातून त्यांना चांगले पैसे मिळत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मार्च, एप्रिल, मे महिन्यात लग्नाचा हंगाम, जत्रा-यात्रा, सण, उत्सवाचे औचित्य साधुन त्यापुर्वी तीन महिने फुलांची लागवड केली होती. आता ती फुले मार्केटमध्ये येण्याची वेळ आणि लॉकडाउनची वेळ एकच आली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर हे नवीनच संकट उभे राहिले. फुलांचा हंगाम ऐन भरात आला आणि कोरोनाने डोकं वर काढलं. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी त्यामध्ये अडकला. सुमारे दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या या लॉकडाउनमुळे फुले शेतातच सडत पडली आहेत.

प्रशासनाने शहरातील फुलांची दुकाने, मार्केटमधील फुलांचे व्यवहारच बंद केले. त्यामुळे फुलांना व्यापाऱ्यांकडून मागणीच होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांनी फुलांवर नांगर फिरवण्यास सुरुवात केली आहे. मात्र फुलांसाठी काढलेले कर्ज, हातउसने घेतलेले पैसे, मशागातीसाठी खर्च झालेले पैसे कशातून काढायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.   शासनाने सर्वेक्षण करुन भरपाई द्यावी सरकारने बाजारपेठेत शेतमाल आणायला परवानगी दिली. मात्र फुले आणायला दिली नाही. फुलशेती हा शेतीचाच एक भाग आहे. मात्र दुजाभाव करण्यात आला. त्यामुळे फुले बाजारपेठेत न येतात शेतातच खराब झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने घेतलेली फुले वाया गेली. त्यातून शेतकऱ्यांनाही लाखो रुपयांचा फटका बसला आहे. सरकारने, प्रशासनाने फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करुन नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com