सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन कोटींची उलाढाल

सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन कोटींची उलाढाल
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन कोटींची उलाढाल

आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे जीवनाचा बहुतांश काळ शेतीपासून दूर असले, तरी शेतीच्या ओढीने सत्यजित आणि अजिंक्य हांगे यांना शेतीत खेचले. वाचन, अभ्यासातून सेंद्रिय शेतीची कास धरली. १३ देशांतील सुमारे ८ हजार नियमित ग्राहकांच्या बळावर त्यांच्या टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म आणि अमोरेअर्थ या ब्रँडची ख्याती देशापरदेशापर्यंत पोचली आहे. इंदापूर तालुक्यातील दक्षिणेकडील भोडणी गाव हा परिसर कमी पावसाचा असला, तरी पूर्वीपासून कालव्यावर आधारित बागायत पट्टा बनला आहे. मात्र, गेल्या आठ-दहा वर्षांपासून कालव्याचे पाणी अनियमित झाले आहे. परिणामी, सिंचनासाठीच्या खर्चात वाढ होत गेली आहे. जानेवारीपासून भासणाऱ्या पाणी कमतरतेवर मात करण्यासाठी शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळू लागले आहे. येथील शिवाजीराव हांगे यांची ३२ एकर शेती आहे. त्यांनी सत्यजित आणि अजिंक्य या दोन्ही मुलांना उत्तम शिक्षणासाठी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून शेतीपासून दूर बोर्डिंगमध्ये ठेवले. सत्यजित यांनी अर्थशास्त्रातून पदवी, तर अजिंक्य यांनी बीसीएस पदवी घेतली. त्यानंतर दोघांनीही व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय बॅंकेमध्ये अनुक्रमे १० आणि ४ वर्षे नोकरी केल्यानंतर हांगे बंधूंनी २०११ मध्ये नोकरी सोडत शेती करण्याचा निर्णय घेतला. वडिलोपार्जित ३२ एकर शेतीपैकी २१ एकर शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली. उर्वरित शेती अद्यापही वडील करीत आहेत. पहिले वर्ष पारंपरिक पद्धतीने नियोजन केले, तरी सातत्याने वाचन, अभ्यास यातून सेंद्रिय शेतीचा विचार पक्का झाला. उसाखालील क्षेत्र सहा एकरपर्यंत मर्यादित ठेवत उर्वरित शेतीमध्ये फळबागेची लागवड केली. सध्या त्यांच्याकडे डाळिंब, देशी पपई, लिंबू, केळी या फळबागांसोबतच देशी तूर, शेवगा, खपली गहू, हरभरा, मूग, उडीद, चवळी ही हंगामी आंतरपिके असतात. शेतीमध्ये विनामशागत तंत्र, मिश्र शेती व फूड फॉरेस्ट या संकल्पना राबवल्या आहेत. या बंधूंनी आपल्या शेतीला टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म असे नाव दिले. शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेत बदल ः

  • विक्रीसाठी सुरवातीला पुणे, मुंबई येथील बाजारावर अवलंबून होते. मात्र, आडत-हमाली, भराई, तोलाई यांसारखे खर्च वजा जाता अत्यल्प उत्पन्न हाती येत होते. क्री व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला.
  • पपईची विक्री व्यापाऱ्यांना करण्याऐवजी हडपसर (पुणे) येथील उड्डाण पुलाखाली हातगाडीवरील विक्रेत्यांशी संपर्क साधला. काही फळे चवीसाठी मोफत देत ग्राहकांना आकर्षित करण्याचे धोरण आखले. यातून ग्राहकांना मालाची खात्री मिळाल्याने विक्री वाढली. दर्जेदार मालासाठी हांगे यांच्या फार्मची ओळख निर्माण होण्यास मदत झाली. ती टिकवून ठेवण्यासाठी ग्रेडिंग आणि पॅकिंगवर भर दिला.
    1.  पुण्यातील मॉलमध्ये शेतीमालाच्या विक्रीसाठी प्रयत्न सुरू केले. रिलायन्स, स्टारबझार, गोदरेज, स्पार्क अशा चार मॉलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विक्रीला सुरुवात केली. जवळपास दोन वर्षे मॉलद्वारे विक्री केली. त्यातून चांगल्या दराबरोबरच उच्चभ्रू लोकांच्या नेमकी मागणी समजण्यास मदत झाली. आजही मॉलद्वारे सुमारे १० टक्के मालाची विक्री करतात.
    2. मॉलमधील विक्रीचा अनुभव गाठीला असला, तरी पुढील टप्प्यामध्ये प्रत्येक शहरातील सेंद्रिय उत्पादनाच्या विक्री करणाऱ्या दुकांनावर लक्ष केंद्रित केले. बेंगळूरू (१) , गोवा (१) , मुंबई (८), पुणे (३), दिल्ली (१) येथील दुकानांमधून सुमारे २५ ते ३० टक्के शेतीमालाची विक्री केली जाते.
    3. ऑनलाईन शॉपी - विक्रीसाठी खास www.twobrothersindia.com वेबसाइट तयार केली आहे. त्यातून अमेरिका, जर्मनी, लंडन, फ्रान्स, स्वित्झर्लंड, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मलेशिया, न्यूझीलंड, कॅनडा, आणि रशिया अशा १३ देशांतील ८ हजार ग्राहकांशी सरळ व्यवहार सुरू झाले आहेत. आतापर्यंत त्यांना ८० लाख रुपयांची विक्री झाली आहे.
    4. तीन महिन्यांपूर्वीच अन्य १४ सहकाऱ्यांसह ऑरगॅनिक वुई हा ना नफा तत्त्वावरील संस्था सुरू केली आहे. त्यातून सेंद्रिय उत्पादनांच्या प्रसारासोबतच विक्रीसाठी व्यासपीठ तयार करण्याचा उद्देश आहे. त्यातून मुंबई व पुणे येथे फार्मर्स मार्केट सुरू केले आहे. अन्य २० सेंद्रिय उत्पादकांना विक्रीची सुविधा उपलब्ध होत आहे. यातून २० ते २५ टक्के शेतीमालाची विक्री केली जाते.

    अमोरेअर्थ ब्रँड

  • शेतीमालाची विक्री अमोरेअर्थ हे ब्रँड नावाने केली जाते.
  • सध्या त्या अंतर्गत तूप, गूळ, शेवगा पानांची पावडर, खपली गव्हाचे पीठ, हरभरा दाळ, तूर डाळ, डाळिंब, गूळ पावडर अशी उत्पादने विकली जात आहे.
  • सेंद्रिय उत्पादनाची विक्री करण्यापूर्वी त्याची खासगी प्रयोगशाळेतून तपासणी करून घेतली जाते. त्यानंतर त्यावर क्यूआरकोड लावला जातो. त्यामुळे ग्राहकांना खात्री मिळते.
  • त्यात नावीन्यता व पर्यावरणपुरकतेच्या उद्देशाने पॅकिंगसाठी प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक ट्रे ऐवजी सुपारीच्या ट्रेचा वापर केला. ग्रेडिंग, आकर्षक पॅकिंगमुळे थेट विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळतो.
  • होग या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांने भारतीय सेंद्रिय उत्पादनातील पहिल्या क्रमांकाचा ब्रँड असल्याचे जाहीर केले. उर्वरित चार ब्रँड हे कोट्यवधीची उलाढाल असलेल्या कंपन्यांचे ब्रँड असून, अमोरअर्थ हा केवळ एकच शेतकऱ्याच्या मालकीचा ब्रँड आहे.
  • सेंद्रिय शेतीचा प्रसार

  • टू ब्रदर्सची ख्याती राज्यासह परदेशातही पोचली असून, आजवर त्यांच्या फार्मला अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, व्हिएन्ना येथील २० ते २५ शेतकऱ्यांनी भेटी दिल्या
  • राज्य शासनाच्या आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांच्या अनेक सहलींनी भेट दिली.
  • सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी कार्यरत असल्याने शेतकऱ्यांसाठी शेतावर पंधरा दिवसांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण सुरू केले आहे. शहरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सोसायट्या येथे सेंद्रिय शेती व त्यातील उत्पादनांचे महत्त्व पटवून दिले जाते.
  • सेंद्रिय पद्धतींच्या प्रसारासाठी टू ब्रदर्सच्या नावानेच यू-ट्यूब चॅनेल तयार केले आहे. त्याला चार हजार फॉलोअर्स आहेत.
  • सेंद्रिय शेतीसाठी देशी गोपालन ः

  • जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी सुरवातीला केवळ चार गाई घेतल्या होत्या. हळूहळू त्यात वाढ करीत आज त्यांच्याकडे ७० गीर गाई आहेत. या गाईंच्या शेणखत, गोमूत्र यापासून स्लरी करून शेतीला दिले जाते. चार एकर चाऱ्यासाठी राखीव ठेवले असून, परिसरात पाच तासांची मोकळी चराई करीत असल्याने खर्चात ७० टक्क्यांपर्यंत बचत होते.
  • या गायींच्या दुधापासून तुपाची निर्मिती केली जाते. पूर्वी ताक वाया जात होते. परदेशी पर्यटकांनी या ताकापासून रिकोटा चीज बनवण्याची पद्धती शिकवली आहे. आता गाईंचे तूप, ताक, लोणी आणि रिकोटा चीजही फार्मर्स मार्केटमध्ये विकले जाते.
  • काटेकोरपणा...

  • सिंचनासाठी दोन विहिरी असून, स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणेद्वारे पाण्याचा काटेकोर वापर केला जातो.
  • विनामशागत शेती, ऊस पाचटाचा मल्चिंगसाठी वापर यामुळे पाण्यात बचत होते.
  • पारंपरिक शेतीतून सेंद्रियकडे वळल्यानंतर सुरवातीची तीन वर्षे कमी उत्पादन मिळाले असले, तरी पुढे त्यात वाढ होत गेली.
  • शेतकरी सेलिब्रिटी... आपल्याला सेलिब्रिटी म्हटले अभिनेते, अभिनेत्री किंवा उद्योगपती आठवतात. मात्र, यातील अनेक लोकांमध्ये भोडणी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म ने आपले बस्तान बसवले आहे. शिल्पा शेट्टी, मीरा शाहदी कपूर, जॅकी श्रॉफ, नंदिता दास यांसह अनेक हिंदी मराठी अभिनेते आता सत्यजित आणि अजिंक्य यांच्या शेतीमालाला पसंती देतात. अनेक प्रख्यात उद्योगपतींच्या घरीही दरमहा यांचा माल पोचतो. एकदा तर शिल्पा शेट्टीने सत्यजित यांना खास बोलावून उत्तम विषमुक्त सेंद्रिय माल उत्पादन करात असल्याबद्दल धन्यवाद दिले. मीरा कपूर यांनी यांच्या उत्पादनाची माहिती आपल्या इन्स्टाग्रामवरून आपल्या सर्व नातेवाइकांपर्यंत पोचवली. सेंद्रिय उत्पादनाच्या विक्रीसाठी साधे एक पॅम्प्लेटही न छापता आज तीन कोटी रुपयांची उलाढाल दोघे बंधू करीत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. स्वतः विक्रीमुळे उत्पन्नात वाढ... पूर्वी खर्च वजा जाता प्रतिवर्ष सात ते आठ लाख रुपये उत्पन्न मिळत होते. त्यात गेल्या चार वर्षांपासून हळूहळू वाढ झाली. स्वतःच्या ब्रँडने विकण्यास सुरुवात केल्यानंतर उलाढाल ७ ते ८ पटीने वाढली आहे. सध्या प्रक्रियायुक्त उत्पादनाच्या विक्रीतून तीन कोटी रुपयांची उलाढाल होते. खर्च वजा जाता प्रतिवर्ष २० ते २५ लाख रुपये निव्वळ नफा मिळतो. या उद्योगातून २४ व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला. प्रक्रिया केलेल्या उत्पादनाचे दर ः

    घटक वजन दर रुपये
    शेवगा पानांची भुकटी (मोरिंगा पावडर) १०० ग्रॅम २०० रुपये
    गूळ १ किलो १८०
    हरभरा व तूर दाळ १ किलो २००
    शेंगदाण्याचे लोणी (पीनट बटर) २५० मिलिलीटर २९०
    गूळ काकवी ५०० मिलि १५०
    रिकोटा चीज (ताकापासूनचे चीज) १०० ग्रॅम १००
    लाकडी घाण्याचे तेल १ लीटर ३८०

    संपर्क - अजिंक्य हांगे - ९८२३१३६००८, सत्यजित हांगे - ९८५०५८८८८३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com