
सांगली ः द्राक्ष हंगामाच्या (Grape Season) सुरुवातीपासून असणाऱ्या असमानी संकटावर मात करत शेतकऱ्यांनी द्राक्षे बाजारात (Grape Market) आणली. हंगामाच्या प्रारंभी द्राक्षाला अपेक्षित दर (Grape Rate) मिळाले.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाढत्या थंडीमुळे द्राक्षाच्या मागणीत घट झाली आणि बाजारपेठेतून द्राक्षाचा उठावही कमी झाला. या साऱ्यामुळे द्राक्षाच्या दरात सुमारे १५ ते २० टक्क्यांनी घसरण झाली आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
यावर्षी द्राक्ष हंगाम तसा पंधरा दिवस उशिरा सुरू झाला. सुरुवातीला नाताळमुळे देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाला ३५० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला. देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाची मागणी वाढली होती.
व्यापारीदेखील बांधावर जाऊन खरेदी करत होते. मात्र गेल्या आठ दिवसांत वातावरणात बदल होऊन थंडी वाढली. यामुळे बाजारपेठेत द्राक्षाला उठाव कमी झाला. परिणामी द्राक्षाची मागणी घटली. यामुळे शेतकरी संकटात सापडला.
द्राक्षांमधे गोडी उतरण्याआधी केवळ दिवस पूर्ण झाल्याने शेतकरी द्राक्ष देण्याची गडबड करत आहेत. शिवाय देशांतर्गत बाजारपेठेत मागणी कमी असल्याने परिणामी दर कमी झाले आहेत. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे.
बांगला देशात अद्याप द्राक्षे सुरू झालेली नाहीत. वास्तविक हंगामाच्या सुरुवातीला द्राक्षे दर तेजीत असतात, नंतर मोठ्या प्रमाणावर द्राक्षे आल्यावर दर कमी होतात; मात्र यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. हिरव्या वाणाच्याच्या द्राक्षांना १९० ते ३०० रुपयांपर्यंत दर मिळू लागला आहे. काळ्या वाणांचा २५० ते ४०० रुपये प्रति चार किलो असा दर आहे.
सध्या थंडीमुळे द्राक्षात गोडी उतरत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्षामध्ये योग्य गोडी झाल्याशिवाय द्राक्ष विक्रीसाठी पुढाकार घेऊ नये.
- संजय बरगाले, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र, द्राक्ष बागायतदार संघ
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.