सोलापूर : राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पीक व फळबाग विम्यासाठी शेतकरी मोर्चे काढतात, उपोषण करतात. शेतकऱ्यांसाठी राजकीय पक्ष व त्यांचे कार्यकर्तेही मैदानात उतरतात. या सर्व पर्यायांवर सोलापूर जिल्ह्याने मात केली आहे. प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्याने पुढाकार घेतला, तर जटिल प्रश्नही सुटू शकतात, याचे उत्तम उदाहरण सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील तब्बल ५०२ शेतकऱ्यांना फळपीकविमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. भोसले यांच्या पुढाकारातून ५ कोटी ७८ लाख रुपये अखेर मिळाले आहेत.
द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक म्हणून सोलापूरची राज्यात ओळख आहे. हवामान आधारित फळविमा योजनेतून २०१८ च्या मृग बहरात जिल्ह्यातील १९ हजार शेतकऱ्यांनी ११७ कोटी रुपयांचा फळविमा उतरविला. या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला. जवळपास ५०२ शेतकऱ्यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले. अशा शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम बॅंकेने कपात केली. परंतु, विमा कंपनी टाटा एआयजीकडे जमा केली नाही. या शेतकऱ्यांना विमा कंपनीही दाद देत नव्हती. बॅंक विमा कंपनीकडे बोट दाखवत असल्याने शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करायला सुरुवात केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विमा योजनेसाठी तक्रार निवारणासाठी जिल्हा स्तरावर समितीच्या माध्यमातून या प्रश्नाला वाचा फोडण्यात जिल्ह्याला यश मिळाले. शेतकऱ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना वेठीस धरणाऱ्या बॅंकेवर गुन्हे दाखल करण्याची आणि त्यांच्याकडून व्याजासहित पैसे वसूल करण्याचे आदेश डॉ. भोसले यांनी दिले. डॉ. भोसले यांनी घेतलेल्या निर्णयाचा व दिलेल्या आदेशाचा पाठपुरावा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक रवींद्र माने यांनी केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.