
Tur Market : तूर मागील तीन महिन्यांपासून तेजीवर स्वार आहे. तुरीमुळं हरभऱ्यालाही आधार मिळतोय. त्यामुळं काहीही करून तुरीचे दर कमी करण्याचा सरकारचा मनसुबा आहे. त्यासाठी सरकारनं आयातशुल्क काढलं, राज्यांकडून स्टाॅकची माहिती घेतली, तूर बाजारावर लक्ष ठेवण्यासाठी समितीही नेमली.
आता व्यापारी, स्टाॅकिस्ट, आयातदार आणि मिलर्सना तंबी देऊन साठ्याची अचूक माहिती देण्याची सक्ती केली. चुकीची माहिती दिल्यास कारवाईचा इशाराही दिला. सरकारच्या प्रयत्नानंतरही यंदा तुरीच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
चालू हंगामात तुरीची लागवड (Tur Cultivation) घडल्याचं स्पष्ट झाल्यानंतर दरानं उभारी घेतली. ऑगस्ट महिन्यापासून तुरीचे दर वाढू लागले. त्यानंतर पाऊस आणि बदलत्या वातावरणानं पिकाला फटका बसला.
उत्पादकता यंदा ३० टक्क्यांपर्यंत घटल्याचं शेतकऱ्यांनी त्याचवेळी सांगितलं. ही बातमी बाजारात वाऱ्यासारखी पसरली आणि तुरीतील तेजीला बळकटी मिळाली.
तूर बाजारात येण्याच्या काळातच दरात सुधारणा झाली. दरवाढीमुळं शेतकऱ्यांनीही माल मागं ठेवला. नेमकं याच काळात देशात लग्नसराई आणि सणांचा काळ सुरु झाला. सहाजिकच तुरीचे दर वाढले आणि टिकले.
तुरीचा भाव यंदा ९ हजारांचा टप्पा गाठेल, हा अंदाज अॅग्रोवनने जानेवारीतच जाणकारांच्या हवाल्याने दिला होता. तर सरासरी दरपातळी ८ हजार ते ९ हजार रुपये सांगितली होती. मागील १५ दिवसांपासून बहुतेक बाजारांमध्ये कमाल दरानं ९ हजारांचा टप्पा पार केला. तर सरासरी दरपातळी टिकून आहे.
देशात यंदा उत्पादन घटलं, आयात आणि गेल्या हंगामातील शिल्लक साठा गृहीत धरला तरी पुरवठाच कमी राहणार आहे, सरकारकडेही स्टाॅक नगण्य आहे.
नवा माल येण्यास खूप उशीर आहे. त्यामुळं तुरीचे दर पुढील काळातही तेजीत राहण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना तुरीसाठी यंदा चांगला भाव मिळू शकतो.
पण तूर दरातील ही तेजी सरकारला खुपतेय. शेतकरी देशोधडीला लागला तरी चालेल पण महागाई कमी झाली पाहिजे, असं सरकारचं धोरण दिसतं.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणं सरकारनं तुरीचे दर पाडण्यासाठी सर्वते प्रयत्न केले. पण तुरीचे दर टिकून आहेत. जे विहिरीतच पाणी तर पोहऱ्यात कुठून येणार? या म्हणीप्रमाणं यंदा उत्पादनचं नाही तर बाजारात येणार कुठून.
व्यापारी उद्योगांकडे किती स्टाॅक?
तरीही सरकारनं एक बैठक बोलावून व्यापारी, स्टाॅकिस्ट, आयातदार आणि मिलर्स यांना तंबी दिली. तुमच्याकडील तुरीच्या खऱ्या स्टाॅकची माहिती द्यावी, असं सरकारनं सांगितलं.
त्यानुसार व्यापारी आणि इतर घटकांनी आपल्याकडे २९ मार्चपर्यंत १२ लाख ६४ हजार टन स्टाॅक असल्याची माहिती दिली. तरीही सरकारला ही माहिती अपुरी असल्याचं वाटतं.
बाजारात सध्या तूर डाळीला चांगली मागणी आहे. बाजारातील आवकही कमी आहे. त्यामुळं ही माहिती खरी असू शकते, असं जाणकार सांगतात.
बाजाराकडे लक्ष आवश्यक
देशात यंदा तुरीचा मोठा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळं सरकारनं कोणताही निर्णय घेतला तरी त्याचा तात्पुरता परिणाम होईल. दीर्घकाळ दर दबावात राहणार नाहीत, हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं. कारण भारत वगळता इतर देशात तूर खूपच कमी उपलब्ध असते.
त्यामुळं इतर शेतीमालाप्रमाणं आयात करून पुरवाठा वाढवता येणार नाही, त्यामुळं बाजारातील अफावांवर विश्वास ठेऊ नका, माहिती पडताळून पाहा. पुढील काळात दर ९ हजारांपेक्षा वाढू शकतात. पण त्या पातळीवर किती दिवस टिकतील हे आत्ताच सांगता येणार नाही.
त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढाव घेऊनच विक्री करावी. यंदा तुरीचे दर तेजीत राहण्यासाठी फंडामेंटल्स अनुकूल आहेत. पण बाजारात काहीसे चढ उतारही जाणवतील, हेही लक्षात ठेवावं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.