
Latest Marathi News: हरभरा बाजाराला (Chana market) आधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून महत्वाच्या ग्राहक बाजारात सुधारणा होताना दिसत आहे. दिल्ली, कोलकाता, बंगलूरू आणि मुंबई बाजारात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली.
मग आवक वाढल्यानंतर हरभरा दर (Chana Rate) टिकतील का? हरभरा दर कसे राहतील? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.
1. सोयाबीन बाजार स्थिर
मार्च महिन्यात सोयाबीनची आवक सरासरीच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळं सोयाबीन दरावर दबाव असल्याचे सांगितले जाते.
सध्या बाजारात अडीच ते तीन लाख क्विंटलच्या दरम्यान सोयाबीन आवक होत आहे. तर सरासरी दरपातळी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात दरात चढ उतार सुरु आहेत.
देशातील बाजारात आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
2. कापूस दरावर दबाव कायम
देशातील बाजारात सध्या कापूस दरात नरमाई आहे. कापसाच्या दरात मार्च महिन्यातच क्विंटलमागं ३०० ते ५०० रुपयांची नरमाई आली.
मार्च महिन्यातील सरासरी आवक सध्या वाढली आहे. त्यामुळे दरावर दबाव आल्याचे व्यापारी सांगत आहेत.
सध्या कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ६०० ते ८ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. बाजारातील आवक एप्रिलमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
3. मका बाजार सुस्त
सध्या बाजारातील मका आवक मर्यादीत आहे. रब्बीतील मका आवक पुढील काही दिवसांमध्ये सुरु होईल.
मका आवक तोंडावर असल्याने व्यापारीही खरेदीसाठी इच्छुक दिसत नाहीत. त्यामुळे मक्याचे व्यवहारही कमी होत आहेत. दरही स्थिर आहेत.
सध्या मक्याला २ हजार ८० ते २ हजार २०० रुपये भाव मिळतोय. मका आवकेच्या काळात ही दरपातळी टिकून राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
4. शेवग्याच्या दरात तेजी
राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून शेवग्याची आवक घटली. बाजारात सध्या सरासरी १० ते २० क्विंटल आवक होत आहे.
मात्र शेवग्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे शेवग्याचे दर तेजीत आहेत. सध्या शेवग्याला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ५ हजार रुपये दर मिळतोय.
शेवग्याची आवक पुढील काळात कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
5. हरभरा बाजाराला आधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून महत्वाच्या ग्राहक बाजारांत सुधारणा होताना दिसत आहे.
दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि मुंबई बाजारात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली. मार्च महिन्यापर्यंत देशात यंदा हरभरा उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
पण मार्च महिन्यात अनेक भागातील हरभरा काढणी सुरु झाली. हरभरा काढणी केलेल्या शेतकऱ्यांनी यंदा उत्पादन घटल्याचे सांगितले. महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक हरभरा लागवड झाली. राज्यात २९ लाख हेक्टरवर लागवड झाली.
म्हणजेच देशातील एकूण लागवडीपैकी तब्बल २६ टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. पण राज्यातील शेतकरी यंदा उत्पादकता घटल्याचे सांगत आहेत. तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेशातही काही भागांमध्ये उत्पादन कमी झाल्याचे वृत्त आहे.
नाफेडची खरेदीही सुरु झाली. तसेच राज्यात शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे नाफेड यंदा चांगली खरेदी करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास खुल्या बाजारातील हरभऱ्याच्या दरालाही आधार मिळेल.
हरभऱ्याचे भाव खुल्या बाजारात ५ हजार ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.