जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची पिके

जास्त प्रमाणात रासायनिक खतांच्या वापराचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. रासायनिक खतांच्या बरोबरीने सेंद्रिय खतांचा वापरही तितकाच आवश्यक आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची खतपिके फायद्याची ठरू शकतात.
green manure crops helps to fertilize the soil
green manure crops helps to fertilize the soil

जास्त प्रमाणात रासायनिक खतांच्या वापराचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. रासायनिक खतांच्या बरोबरीने सेंद्रिय खतांचा वापरही तितकाच आवश्यक आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची खतपिके फायद्याची ठरू शकतात. मातीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी हिरवळीची पिके उपयुक्त असतात. हिरवळीच्या पिकांची मिश्रपीक, आंतरपीक किंवा मुख्य पीक म्हणूनही लागवड करता येते. जमिनीचा पोत टिकवणे आणि उत्पादन वाढीसाठी हिरवळीच्या खतांना फार महत्त्व आहे. रासायनिक खतांच्या अयोग्य आणि अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता कमी होत चालली आहे. रासायनिक खतांना पर्याय म्हणून सेंद्रिय खतांचा वापर फायदेशीर ठरतो. हिरवळीच्या खतांचे प्रकार  शेतात लागवड करण्यायोग्य हिरवळीची पिके  ज्या शेतात हिरवळीचे खत गाडावयाचे आहे, तिथेच या हिरवळीच्या पिकांची लागवड केली जाते. हे पीक फुलोऱ्या येण्यापूर्वी नांगरट करून जमिनीत गाडतात. किंवा मुख्य पिकासोबत आंतरपीक म्हणूनही यांची वाढ करून ती जमिनीत गाडली जातात. उदा. धैंचा, चवळी, मूग, गवार, मटकी, वाटाणा व उडीद इ. हिरव्या कोवळ्या पानांचे खत  या पद्धतीत वनस्पतीची हिरवी कोवळी पाने, फांद्या यांचा वापर केला जातो. अशा झाडांची लागवड बांधावर करून किंवा परिसरातील जंगलातून फांद्या व पाने गोळा करून शेत नांगरणी किंवा चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडतात. उदा. शेवरी, गिरिपुष्प, सुबाभूळ, करंज, टाकळा आणि हदगा इ. हिरवळीच्या खतांसाठी उपयोगी पिके  ताग 

  •  ताग हे हिरवळीचे उत्तम खत आहे. ज्या विभागात पुरेसा पाऊस किंवा सिंचनाच्या पाण्याची हमी असते तेथे तागाचे पीक घ्यावे. सर्व प्रकारच्या जमिनीत या खताची वाढ चांगली होत असली तरी आम्लधर्मीय जमीन, तसेच पाणी साचून राहणाऱ्या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही.
  •  पावसाळ्याच्या सुरुवातीस हेक्टरी ७५ किलो तागाचे बी पेरावे. पीक १ ते २ मीटर उंच वाढण्याकरिता ६ ते ८ आठवड्यांचा कालावधी पुरेसा आहे.
  •  मातीमध्ये ओलावा अधिक असल्यास ताग पीक लवकर कुजते.
  • चवळी 

  •  चवळी, कुळीथ, जंगली इंडिगो आणि तूर ही पिके काही प्रमाणात हिरवळीच्या खतासाठी वापरली जातात. ही द्विदलवर्गीय पिके असून मुळांवर गाठी असतात. त्यामुळे जमिनीत नत्र स्थिरीकरण चांगले होते.
  •  हे पीक उन्हाळी व पावसाळी हंगामात घेता येते. लागवडीसाठी हलकी ते मध्यम काळी जमीन निवडावी. पेरणीसाठी हेक्टरी ३५ किलो बियाणे वापरावे.
  • धैंचा 

  •  जास्त क्षारयुक्त किंवा अधिक ओलावा धरून ठेवणाऱ्या जमिनीत देखील हे पीक जोमाने वाढते.
  •  या पिकापासून उत्तम प्रकारचे हिरवळीचे खत तयार होते.
  •  या वनस्पतीच्या मुळांवर आणि खोडावर गाठी असतात. या गाठींमधील जिवाणू नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतातत.
  •  हे पीक खरीप आणि उन्हाळी हंगामात घेतले जाते. लागवडीसाठी हेक्टरी ४५ किलो बियाणे पुरेसे आहे.
  • गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) 

  •  ही वनस्पती कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये आणि वेगवेगळ्या पर्जन्यमानाच्या प्रदेशात उत्तमरीत्या येते.
  •  ताग आणि धैंचाच्या तुलनते या झाडाच्या पानांमध्ये नत्राचे प्रमाण जास्त म्हणजेच २.९ टक्के इतके असते.
  • झाडाच्या फांद्याची वरच्यावर छाटणी करून नवीन फूट येते. आणि हिरव्या पालवीपासून उत्तम हिरवळीचे खत मिळते. गिरिपुष्पाची पाने इतर वनस्पतीच्या तुलनेत जलद कुजतात. त्यामुळे एक आठवड्यामध्ये पिकास खत उपलब्ध होते.
  • हिरवळीचे पिके लागवड तंत्र  लागवडीसाठी योग्य वेळ  मृगाचा पहिला पाऊस पडल्यानंतर हिरवळीच्या पिकाची पेरणी करावी. ही वेळ प्रदेशनिहाय वेगळी असू शकते. पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. त्यामुळे पिकाची उगवण आणि वाढ जोमाने होते. जमिनीत गाडण्याची योग्य वेळ  हिरवळीचे पीक फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावे. साधारणपणे पेरणीनंतर ६ ते ८ आठवड्यांमध्ये पीक फुलोऱ्यात येते. हिरवळीचे पिके गाडल्यानंतर मुख्य पिकांची पेरणी  जमिनीमध्ये पिकांना कुजण्यासाठी किती वेळ लागतो, यावर मुख्य पिकांच्या पेरणीचे नियोजन करावे. हलक्या जमिनीमध्ये योग्य आर्द्रता असताना हिरवळीची पिके गाडल्यानंतर २ ते ७ दिवसांनी मुख्य पिकाची पेरणी करावी. हिरवळीच्या पिकांनी निवड 

  •  पीक शेंगवर्गीय असावे.
  •  पीक हलक्या किंवा मध्यम जमिनीत वाढण्यायोग्य असावे.
  • पिकाची पाण्याची आवश्यकता कमी असावी.
  • वनस्पतींमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असावे. जेणेकरून त्याचे विघटन लवकर होईल.
  • हिरवळीचे पीक १ ते दीड महिन्यात फुलोऱ्यात येणारे असावे. पीक गाडून कुजल्यानंतर पुढील पीक घेता येईल.
  • हिरवळीच्या खतांचे फायदे 

  •  जमिनीची धूप कमी होते.
  •  पीक उत्पादनात चांगली वाढ होते.
  • जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
  • जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते.
  • मातीच्या रचनेत सुयोग्य बदल होऊन जलधारणाक्षमता वाढते.
  • जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात बदल होतो.
  • - संजय बडे, ७८८८२९७८५९ (सहायक प्राध्यापक, कृषी विद्या-दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव, जि. औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com