औरंगाबाद : शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असलेल्या मराठवाड्यातील पांढऱ्या सोन्याच्या क्षेत्राला यंदा ग्रहण लागले आहे. किमान चार ते पाच वेचण्या व किमान आठ ते दहा क्विंटल एकरी उत्पादन होणारी कपाशी दुसऱ्या वेचणीतच उलंगवाडीच्या उंबरठ्यावर आहे. अवेळी व सतत पाऊस, धुई, पानगळ, लाल पडलेली पाने आदींमुळे झाडांची अन्नद्रव्य तयार करण्याची क्रिया थांबली. त्यामुळे यंदा निम्म्यापेक्षा जास्त उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कापसात कवडीचे प्रमाणही असल्याचे चित्र मराठवाड्यात आहे.
औरंगाबाद व लातूर कृषी विभागांतर्गत आठ जिल्ह्यात १७ लाख ७६ हजार हेक्टरवर कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्या तुलनेत यंदा मराठवाड्यात १५ लाख ६५ हजार ९८८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये आलेल्या पावसाने काही भागातील कपाशीच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु, ऑक्टोबरमध्ये जवळपास पंधरवड्यापेक्षा जास्त काळ सतत पाऊस झाला. त्यामुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले. सुमारे १४ लाख ६६ हजार हेक्टरवरील कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांना फटका बसला. जमिनीतील नत्र वाहून गेले. ते पिकाच्या मुळाच्या कक्षेच्या खाली जाऊन बसले.
मॅग्नेशिअमची कमतरता व दहिया रोगाचा प्रादुर्भाव, यामुळे झाडावर पात, फुले, बोंड असतानाच अन्नद्रव्याची कमतरता भासली. त्यामुळे विविध रोगांना पोषक वातावरण निर्माण झाले. कपाशीची पाते व पानगळ झाली. अनेक भागांत लालसर पडलेल्या कपाशीच्या पिकाला जेवढी बोंडे आधी पोसली गेली, तेवढीच उत्पादन देऊन गेली. उर्वरित अन्नद्रव्य न मिळाल्याने पोसण्यापूर्वी फुटली. कापसाच्या उत्पादनात कवडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. त्याचा थेट फटका उत्पादनात बसला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.