
Cotton Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर आज सायंकाळपर्यंत स्थिर होते. कापूस दरानं बॅंकिंग संकट येऊन बाजार कोसळण्यापुर्वीची पातळी गाठली. देशातही वायद्यांमध्ये दर वाढले.
अनेक बाजार समित्यांमध्येही सुधारणा झाली. पण कालपर्यंत छोट्या बाजारांमध्ये दरात वाढ झाली नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. मात्र आज जवळपास सर्वच बाजारांमध्ये सुधारणा दिसून आली.
देशातील वायद्यांमध्ये कापूस दर मागील तीन दिवसांपासून वाढले. वायदे खंडीमागं २ ते अडीच हजाराने सुधारले. म्हणजेच क्विंटलमागं रुईचे वायदे ६०० ते ७०० रुपयाने वाढले. आंतरराष्ट्रीय तसचं देशातील वायदे वाढल्यानं, बाजार समित्यांमधील कापसाचे दरही वाढतील, असा अंदाज होता.
त्याप्रमाणं दोन दिवसांपासून काही बाजारांमध्ये सुधारणा दिसली. गुरुवारी राज्यातील आणि देशातील मोठ्या बाजारांमध्ये दर क्विंटलमागं वाढले होते. पण इतर छोट्या आणि मध्यम बाजारांमध्ये दर जैसे थेच होते.
त्यामुळं शेतकरीही संभ्रमात होते. तुम्ही दर वाढले म्हणता! पण आमच्या बाजारात तर भाव तशेच आहेत, असं अनेक शेतकरी म्हणत होते. आणि ते खरंही होतं.
आज मात्र जवळपास सर्वच बाजारांंमध्ये दरात क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा दिसली. अनेक बाजारातील किमान आणि कमाल दरात वाढ झाली. पण देशपातळीवरील सरासरी भावपातळी कायम राहीली.
सरासरी दरपातळी ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दरात होती. सध्या बाजारातील आवक जास्त आहे. याचा दरावर अजूनही दबाव आहे. पण पुढील काळात कापूस आवक कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं उद्योगांकडूनही खरेदी वाढली.
वायद्यांधील दर
वायद्यांचा विचार करता, देशात आज सायंकाळपर्यंत वायदे ६२ हजार १८० रुपये प्रतिखंडीवर होते. क्विंटलमध्ये रुईचा हा भाव १७ हजार ४०० रुपये होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे ८३.४१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. क्विंटलमध्ये भाव १५ हजार २०० रुपये होतो. म्हणजेच आजही देशातील रुईचे दर जास्त होते.
शेतकऱ्यांकडे आता कमी कापूस
देशातील बाजारात २९ मार्चपर्यंत १९६ लाख गाठी कापूस आल्याचा अंदाज आहे. म्हणजेच अजून ११७ लाख गाठी कापूस बाजारात येईल. यापैकी २० ते २५ टक्क्यांपर्यंत शेतकऱ्यांकडे असू शकतो, असं शेतकऱ्यांनीही सांगितलं.
म्हणजेच शेतकऱ्यांकडे ८० ते ९० लाख गाठी कापूस असू शकतो. विशेष म्हणजेच देशातील उद्योग सध्या फायद्यात असल्याचं काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांनी सांगितलं. त्यामुळं देशातील कापूस दर दबावात राहण्याची शक्यता नाही, असं जाणकारांनी सांगितलं.
दबाव दूर होईल
बाजारातील कापूस आवक आणखी काही दिवस जास्त राहू शकते. म्हणजेच जास्त कापूस बाजारात येईल. त्यानंतर दरही वाढू शकतात, असं व्यापारी आणि उद्योगांकडूनही सांगितलं जातंय. देशात कापूस कमी आहे, पुढील हंगामात कापूस लागवडीत घट होण्याची शक्यताही आतापासूनच व्यक्त केली जातेय.
आंतरराष्ट्रीय पातळीवरही लागवड कमी होण्याचा अंदाज आहे. यामुळं दराला आधार मिळतोय. याची जाणीव अनेक शेतकऱ्यांनाही आहे. त्यामुळे मोठे शेतकरी जास्त काळ कापूस ठेऊ शकतात, असेही उद्योगांकडून सांगण्यात आलं.
दराला आधार
एकूणच काय तर कापूस दर पुढील काळात वाढण्यास मजबूत फंडामेंटल्स आहेत. सध्याच्या दरात चांगली वाढ होऊ शकते. पण बाजारावर काही तत्कालिक घटनांचाही परिणाम होत असतो.
जसं मागील दीड महिन्यापासून देशात वाढलेली आवक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात बॅंकींग संकटामुळे दर घसरले होते. असेही काही घटक पुढे येतात. त्याचा काही काळ बाजारावर दबाव येतो.
पण दीर्घकाळात बाजार पुन्हा उभारी घेत असतो, हे लक्षात ठेवावं. तसचं कापूस विक्री करताना इतर बाजारांचाही आढावा घ्यावा, असं आवाहनही जाणकारांनी केलंय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.