भारतात भात लागवड घटल्यामुळे जागतिक अन्न संकटात भर पडण्याची शक्यता आहे. जगातील एक प्रमुख भात उत्पादक देश म्हणून भारताकडे बघितलं जातं. बांगलादेश, चीन, नेपाळ, मध्य पूर्वेतील देशांसह सुमारे १०० देशांना भारताकडून तांदूळ पुरवण्यात येतो.
अनेक देशांची अन्नसुरक्षा भारताच्या तांदळावर अवलंबून आहे. मात्र यावर्षी मॉन्सूनच्या सुरूवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे भाताचे क्षेत्र घटले. गेल्या तीन वर्षांतील सगळ्यात कमी भात लागवड यंदा झाली. त्यामुळे तांदूळ उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.
जागतिक बाजारात धान्याच्या किंमती वाढत असताना भारतात तांदूळ उत्पादन घटण्याच्या शक्यतेने चिंता वाढली आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा यांसारख्या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांत पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे देशातील एकूण भात लागवड क्षेत्रात आतापर्यंत १३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.
बांगलादेशातून तांदळाची मागणी वाढली आहे. सध्या वाहतूक खर्चासह प्रति टन ३६५ डॉलर दराने तांदूळ निर्यात होत आहे. सप्टेंबर अखेरीस निर्यात दर प्रति टन ४०० डॉलरवर पोहचण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारातही तांदूळ उत्पादनातील संभाव्य घटीचे पडसाद उमटले आहेत. तांदळाचे काही प्रकार १० टक्क्यांनी महागले आहेत.
भारताच्या तांदूळ उत्पादन घटले तर देशांतर्गत महागाईसोबत दोन हात करणे अवघड जाणार आहे. याशिवाय निर्यातीवरही मर्यादा येणार असल्याची भीती व्यापारी सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
भारतातील तांदूळ उत्पादनाचे भवितव्य आता येत्या दोन महिन्यांतील पावसावर अवलंबून आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरी पाऊस होऊन भात लागवडीतील घट भरून निघेल, असा आशावाद काही कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.