परसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील सदस्यांची संख्या यावर अवलंबून असते. गरजेनुसार भाजीपाला लागवडीसाठी वाफे आणि गरजेप्रमाणे सरी वरंबे करावेत.परसबागेच्या कुंपणाच्या बाजूला फळझाडे लावावीत. प्रत्येक कुटुंबाने समतोल आहार व पोषण तत्त्वे समजून घेणे महत्त्वाचे आहे. समतोल आहारामध्ये प्रत्येक व्यक्तींची गरज, शारीरिक कार्याचे स्वरूप लक्षात घेऊन पोषक घटक उपलब्ध होतात. अन्नातील रासायनिक घटक योग्य प्रमाणात आहारात घेतले असता शरीरातील सर्व कार्य सुरळीतपणे चालते, त्यास पोषणतत्त्वे म्हणतात. अन्नातील पोषणतत्त्वे आणि महत्त्वाचे अन्नघटक शरीर बांधणी गट प्रथिने समृद्ध गट- दूध, मांस, अंडी, मासे, चीज, इ. ऊर्जा गट- तृणधान्ये, कर्बोदके, तृणधान्य व त्याचे पदार्थ ः उदा. तांदूळ, गहू, नाचणी, बाजरी, ज्वारी, मका, बटाटे इ. अती समृद्ध ऊर्जा गट स्निग्ध पदार्थ- लोणी, साखर, तूप, खाद्य तेल, गूळ इ. संरक्षक गट पिवळा व नारंगी रंगाच्या भाज्या, फळे- गाजर, लाल भोपळा, पपई, आंबा, टोमॅटो, संत्रा, पेरू, मोसंबी, शेवगा पाने, हिरव्या पालेभाज्या इ. दुयम संरक्षक गट- जीवनसत्त्वे व खनिजेयुक्त भाज्या व फळे. पोषण परसबाग संकल्पना कमी खर्चात दररोजच्या गरजेपुरत्या ताज्या सकस व चवदार भाज्या घरच्या घरी मिळविण्यासाठी घराच्या अंगणात किंवा उपलब्ध जागेत पोषण परसबाग तयार करता येते. पोषण परसबाग करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी
वेलासाठी मंडप, जनावरापासून रक्षण करण्यासाठी कुंपण. आवडीनुसार भाजीपाल्याची निवड संकरित ऐवजी बियाण्यांचा वापर. उपलब्ध साधनसामग्रीचा वापर. संपूर्ण पोषणासाठी वेगवेगळ्या भाज्यांची खात्रीपूर्वक निवड सेंद्रिय भाजीपाला उत्पादन. परसबागेसाठी लागणारे साहित्य
पाण्याची निचरा होणारी जमीन कमीत कमी ५०० चौरस मिटर पाण्याची सुविधा, रूफलेन वॉटर हार्वेस्टींग टाकी पाणी देण्याचे साहित्य- झारी, पाईप,ठिबक सिंचन, तुषार सिंचन संच. शेणखत, सेंद्रिय खत- १ ट्रॉली. तळ्यातील माती २ ते ३ ट्रॉली. देशी बियाणे / रोपे आवश्यकतेनुसार. फावडे, कुदळ, खुरपी, टोपली. परसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील व्यक्तींची संख्या यावर अवलंबून असते. आयताकार चांगला दिसतो. परसबाग तयार करण्याअगोदर जागा, पाण्याची उपलब्धता असावी. चार व्यक्तींच्या कुटुंबाची दैनंदिन आहारातील भाजीपाल्याची गरज पूर्ण करण्याकरिता साधारणतः ५० फूट जागा पुरेशी असते. परसबाग तयार करताना जमीन चांगली खणून घ्यावी. दगड गोटे, लहान खुरटी रोपे काढून जमीन सपाट करावी. जमिनीत शेणखत, गांडूळखत मिसळावे. जमीन हलकी असल्यास नदीकाठची गाळाची काळी माती मिसळावी. गरजेनुसार भाजीपाला लागवडीसाठी वाफे आणि गरजेप्रमाणे सरी वरंबे करावेत. बियाणे पेरणीसाठी रोपवाटिका करावी किंवा भाजीपाल्याची रोपे कुंडीत तयार करावीत. परसबागेच्या कुंपणाच्या बाजूला फळझाडे लावावीत. उदा.लिंबू, पेरू इत्यादी. काही वेलवर्गीय भाजीपाला लावावा. उदा.दुधी भोपळा,कारली,दोडके इ. वांगे, टोमॅटो, मिरची रोपांची लागवड वाफ्यामध्ये किंवा सरी वरंब्यावर करावी. पालक, मेथी, कोथिंबिरीची गादी वाफ्यावर लागवड करावी. खरीप हंगाम जुलै ते ऑक्टोबर- भेंडी, चवळी, गवार, मिरची, दोडकी, कारली, काकडी, दुधी भोपळा, मुळा, पालक, वांगी, टोमॅटो इत्यादी. रब्बी हंगाम ऑक्टोबर ते फेब्रुवारी- बटाटा, फ्लॉवर,कोबी, मुळा, गाजर, बीट, कांदा, लसूण, पालक, मेथी, शेपू, इत्यादी. उन्हाळी हंगाम मार्च ते जून- भेंडी, चवळी, गवार, मिरची, ढोबळी मिरची, श्रावण घेवडा, कारली, काकडी, दुधी भोपळा, पालक, वांगी, टोमॅटो इत्यादी. पिकांचे व्यवस्थापन
विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड सपाट वाफे किंवा सरी वरंबा पद्धतीने करावी. रोपांची लागवड योग्य अंतरावर करावी. गरज पडल्यास विरळणी करावी. तण नियंत्रणासाठी वेळोवेळी खुरपणी करावी. पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. परसबागेतील पिकांना रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करावा. परसबागेत सेंद्रिय खत तयार करण्यासाठी एका कोपऱ्यामध्ये झाडाच्या सावलीत जागा निवडावी. ३ फूट बाय ३ फूट बाय ३ फुटाचा खड्डा करावा. यामध्ये बागेतील पालापाचोळा, वाया जाणारा भाजीपाला टाकावा. अधूनमधून त्यामध्ये शेण व पाणी टाकावे. या खड्यात गांडुळे सोडल्यास तीन महिन्यात उत्तम प्रतीचे खत तयार होते. या खताचा वापर परसबागेत केल्यास पिकाची चांगली वाढ होते. उपयुक्त जिवाणूंची वाढ होऊन जमीन सुधारण्यास मदत होईल. पीकवाढीच्या अवस्थेत सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर केला जातो. कीड नियंत्रणासाठी चिकट सापळ्यांचा वापर करावा. रोप लागवडीनंतर सुरुवातीचा काळात पाणी झारीने घ्यावे. अन्यथा वाहत्या पाण्याने रोपांच्या मुळाजवळील माती वाहून जाऊन मुळे उघडी पडू शकतात. वाढीच्या टप्यानुसार पाण्याचे नियोजन करावे. वाफसा ठेवावा. हिवाळा आणि उन्हाळ्यात पाणी देण्याची अवस्था ओळखण्यासाठी टोमॅटोची रोपे परसबागेत असणे आवश्यक आहे. पाण्याचा ताण पडताच सर्व प्रथम टोमॅटोची पाने मलूल होतात. यावेळी परसबागेला पाणी दयावे. पालेभाज्यांची सपाट वाफ्यात लागवड असल्याने जास्तीचे पाणी देऊ नये. भेंडी, वांगी, टोमॅटोची काढणीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या चिमटा आणि हातमोजाचा वापर करावा. भाजी दररोजच्या गरजे इतकी आणि स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी परसबागेतून भाजी काढणी करावी. जेणेकरून भाज्यामध्ये असलेल्या पोषक घटकांचा ऱ्हास होणार नाही. संपर्क- एस.एन.वाटाणे, ९४०४०७५३९७ (कृषी विज्ञान केंद्र, वाशिम)