
Soybean Market Update : जागतिक बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यानंतर भारतात विक्रमी आवक झाली. २०२२-२३ च्या तेल वर्षात म्हणजेच नोव्हेंबर ते ऑक्टोबर या हंगामातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये खाद्यतेलाची आयात २२ टक्क्यांनी वाढली. या आयातीत पामतेलाचा वाटा सर्वाधिक आहे.
पामतेलासोबतट सूर्यफुल तेलाच्या आयातीतही लक्षणीय वाढ झाली, असे साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. मग देशात या सहा महिन्यात किती आयात झाली? याचा देशातील तेलबिया बाजारावर काय परिणाम होत आहे? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
भारत खाद्यतेलासाठी आयातीवर अवलंबून आहे. भारताला आपली ६५ टक्के गरज आयातीतून भागवावी लागते. पण कोरोनानंतर जागितक बाजारात खाद्येतलाच्या दरात मोठी वाढ झाली होती.
जागतिक पामतेल आणि सोयातेल उत्पादनात झाली घट, विस्कळीत झालेली वाहतूक आणि अव्वाच्या सव्वा झालेली भाडेवाढ यामुळे तेलाच्या दरात मोठी वाढ झाली होती.
यामुळे सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात मोठी कपात केली होती. पण मागील हंगामापासून आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्येतलाचे दर कमी होत गेले. मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात अक्षरशः घसरण झाली. यामुळे देशात खाद्यतेलाची आयात वाढली.
साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएच्या माहितीनुसार देशात मागील सहा महिन्यांमध्ये म्हणजेच नोव्हेंबर ते एप्रिल या काळात ८० लाख टन आयात झाली होती. तर मागील हंगामात याच काळातील आयात ६५ लाख ४३ हजार टनांवर होती.
म्हणजेच यंदा पहिल्या सहा महिन्यांमध्ये खाद्यतेल आयातीत २२ टक्के वाढ झाली. एकूण खाद्यतेल आयातीत पामतेलाचा वाटा ६१ टक्के होता, असे एसईएचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी सांगितले. कच्च्या पामतेलाची आयात ३७ लाख ६१ हजार टनांवर होती. मागील हंगामात याच काळातील कच्चे पामतेल आयात जवळपास २३ लाख टनांवर होती.
पहिल्या सहा महित सूर्यफुल तेल आयात जवळपास १४ लाख टनांपर्यंत पोचली. मागील हंगामात याच काळातील आयात ११ लाख टनांवर होती. म्हणजेच सूर्यफुल आयात २३ टक्क्यांनी वाढली.
सूर्यफुल तेलाचे भाव कमी झाल्यानंतर आयात वाढली. सोयाबीन आणि पामतेलाच्या तुलनेत मोठी घट झाली होती. परिणामी आयात स्वस्त झाली होती.
पामतेल आणि सूर्यफुल तेलाची आयात वाढली असताना सोयाबीन तेल आयात मात्र कमी झाली. चालू तेल वर्षातील पहिल्या सहामाहीत सोयाबीन तेल आयात २२ टक्क्यांनी कमी झाली. सोयाबीन तेलाची १७ लाख टन आयात झाली. मागील हंगामात याच काळातील आयात २२ लाख टनांवर होती.
देशात खाद्यतेलाची आयात वाढल्यामुळे साठे तयार झाले. खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण झाली. यामुळे देशात सोयाबीन आणि मोहरी गाळपापासून मिळणाऱ्या तेलाला कमी उठाव मिळाला.
परिणामी सोयाबीन आणि मोहरीचे दर दबावात आहेत. सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे.
तर मोहरीचे भाव ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्यास सोयाबीन आणि मोहरीच्या बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.