
Sugarcane FRP कोल्हापूर : यंदाचा हंगाम (Sugarcane Season) संपत आला तरी अजूनही राज्यातील १३४ साखर कारखान्यांनी एफआरपीची (FRP) पूर्ण रक्कम तटवली आहे. हंगाम सुरू केलेल्या २०७ कारखान्यांपैकी केवळ ७३ कारखान्यांनी ‘एफआरपी’ची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे.
फेब्रुवारीअखेर राज्यात २६५८ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ अद्याप थकीत आहे. ८० ते ९९ टक्क्यांपर्यंत ६७ कारखान्यांनी, ६० ते ७९ टक्क्यांपर्यंत ३९ कारखान्यांनी, तर ५९ टक्क्यांपर्यंत २८ साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’ शेतकऱ्यांना दिली आहे.
फेब्रुवारीअखेर गाळप झालेल्या उसाची एकूण ‘एफआरपी’ची रक्कम २७ हजार ४४३ कोटी रुपये होते. यापैकी २५ हजार ३९९ रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत ८७६ लाख टन उसाचे गाळप झाले.
राज्यात गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यंदा नियोजित वेळेपेक्षा साखर कारखाने एक महिना अगोदर बंद होत आहेत.
अनेक कारखान्यांची ऊस बिले अजूनही थकीत असल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत व सुस्थितीत चालणाऱ्या कारखान्यांनी ‘एफआरपी’ची बहुतांश रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे.
अन्य भागात मात्र ‘एफआरपी’ देण्याबाबत फारशी समाधानकारक स्थिती नाही. ज्या साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. त्यांची ऊस बिले धीम्या गतीने निघत आहेत. कोल्हापूर, सांगली, पुणे व नगरमध्ये १०० टक्के व ८० ते ९९ टक्क्यांपर्यंत ‘एफआरपी’ची रक्कम देणाऱ्या कारखान्यांची संख्या अधिक आहे.
यंदा इथेनॉलचे उत्पादन बऱ्यापैकी कारखान्यांनी घेतल्याने याचा फायदा शेतकऱ्यांची देणी लवकर देण्यावर झाला. ज्या कारखान्याची आर्थिक स्थिती बिकट आहे त्या कारखान्याच्या रकमा मिळण्यास वेळ होत आहे.
सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असल्याने साखरेला दर व मागणी वाढेल व याचा अनुकूल परिणाम ‘एफआरपी’ देण्यावर होईल, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.