'पीएम किसान'चे पैसे घरबसल्या उचलता येणार

ग्रामीण भागात विशेषतः दुर्गम भागात वास्तव्य असलेल्या लोकांसाठी, दिव्यांग नागरिकांसाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेत पोस्ट विभागाचे कर्मचारी सहभागी असल्याने संबंधित शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे उचलणे सुलभ होणार आहे.
PM Kisan
PM KisanAgrowon

पीएम किसान (PM Kisan Samman Nidhi) सन्मान निधी योजनेचे पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता त्यांच्या बँकेत अथवा एटीएम सेंटरवर जायची गरज नाही. पोस्ट खात्याच्या मदतीने त्यांना हे पैसे घरबसल्या मिळू शकणार आहेत.

यासंदर्भातील ताज्या बातमीनुसार पोस्ट खात्यातर्फे पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) लाभार्थ्यांसाठी पोस्ट खात्यातर्फे 'आपका बँक आपके द्वार' हे अभियान राबवण्यात येत आहे.

वाराणसीचे पोस्ट मास्तर जनरल कृष्ण कुमार यादव यांनी या अभियानासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी यादव यांनी या योजनेबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारतर्फे ४ जून ते १३ जूनपर्यंत 'आपका बँक आपके द्वार' हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बँकेत अथवा एटीएम सेंटरवर न जाता पीएम किसान योजने अंतर्गत मिळालेले पैसे उचलता येणार आहेत.

ग्रामीण भागात विशेषतः दुर्गम भागात वास्तव्य असलेल्या लोकांसाठी, दिव्यांग नागरिकांसाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेत पोस्ट विभागाचे कर्मचारी सहभागी असल्याने संबंधित शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे उचलणे सुलभ होणार आहे.

आधार संलग्न पेमेंट सिस्टिमद्वारे (AePS) शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यातील पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे काढता येणे शक्य होणार असल्याचे यादव म्हणाले आहेत. त्यासाठी पोस्ट खात्याच्या कर्मचाऱ्याने आणलेल्या मशीनवर संबंधित शेतकऱ्यांना अंगठ्याचे ठसे द्यावे लागणार आहेत. त्यानंतर लगेच त्यांना हे पैसे उचलता येणार आहेत.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे उचलण्यासाठी बँकेत अथवा एटीएम सेंटरवर जावे लागते. त्याऐवजी संबंधित शेतकऱ्यांना हे पैसे त्यांच्या घरीच काढता यावेत, यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. भारतीय पोस्ट खात्याच्या मदतीने आधार संलग्न पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

पीएम किसान (PM Kisan) योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात ६ हजार रुपये देण्यात येतात. हे पैसे थेट हस्तांतरण यंत्रणेच्या माध्यमातून (DBT) संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. तीन समान हप्त्यांत हे पैसे योजनेच्या लाभार्थ्यांना मिळतात. ३१ मे २०२२ रोजी या योजनेचा शेवटचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.

आधार संलग्न पेमेंट सिस्टिमद्वारे (AePS) एका व्यक्तीला जास्तीत जास्त १० हजार रुपयापर्यंतची रक्कम काढता येणार आहे. विशेष म्हणजे या सुविधेचा लाभ शेतकऱ्यांना त्यांच्या घरी, शेतात अगदी बांधावरही घेता येणार आहे. पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये रांगा अथवा एटीएमसमोर रांगा लावण्याची गरज उरणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com