
Cotton Bajarbhav Update : देशातील कापूस बाजार अध्यापही शेतकऱ्यांची निराशा करताना दिसत आहे. मागील आठवड्यापासून वायदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्यक्ष कापूस खरेदीच्या दारत वाढ झालेली दिसत आहे. पण देशातील बाजारात कापूस भाव एकाच पातळीला चिकटून आहेत.
मे महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी कापसाचे भाव दबावात आहेत. असे पहिल्यांदाच घडत असल्याचे व्यापारी आणि जाणकारांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे आणि प्रत्यक्ष खेरदीत कापसाचे भाव वाढले आहेत. इंटरकाॅन्टीनेंटल एक्सचेंजवर कापसाचे वायदे ८४.१८ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. मागील आठवड्यात शुक्रवारी बाजार ज्या पातळीवर बंद झाला होता, त्या पातळीवरून आज वाढ दिसली.
जगभरातील प्रत्यक्ष कापूस खरेदीचा सरासरी दर म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्स ९४ सेंटवर होता. काॅटलूक ए इंडेक्समध्येही वाढ झाली होती. चीनमध्येही कापसाच्या दरातील वाढ आजही कायम होती. चीनमध्ये कापसाचे भाव १५ हजार ७२५ युआन प्रतिटनांवर होते.
देशातील कापूस वायदे मात्र आज खंडीमागे ३०० रुपयाने नरमले होते. कापसाचे वायदे ६३ हजार रुपयांवर होते. बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाचे दर स्थिर होते. कापसाला आजही प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ६०० ते ८ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला.
कापसाचे हे भाव मागील दोन महिन्यांपासून आहेत. दरात काही बाजारांमध्ये १०० ते २०० रुपयांचे चढ उतार होतात. पण सरासरी दरपातळी कायम राहते.
भारतात पहिल्यांदाच मे महिन्यात कापूस दरावर एवढा दबाव दिसत असल्याचं काही व्यापारी आणि जाणकारांनी सांगितलं. एरवी मार्चपर्यंत आवकेचा दरावर दबाव असायचा. मार्चनंतर साधारणपणे दर वाढायचे. पण यंदा परिस्थिती उलटी दिसते. मार्चपर्यंत कापसाचे भाव टिकून होते. पण मार्चनंतर कापसाचे भाव घसरले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटाक बसत आहे.
मार्चनंतर कापूस बाजारात दरवाढ झाल्याचं शेतकरी मागील दोन वर्षांमध्ये पाहिले. हा अनुभव आधीही येत होता. पण मागील हंगामातील मार्चनंतर कापूस दरातील वाढ जास्तच होती. त्यामुळं ही मेख हेरून शेतकऱ्यांनी मार्चनंतर कापूस विक्रीचा निर्णय घेतला.
पण शेतकऱ्यांना आपल्यालाच कापूस विकावा लागेल. शेतकरी काही निर्यात करणार नाही किंवा स्वतः प्रक्रिया करणार नाही, पावसाळ्यापूर्वी शेतकरी कापूस विकतील, हे सर्वांनाच माहीत होते. त्यामुळे दर दबावात ठेवले गेले. आताही शेतकऱ्यांकडं कापसाचा स्टाॅक कमी असतनाही दरात सुधारणा केली जात नाही.
वास्तविक पाहता यंदा देशातील कापूस उत्पादन वापरापेक्षा कमी आहे. पुढील हंगामासाठी शिल्लक साठा खूपच कमी आहे. त्यामुळं कापसाच्या भावात वाढ अपेक्षित आहे. पण पावसाळा तोंडावर आला, पेरा वेळेवर झाला पाहीजे, पेरणीसाठी खत, बी-बियाणं घ्यायचं, भावही काही वाढत नाही, यामुळं शेतकरी कापूस विकत आहेत. त्यामुळं पहिल्यांदाच मे महिन्यात एक लाख गाठींच्या दरम्यान कापूस आवक होत आहे.
शेतकऱ्यांनी यंदा बाजाराचा कल पाहून कापूस विक्री करण्याचं ठरवलं. पण बाजारानं कल बदलला म्हणजेच बाजाराचा कल बदलला गेला. त्यामुळं शेतकऱ्यांचा हिरमोड होताना दिसत आहे. आता शेतकऱ्यांकडील कापूस स्टाॅक कमी आहे. त्यामुळं लवकरच बाजारातील कापूस आवक कमी होईल, असं कापूस बाजारातील जाणकारांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.