
पुणेः तेलंगणा सरकारने (Telangana Government) राज्यातील कमी पावसाच्या भागात पाम लागवडीला प्रोत्साहन देण्याची योजना सुरु केली. तेलंगणाने ८ लाख ५० हजार हेक्टरवर पामची लागवड करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात १ हजार कोटींची तरतूद तेलंगणा सरकारने केली आहे.
भारत गरजेच्या जवळपास ६५ टक्के खाद्यतेल आयात करतो. भारताच्या एकूण आयातीत जवळपास ७० टक्के वाटा पामतेलाचा असतो.
म्हणजेच देशात वर्षाला ८५ ते ९० लाख टन पामतेलाची आयात होते. त्यामुळे भारत सरकारने देशात पामलागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
तेलंगणा सरकारनेही दोन वर्षांपुर्वी पाम लागवड वाढविण्यासाठी एक योजना सुरु केली. या योजनेंतर्गत तेलंगणा राज्यात पामलागवड ४० पटींनी वाढविण्याचे उद्दीष्ट आहे.
सध्या तेलंगणात २० हजार ३५० हेक्टरवर पामचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र ८ लाख ५० हजार हेक्टरवरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. कमी पावसाच्या भागात सिंचनाच्या सुविधा निर्माण करून पामची लागवड करण्यात येणार आहे.
तेलंगणा सरकार पाम लागवडीला प्रोत्साहन देऊन राज्यातील पीकपध्दती बदलणार आहे. पाम लागवडीसाठी राज्य सरकारने काही सवलतीही देऊ केल्या आहेत. राज्यातील भात आणि मका उत्पादक शेतकऱ्यांनी पाम लागवड करावी, असे आवाहनही तेलंगणा सराकरने केले आहे.
तेलंगणा सरकाच्या या योजनेचे तेल कंपन्यांनी स्वागत केले आहे. काही कंपन्या तेलंगणात पाम तेल प्रक्रिया प्लांट्सचाही विस्तार करण्यावर भर देत आहेत.
पामतेलाचा वापर वाढला
देशात मागील २० वर्षांमध्ये पामतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. या काळात भारतातील पामतेलाचा वापर जवळपास ७ टक्क्यानी वाढला आहे. २००१-०२ मध्ये भारतात २९ लाख ४४ हजार टन पामतेलाचा वापर होत होता.
मात्र २०२०-२१ मधील पामतेलाचा वापर जवळपास ८८ लाख टनांवर पोचला. तर एकूण खाद्यतेलातील पामतेलाचे प्रमाण ३३ टक्क्यांवरूवरून ४४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.