
कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर निर्यात (Sugar Export) कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा नकारात्मक परिणाम साखर कारखान्यांच्या (Sugar Mills) आर्थिक ताळेबंदावर होणार असल्याचा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला आहे.
उद्योगांच्या आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या क्रिसिल या संस्थेने म्हटले आहे की, घटलेली साखर निर्यात व ‘एफआरपी’त तीन टक्क्यांनी झालेली वाढ या बाबी कारखान्यांच्या नफ्यामध्ये घट आणू शकतात. साखर कारखान्यांचा ताळेबंद सुधारण्यासाठी इथेनॉल उत्पादन वाढ करणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. अन्य काही संस्थांनी यंदा निर्यात घटणार असल्याचे म्हटले आहे.
देशाचा गळीत हंगाम सुरू होऊन जवळजवळ दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सुरुवातीला धीम्या असणाऱ्या हंगामाला गेल्या पंधरा दिवसांत गतीने सुरुवात झाली. साखरेचे उत्पादन वाढले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीची गती यंदा कमीच असणार आहे. मे पर्यंत ६० लाख टन साखरेला केंद्राने परवानगी दिली आहे.
केंद्राने दिलेल्या कोट्यानुसारच साखरेची निर्यात करावी लागत असल्याने इतर साखरेचे स्थानिक बाजारात विक्री करण्याचे आव्हान कारखान्यांपुढे आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात दर असले तरी कोट्यामुळे जास्तीची साखर निर्यात करू शकत नसल्याचे कारखान्यांचे म्हणणे आहे.
स्थानिक ठिकाणीही दर फारसे वाढलेले नसल्याने गेल्या वर्षी ज्या तुलनेत निर्यात साखरेतून रक्कम कारखानदारांना मिळाली तितकी रक्कम यंदा मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. याचाच परिणाम म्हणून कारखान्यांना एक तरी कर्जासाठी बँकेवर अवलंबून राहावे लागेल अथवा कमी किमतीत स्थानिक बाजारात साखरेची विक्री करून शेतकऱ्यांची देणी भागवावी लागतील, असे चित्र सध्या आहे. साखरेचे उत्पादन मात्र गेल्या वर्षी इतकेच होणार असल्याने उत्पादन वाढीचा दबावही कारखान्यांना झेलावा लागेल, अशीच स्थिती आहे.
कारखान्यांचे नियोजन चुकू लागले
एप्रिलनंतर जागतिक बाजारात ब्राझीलची साखर येणार असल्याने एप्रिलच्या उत्तरार्धापासून दराची शाश्वती नसल्याचा अंदाज आहे. यामुळे येणाऱ्या दोन-तीन महिन्यांमध्ये जोरदार साखर निर्यात करून आर्थिक उपलब्धता करण्याचे नियोजन कारखान्यांचे होते. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात तरी बँकांच्या कर्जाकडे कारखान्यांचा ओढा कमी होता. मात्र कारखानानुसार साखर कोटा जाहीर झाल्यानंतर कारखान्यांचे नियोजन चुकत आहे.
१०० लाख टनांच्या आतच निर्यातीची शक्यता
मे नंतर परिस्थिती पाहून कारखान्यांना आणखी निर्यात परवानगी देण्याचे केंद्राचे नियोजन आहे. या वेळी केंद्र शिल्लक साठा व निर्यात झालेली साखर याचा अंदाज घेऊन परवानगी देईल. पण ती कमी प्रमाणात देईल, अशी ही शंका कारखानदारांना आहे. यामुळे यंदा १०० लाख टनांच्या आतच साखरेची निर्यात होईल, अशी शक्यता आहे. परिणामी निर्यातीबरोबरच कारखान्यांना स्थानिक साखर विक्रीवरही लक्ष द्यावे लागणार असल्याचे चिन्हे आहेत. या परिस्थितीत इथेनॉल तयार करून त्याची विक्री करणे आधार ठरू शकते, असे एका कारखानदाराने सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.