
Sugarcane Crushing Season कोल्हापूर ः देशातील ६१ साखर कारखाने (Sugar Mills) फेब्रुवारीअखेर बंद झाले आहेत. देशातील गळीत हंगाम (Crushing Season) झपाट्याने अंतिम टप्प्याकडे येत आहे. ५२८ पैकी सध्या ४६७ साखर कारखाने सुरू आहेत.
या कालावधीपर्यंत २५७ लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) (इथेनॉलकडे साखर वळवल्यानंतर) झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत २५३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीपेक्षा केवळ ४ लाख टनांनी साखर उत्पादन जादा झाले आहे.
देशात गेल्या वर्षी या कालावधीत ४८४ साखर कारखाने सुरू होते यंदा ही संख्या ४६७ वर आली आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्र, कर्नाटकामध्ये एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात कारखाने चालले.
यंदा मात्र मार्चच्या पंधरवड्यापर्यंत किंवा फार फार तर मार्चच्या शेवटपर्यंतच हंगाम समाप्त होण्याची शक्यता असल्याने शेवटच्या टप्प्यात साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट येण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवडाअखेर गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात महाराष्ट्राने गती घेतली होती. यंदाही महाराष्ट्र एकूण साखर उत्पादनात उत्तर प्रदेशापेक्षा तब्बल २५ लाख टनानी पुढे असला, तरी गेल्या वर्षीच्या स्वतःच्या उत्पादनाच्या तुलनेत दोन लाख टनांनी मागे आहे.
फेब्रुवारीच्या अंतिम टप्प्यात मात्र महाराष्ट्रात साखर उत्पादनाची गती मंदावली. फेब्रुवारी अखेरपर्यंत महाराष्ट्रात ९५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ९७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
हा फरक येथून पुढील काळात हंगाम सुरू होईपर्यंत कायम राहणार आहे, किंबहुना, यात वाढच होईल, अशी शक्यता साखर उद्योगाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्रात या कालावधीपर्यंत १९७ साखर कारखाने सुरू होते. यंदा ही संख्या १८० वर घसरली आहे. महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात झपाट्याने बंद होणारे कारखाने हंगाम अंतिम टप्प्यात येत असल्याची सूचना देत आहेत.
अन्य राज्यांतील गाळप, उत्पादन स्थिती
गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये जवळ जवळ समान ऊसगाळप व साखर उत्पादन सुरू आहे. या कालावधीत उत्तर प्रदेशात ११३ कारखाने सुरू आहेत.
गेल्या वर्षी ११२ कारखाने सुरू होते. उत्तर प्रदेशात ७० लाख टन साखर तयार झाली असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ६८ लाख टन साखर तयार झाली होती.
कर्नाटकच्या साखर उत्पादनातही गेल्या वर्षीपेक्षा फारसा फरक नाही. कर्नाटकातील फेब्रुवारीअखेर ५१ लाख टन तयार झाली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा ५० लाख टनांचा होता.
तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, पंजाब, हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड व ओडिशामध्ये मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत फारशी वेगळी परिस्थिती नाही, असे ‘इस्मा’च्या वतीने सांगण्यात आले. या राज्यांमध्ये आतापर्यंत एकत्रितरीत्या ४१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी ते ३६ लाख टन होते.
इथेनॉलकडे अधिक साखर वळवली
गेल्या वर्षीच्या तुलनेत इथेनॉलकडे साखर वळवण्याचा वेग वाढला आहे. यंदा फेब्रुवारीअखेर २८.५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यात आली होती. गेल्या वर्षी याच कालावधीत २१.९ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यात आली होती. गेल्या वर्षीपेक्षा ६.६ लाख टन अधिक साखर इथेनॉलकडे वळविण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.