हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

औरंगाबाद  : राज्यातील गावा-गावांतील रस्ते, १२ हजार कोटींच्या पाणी योजना, सारथी म्हणजेच मराठा-कुणबींना सुविधा असे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय रद्द करून तुम्ही कुणावर सूड उगवताय? हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या, आम्ही तयार आहोत, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. जे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत, ते रद्द करून काय मिळवणार आहात, असा सवालही श्री. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता केला आहे. 

औरंगाबादमध्ये सोमवारी (ता. ९) भाजपची विभागीय आढावा बैठक झाली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासह माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, बाल हक्‍क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, माजी राज्यमंत्री अतुल सावे, प्रदेश प्रवक्‍ते शिरीष बोराळकर, आमदार सुरजितसिंह ठाकूर उपस्थित होते.

बैठकीपूर्वी बोलताना श्री. पाटील यांनी सरकारच्या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्या ठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, सरकार ‘सारथी’सारख्या संस्थेची स्वायत्तता काढून घेते. थोडक्यात काय तर त्यांना काहीच करायचे नाही, असे श्री. पाटील या वेळी म्हणाले.

भाजपने विकासासाठी निवडणुका लढल्या आहेत. शिवसेनेसोबत ३५ वर्षे महापालिकेत होतो. आता शिवसेना महाआघाडीसोबत गेल्यामुळे पाच महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढेल. सर्वसामन्यांना जे सरकार हवे ते सरकार आणण्यासाठी स्वाभाविकपणे लोकांचे सेवक होणे ही आमची जबाबदारी असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

जानेवारीत राज्याध्यक्षांची निवड भाजपच्या तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. आजवर सगळ्या निवडणुका रेंगाळल्या होत्या. त्याला गती देण्यासाठी राज्यात विभागनिहाय संघटनात्मक आढावा घेत आहोत. राज्यातील भाजपच्या सोयीने संघटनात्मकदृष्टया ७० जिल्हे करण्यात आले आहे. यात मराठवाड्यात १२ जिल्हे करण्यात आले आहे. त्यांच्या निवडणुका ३० डिसेंबरपुर्वी पूर्ण होणार आहे. यानंतर १ ते ५ जानेवारी दरम्यान राज्याचा अध्यक्ष त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

आजारी असल्याने पंकजा मुंडे अनुपस्थित पंकजा मुंडे बैठकीला का आल्या नाहीत असे विचारल्यानंतर, बैठकीला येत असताना पंकजा मुंडे यांच्याशी बोलेणे झाले. तब्येत ठिक नसल्यामुळे आणि गुरुवारच्या (ता.१२) मेळाव्याची तयारी करायची असल्यामुळे आपण बैठकीला येऊ शकत नसल्याचे त्यांनी आपल्याला सांगितल्याचे श्री. पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com