अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविणारी जिवाणू संवर्धके

नत्र,स्फुरद आणि इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी जिवाणू संवर्धके फायदेशीर ठरतात. रासायनिक खतांची अंशतः गरज भागविण्यासाठी जिवाणू संवर्धनाचा वापर करणे महत्त्वाचा आहे.
जिवाणू संवर्धकाच्या प्रक्रियेमुळे भुईमुगाची चांगली वाढ होते.
जिवाणू संवर्धकाच्या प्रक्रियेमुळे भुईमुगाची चांगली वाढ होते.

नत्र,स्फुरद आणि इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी जिवाणू संवर्धके फायदेशीर ठरतात. रासायनिक खतांची अंशतः गरज भागविण्यासाठी जिवाणू संवर्धनाचा वापर करणे महत्त्वाचा आहे. वातावरणात सुमारे ७८ टक्के मुक्त नत्र वायुरुपात अस्तित्वात आहे. या मुक्त नत्राचा उपयोग स्वतः:करिता करून घेण्याची क्षमता फक्त कडधान्य पिके आणि द्विदल तेलबिया पिकांमध्ये आहे. कारण या पिकांच्या मुळांवरील गाठीमध्ये रायझोबियमचे सूक्ष्म जिवाणू असतात. हे जिवाणू वातावरणातील नत्र शोषून मुळांच्या गाठीमध्ये एकवटून विकराच्या मदतीने मुक्त नत्राचे रूपांतर रासायनिक नत्र (अमोनिया,नायट्रेट) खतामध्ये करतात आणि पिके त्यांचा उपयोग करतात. ही नत्रस्थिरिकरणाची प्रक्रिया सहजीवी असून पिके अमोनियाचे शोषण करतात आणि त्या मोबदल्यात रायझोबियम जिवाणूस अन्न आणि खनिजे पुरवितात. सूक्ष्म जिवाणूंनी स्थिर केलेल्या नत्रापैकी ९० टक्के नत्र उभ्या पिकांना उपलब्ध होते. पीक काढणीच्या वेळी मुळांवरील गाठी जमिनीत राहात असल्याने सुमारे १० टक्के नत्र जमिनीत मिसळून जाते. हे नत्र दुसऱ्या पिकास उपयोगी पडते. यासाठी कडधान्य पिकांच्या मुळांच्या सानिध्यात असलेल्या जमिनीत रायझोबियम या सूक्ष्म जिवाणूंची संख्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. रायझोबियम जिवाणू अतिशय कार्यक्षम असून त्यांच्या वापराने हेक्टरी २५ ते ३० टक्के पीक उत्पादनात वाढ दिसून येते. रायझोबियम जिवाणूंचे त्यांच्या उपयुक्ततेच्यादृष्टीने सात गट पाडले आहेत. एका गटाचे जिवाणू दुसऱ्या गटाला उपयोगी पडत नाहीत. त्यामुळे बियाणाला जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करताना ते कोणत्या गटाचे आहे हे पाहणे आवश्यक आहे. या सात गटातील रायझोबियम जिवाणूंची नत्र स्थिरीकरणाची क्षमता भिन्न आहे. एका वर्षात सुमारे ४० ते १६० किलो नत्र प्रति हेक्टरी स्थिर करण्याचे कार्य होते. रायझोबियम जिवाणूंचे गट  

गट पिके
वाटाणा गट वाटाणा, मसूर, लाख
घेवडा गट श्रावण घेवडा व इतर घेवडे
बरसीम गट बरसीम घास
अल्फा अल्फा गट लसूणघास, मेथी
हरभरा गट हरभरा
सोयबीन गट सोयबीन
चवळी गट चवळी, भुईमूग, तूर, उडीद,मुग, वाल, मटकी, गवार, ताग, बोरू इ.

प्रत्येक गटाप्रमाणे जिवाणू संवर्धन बियाणास प्रक्रिया केल्यास भरपूर प्रमाणात नत्र स्थिर केले जाते. नत्र खताची बचत होते. रायझोबियम जिवाणू संवर्धनामुळे पिकांच्या नत्र स्थिरीकरण क्षमतेत आणि उत्पादनात वाढ होते. रायझोबियम जिवाणूचा उत्पादनावर परिणाम रायझोबियम जिवाणू संवर्धक काही संजीवके आणि जीवनसत्त्व पिकांना पुरवितात. उदा. इंडॉल अॅसिटिक अॅसिड . रायझोबियम जिवाणू संवर्धक रासायनिक खतांपेक्षा स्वस्त असून त्याच्या सतत वापरामुळे जमिनीची प्रत सुधारते. स्फुरद जिवाणू संवर्धक 

  • नत्राच्या बरोबरीने पिकांना वाढीसाठी स्फुरदाची आवश्यकता आहे.
  • स्फुरद हे अन्नद्रव्य सुपर फॉस्फेटच्या स्वरूपात पिकांना दिले जाते. यामध्ये उपलब्ध स्वरूपाचा स्फुरद असतो. पिकाच्या अधिक उत्पादनासाठी नत्र व स्फुरद खतांच्या मात्रा ही अधिक लागतात. विशेषत: कडधान्य पिकांच्या उत्पादन वाढीत नत्रापेक्षा स्फुरद खतांचा वापर जास्त प्रमाणात करावा लागतो.
  • स्फुरदामुळे वनस्पतीमध्ये कर्बोदके तयार करण्याची क्रिया जलद होऊन रोपे किंवा झाडांची वाढ चांगली होते. वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याची क्रिया गतीने होण्यास साहाय्य होते. पिकांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते.
  • पिकांमध्ये फुलोरा येण्याचे प्रमाण व फळाचे प्रमाण वाढून धान्य उत्पादनात लक्षणीय वाढ होते. फळाची व अन्नधान्याची प्रत वाढण्यास स्फुरदाची आवश्यकता असते.
  • जो स्फुरद उपलब्ध स्वरूपात पिकांना सुपर फॉस्फेटच्या स्वरूपात देतो तो पिकांना सर्वच्या सर्व उपलब्ध होईल असे नाही. जमिनीत वापरलेल्या स्फुरादापैकी फक्त २० ते २५ टक्केच स्फुरद पिकांना वापरता येऊ शकतो, बाकीचा ७५ ते ८० टक्के स्फुरद मातीच्या कणांवर स्थिर होतो. तो पिकांना त्वरित उपलब्ध होत नाही. यासाठी स्फुरद विरघळविण्याच्या जिवाणूंचा वापर फायदेशीर ठरतो.
  • हे जिवाणू जमिनीतील घट्ट स्वरूपातील स्फुरदाचे विघटन करून त्याचे पाण्यात विरघळू शकणाऱ्या द्राव्य स्वरूपात रूपांतर करतात.
  • जमिनीतील स्फुरद विरघळणाऱ्या आणि ते पिकास उपलब्ध करून देणाऱ्या कार्यक्षम अशा स्फुरद जिवाणूंची प्रयोगशाळेत कृत्रिम रीतीने वाढ करून योग्य अशा माध्यमात मिसळून त्यापासून स्फुरद जिवाणूंचे जैविक खत तयार केले जाते.
  • कडधान्य पिकात स्फुरद जिवाणूंची उपयुक्तता अधिक आढळून आलेली आहे. कडधान्य पिकाच्या बियांची उगवण चांगली होते, रोपांची वाढ जोमाने होते. त्यामुळे कडधान्य पिकाचे जमिनीतील स्फुरद घेण्याचे प्रमाण वाढते. जमिनीतील पाण्यात विरघळणाऱ्या व पिकास उपलब्ध असणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण वाढते. कडधान्य पिकांना उपयुक्त अशा रायझोबियम जिवाणूंची कार्यक्षमता वाढते. कारण त्यांना नत्रस्थिरीकरण करण्यासाठी लागणारा स्फुरद पिकांची मुळे स्फुरद जिवाणू संवर्धक वापरले असता अधिक प्रमाणात शोषून घेऊ शकतात. रासायनिक खताद्वारे जमिनीत दिलेला स्फुरद कडधान्य पिकांना जास्त प्रमाणात उपलब्ध केला जातो आणि पर्यायाने रासायनिक स्फुरद खतांचा पुरेपूर उपयोग पिकांना होऊ शकतो.
  • जिवाणू संवर्धक वापरताना घ्यावयाची काळजी

  • विविध कडधान्य गटांसाठी वेगवेगळे जिवाणू संवर्धक वापरावे.
  • संवर्धकाच्या पिशवीवरील अंतिम तारखेपूर्वी जिवाणू संवर्धक वापरावे. पाकिटे सावलीत ठेवावीत.
  • कीटक नाशके, बुरशी नाशके, तण नाशके व कोणत्याही रासायनिक खतांमध्ये जिवाणू संवर्धक मिसळून नये.
  • दर दिवशी जेवढे बियाणे पेरणीस लागेल तेवढ्याच बियाण्याला प्रक्रिया करावी.
  • जिवाणू संवर्धक दिल्यानंतर जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे.
  • जिवाणू संवर्धक ज्या पिकासाठी शिफारस असेल त्याच पिकासाठी वापरावीत.
  • सर्व साधारण पिकांसाठी २५० ग्रॅम जिवाणू संवर्धकाची प्रति १० ते १५ किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
  • रायझोबियम जिवाणू संवर्धकाचा वापर 

  • प्रती दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धक वापरावे.
  • पहिल्यांदा बियाणे दहा मिनिटे पुरेशा पाण्यात भिजवावे.एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन उकळून द्रावण थंड होऊ द्यावे. चिकट झाल्यानंतर त्या द्रावणाच्या साहाय्याने जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. यासाठी भिजवलेले बियाणे बारदाना किंवा ताडपत्रीवर पसरून त्यानंतर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
  • सर्व बियाण्यास संवर्धक सारख्या प्रमाणात लागेल याची काळजी घ्यावी. बियाणे सावलीत वाळवावे. शक्य तितक्या लवकर पेरावे.
  • द्रवरूप जिवाणू खते वापरावयाच्या पद्धती आणि मात्रा  बीज प्रक्रिया 

  • नत्र स्थिर करणारे आणि पीएसबी जिवाणू संवर्धक प्रत्येकी १०० मि.लि. प्रती दहा किलो बियाण्यास सारख्या प्रमाणात लावून लगेच पेरणी करावी.
  • सोयाबीन, भुईमूग या सारख्या बियांवर पातळ आवरण असलेल्या पिकांसाठी प्रत्येकी ५० मिलि प्रती दहा किलो बियाण्यास जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
  • माती प्रक्रिया एक एकरासाठी नत्र स्थिर करणारे व पीएसबी जिवाणू प्रत्येकी १ लिटर प्रति ४०० किलो बारीक चाळलेले शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये मिसळून पेरणी पूर्वी किंवा पेरणी करते वेळी दुचाडी पाभरीतून पेरावे. ठिबक सिंचनाद्वारे वापर  नत्र स्थिर करणारे व पीएसबी जिवाणू संवर्धक प्रत्येकी १ लिटर प्रती एकरासाठी व्हेंन्चुरी टँकमध्ये मिसळून ठिबक सिंचनाद्वारे पिकास द्यावे. उभ्या पिकास पिकाच्या मुळाभोवती देणे  एक एकर क्षेत्रासाठी नत्र स्थिर करणारे आणि पीएसबी जिवाणू संवर्धक प्रत्येकी १ लिटर हे १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी पंपाचा नोझल काढून रोपाच्या जवळ सकाळी किंवा संध्याकाळी फवारावीत. जिवाणू संवर्धकाचे फायदे 

  • जैविक खतामुळे जमिनीची सुपीकता वाढून पोत सुधारतो, जमीन जैविक क्रियाशील बनते व उत्पादन क्षमतेत वाढ होते.
  • मुळांच्या संख्येत व लांबीमध्ये भरपूर वाढ झाल्यामुळे खोलवर असणारी अन्नद्रव्ये आणि पाणी पिकास उपलब्ध झाल्यामुळे उत्पादन वाढ दिसते.
  • जमिनीत प्रतिजैविके सोडल्यामुळे पिकांची रोग व कीड प्रतिकारक शक्ती वाढते. पीक संरक्षण खर्चाची बचत होते.
  • दुबार पेरणीसाठी उपयुक्त नत्र साठा शिल्लक राहतो.
  • धान्यांचा दर्जा सुधारतो, पिकाचे उत्पादन साधारणपणे १५ ते ३० टक्यांपर्यंत वाढते.
  • संपर्क: डॉ. दीपाली कांबळे,९३०७१६३९३९ (कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ , परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com