मध्ययुगीन भारतातील शेती कशी होती?

त्यावेळी शेती उत्पन्नाच्या एक तृतीयांश दराने कर वसूल करण्यात येई आणि शेतसारावसुलीसाठी मध्यस्थांची पद्धती एवढी दृढमूल झाली होती, की सर्व प्रजा सर्वस्वी त्यांच्याच आधीन होती.
History of agriculture in Medieval India
History of agriculture in Medieval India

मोगल अमदानीचा काळ: डब्ल्यू. एच्. मोरलँड ह्या इंग्रज इतिहासकाराने केलेल्या विवेचनावरून मोगल अमदानीतील शेतीधोरणाची कल्पना येते. त्यावेळी शेती उत्पन्नाच्या एक तृतीयांश दराने कर वसूल करण्यात येई आणि शेतसारावसुलीसाठी मध्यस्थांची पद्धती एवढी दृढमूल झाली होती, की सर्व प्रजा सर्वस्वी त्यांच्याच आधीन होती. त्यांनाही नेमणुकीची शाश्वती नसल्यामुळे आपल्या कारकीर्दीत जास्तीत जास्त नफा पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्‍न असे व त्यामुळे शेतकारी लुबाडला जाई. साहजिकच एकंदर वातावरण कृषिविकासास फारसे पोषक नव्हते.

ब्रिटिश काळ: ब्रिटिश अमदानीत भारतीय शेतीत जे स्थित्यंतर झाले, त्याचे मूलभूत घटक जमीनधारा पद्धतीमधील बदल व शेतीचे वाणिज्यीकरण हे आहेत. जमीनदारी व रयतवारी अशा दोन प्रमुख धारापद्धती ब्रिटिशांनी चालू केल्या. पहिलीत कायम धाऱ्‍याची व तात्पुरत्या धाऱ्‍याची, असे दोन प्रकार होते. कायम धाऱ्‍याची पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिसने १७९३ साली बंगालमध्ये चालू केली. मोगल अमदानीतील सारा गोळा करणारे जे अंमलदार होते, त्यांना जमिनीचे मालक ठरविण्यात आले. त्यांना जमिनीमधून जो सारा मिळे, त्याच्या १०/११ भाग त्यांनी सरकारात भरावा, असा करार करण्यात आला व ही रक्कम कायम ठरविण्यात आली. हीच पद्धत पुढे बनारस, उत्तर मद्रास व दक्षिण मद्रासचा काही भाग यांना लागू करण्यात आली. धारा कायम केल्याने सरकारचे नुकसान होऊ लागले. म्हणून पुढे तात्पुरत्या धाऱ्‍याची पद्धत सुरू करण्यात आली. तीत जमीनदाराने भरावयाची रक्कम सरकारला कमीजास्त करता येईल, अशी सोय होती. शेतकऱ्‍यांच्या दृष्टीने पाहता दोन्ही पद्धती शेतीला बाधक ठरल्या, कारण मध्यस्थांच्या साखळीमुळे शेतकऱ्‍यांवरचे खंडाचे ओझे वाढत गेले.

दक्षिण मद्रास, मुंबई वगैरे प्रांतांतून रयतवारी पद्धती चालू करण्यात आली. या पद्धतीत प्रत्येक जमीनधारकाचा सरकाराशी प्रत्यक्ष संबंध जोडून देण्यात आला व त्यांच्याकडून सरकार आपल्या अधिकाऱ्‍यांमार्फत सारा गोळा करू लागले. या पद्धतीत जमीनधारकाकडे संपूर्ण मालकी हक्क नसून कबजेदारीचा हक्क असतो. त्याला जमिनीचे हस्तांतर करता येत असले, तरी त्याने सारा भरला नाही, तर जमीन सरकारकडे जाते. सारा ठरविणाऱ्‍या अधिकाऱ्यांना अमर्याद सत्ता प्राप्त झाली आणि साऱ्‍याचे दर चढू लागले. त्यामुळे शेतीच्या प्रगतीला फारसा हातभार लागला नाही.

नव्या भौगोलिक शोधांमुळे व सुरू झालेल्या जलमार्गांमुळे सोळाव्या शतकाच्या सुरुवातीलाच जगात व्यापारी क्रांती घडून आली. सतराव्या शतकात पाश्चात्त्य देशांतील व्यापारी कंपन्यांमार्फत भारताचा इतर देशांशी मोठ्या प्रमाणावर व्यापार सुरू झालेला होता. पण हा व्यापार विशेषतः किनारपट्टीच्या क्षेत्रापुरता मर्यादित होता. या बाबतीत महत्त्वाचे परिवर्तन ब्रिटिश अमदानीत आणि विशेषतः एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घडून आले. इंग्‍लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रारंभ झालेला होता व नव्या उद्योगधंद्यांना कच्च्या मालाची अधिकाधिक गरज भासू लागली होती.

क्रमशः

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com