excessive rain: पुन्हा वाढलेल्या पावसामुळे समस्यांत वाढ

नुकत्याच झालेल्या पावसामुळे बोदामध्ये मागील आठवड्यात जे काही अन्नद्रव्य गोळा झाले, ते पुन्हा या वेळी अतिवृष्टीमुळे (excessive rainfall) मुळांच्या कक्षेबाहेर गेले. पुन्हा दोन ओळींमधील जागेत साचले असेल.
excessive rainfall
excessive rainfallAgrowon

द्राक्ष सल्ला

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार शर्मा, डॉ. सुजोय साहा

गेल्या तीन, चार दिवसांपासून प्रत्येक ठिकाणी अतिवृष्टी (excessive rainfall) होत असताना दिसते. या पूर्वी जवळपास उघडीप होती, तेव्हा वातावरण थोडेफार कोरडे झाले. मात्र जमीन वाफसा स्थितीमध्ये येण्यापूर्वीच पुन्हा पाऊस वाढला. त्यामुळे पुढील अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

१) शेंडा वाढ जास्त होणे -

नुकत्याच झालेल्या पावसामुळे बोदामध्ये मागील आठवड्यात जे काही अन्नद्रव्य गोळा झाले, ते पुन्हा या वेळी अतिवृष्टीमुळे मुळांच्या कक्षेबाहेर गेले. पुन्हा दोन ओळींमधील जागेत साचले असेल. गेल्या आठवड्यात थोडी उघडीप मिळाल्यामुळे मुळे कार्य करू लागली होती. आता यामध्ये अन्नद्रव्यांची भर पडल्यामुळे पुन्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात उचलली जातील. परिणामी, शेंडा वाढ जास्त प्रमाणात दिसून येईल. या सततच्या पावसामुळे ही शेंडावाढ नेहमीपेक्षा जास्त असेल. यामुळे पेऱ्यातील अंतर वाढेल.

पानांचा आकार वाढेल. बगलफुटी जास्त प्रमाणात निघताना दिसतील. ओलांड्यावरील या पूर्वी न फुटलेले काही डोळे आता फुटू लागतील. या परिस्थितीत काडी परिपक्व होणार नाही. आपल्याकडे फळछाटणीला बराच कालावधी असल्यामुळे बागायतदारांना घाबरून जाऊ नये. हा पाऊस सारखा राहणार नाही, उघडीप मिळेल. उघडीप मिळाल्यानंतर पुढील प्रमाणे उपाययोजना करता येतील.

-शेंडा पिचिंग करून घेणे.

- बगलफुटी काढणे.

- ओलांड्यावरील फुटी तारेवर बांधून घेणे.

- हवा खेळती राहील अशा प्रकारचे वातावरण तयार करणे.

पालाशची उपलब्धता फवारणीच्या माध्यमातून करणे. बऱ्याच वेळा बागायतदार ड्रीपद्वारे व फवारणीद्वारेही पालाश उपलब्ध करतात. मात्र या वेळी सतत पाऊस सुरू असल्यामुळे दोन्ही पद्धतीचा वापर चुकीचा ठरेल.

२) पानांच्या वाट्या होणे

बऱ्याचशा बागेत चुनखडी कमी अधिक प्रमाणात दिसून येईल. या चुनखडीमुळे मुळांचा विकास आवश्यकतेइतका होत नाही. इतकेच नाही तर वेलीला आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचा पुरवठाही (पोटॅश, फेरस, मॅग्नेशिअम इ) खंडित होते. यामुळे आपण जमिनीत कितीही अन्नद्रव्ये उपलब्ध करत असलो तरी त्याचा पुरवठा वेलीला होत नाही. वेलीवर अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येतात.

जास्त बिकट परिस्थितीमध्ये पानांच्या वाट्या होणे, पानांच्या शिरा हिरवा राहून इतर भाग पिवळा पडणे व पानाच्या कडा पिवळ्या पडणे. अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. पालाशच्या कमतरतेमुळे पानांच्या वाट्या होताना दिसून येतात. ही परिस्थिती मुख्यतः जुन्या पानांवर दिसून येते. पाने पिवळी पडण्याची समस्या फेरसच्या कमतरतेमुळे उद्भवते. बरेच बागायतदार या स्थितीतील बागेत जमिनीतून अन्नद्रव्याचा पुरवठा वेगवेगळ्या ग्रेडच्या खतामार्फत करतात. सध्या बागेत काडी परिपक्वतेचा कालावधी सुरू असून, काही बागेत सूक्ष्म घडनिर्मितीचा शेवटचा टप्पाही असले. म्हणजेच यावेळी स्फुरद आणि पालाशयुक्त खतांचा वापर करणे गरजेचे असेल.

या वेळी जर पाऊस सुरू असल्यास बोदामध्ये जास्त पाणी असल्यास जमिनीतून दिली जाणारी अन्नद्रव्ये निचरा होण्याची शक्यता असेल. ती मुळांच्या कक्षेबाहेर जातील. विद्राव्य खतेही फार कार्यक्षम असल्यामुळे जमिनीतून उपलब्ध केल्यानंतर एक ते दोन दिवसांत वेलीवर त्याचा परिणाम दिसून येतो. पाऊस असलेल्या परिस्थितीत खताचा पुरवठा जमिनीतून करणे टाळावे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे जमीन वाफशात येत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची खते जमिनीतून देऊ नये.

पाऊस संपल्यानंतर बोद मोकळे झाले याची खात्री झाल्यानंतर नेहमी देत असलेल्या खतांच्या अर्ध्या मात्रेत खत द्यावे. पालाशचा वापर करतेवेळी ०-०-५० हे खत एक ते सव्वा किलो प्रति एकर किंवा ०-९-४६ एक किलो प्रति एकर या प्रमाणे १२ ते १५ दिवस ड्रीपद्वारे द्यावे. पाण्याचा वापर फक्त खते देण्यापुरताच करावा. जुन्या पानांच्या वाट्या झालेल्या असल्यास या वेळी पालाशची उपलब्धता केली तरी पान सरळ होणार नाही.

मात्र पुढील अवस्थेतील पाने चांगली येतील. पानाच्या कडा व पाने पिवळे पडलेली असल्यास बागेत फेरस सल्फेट १० ते १२ किलो व मॅग्नेशिअम सल्फेट १५ किलो प्रति एकर या प्रमाणे जमिनीतून उपलब्धता करावी. पाऊस संपल्यानंतर ०-९-४६ हे खत ३ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे दोन ते तीन फवारण्या करून घ्याव्यात. तसेच फेरस सल्फेट तीन ग्रॅम आणि मॅग्नेशिअम सल्फेट चार ग्रॅम प्रति लिटर पाणी यांचा स्वतंत्रपणे फवारणी एक दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळा करून घ्यावी.

यामुळे चुनखडी उपलब्ध असलेल्या बागेत अन्नद्रव्यांची पूर्तता करणे सोपे होईल. प्रत्येक चुनखडी असलेल्या बागेत (माती परिक्षण केलेले नसल्यास) ५० ते ६० किलो सल्फर प्रति एकर या प्रमाणे बोदामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यावे. नत्राचा वापर या वेळी पूर्णपणे टाळावा. अन्यथा, पालाशचा वापर आपण काडी परिपक्वतेकरिता करतो, मात्र नत्रामुळे पुन्हा वाढ होईल. आणि काडी परिपक्वता लांबणीवर जाईल.

३) वेलीवर मुळ्या येण्याची समस्या

या वेळी बागेत मुळांच्या कक्षेतील मातीच्या प्रत्येक कणामध्ये पाणी साचून राहिलेले असेल. यापूर्वी तयार झालेली पांढरी मुळे आता काळी पडली असतील. ही मुळे जेव्हा कार्य करत नाही, तेव्हा वेलीवर (खोड, ओलांडा व काडी) नवीन मुळे तयार होऊ लागतात. ही परिस्थिती फक्त पावसाळी वातावरणामध्ये दिसून येईल. पाऊस संपल्यानंतर बोद मोकळे झाल्यानंतर जमिनीतून मुळे पुन्हा कार्यरत होताच वरील ही मुळे काळी पडतात. यामुळे नुकसान तसे कुठलेच होणार नसले तरी बोदामध्ये मोकळे वातावरण राहील, याची दक्षता घ्यावी. त्यामुळे बोदामध्ये पांढरी मुळे कार्यरत होतील आणि वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग संतुलित राहील.

४) रोगनियंत्रण

होत असणाऱ्या पावसामध्ये फुटीचा शेंडा जोरात वाढताना दिसून येतो. अशा वेळी शेंड्याकडील फुटींवर करपा आणि जिवाणूजन्य करपा यांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. नवीन कोवळ्या शेंड्याकडील फुटींवर तपकिरी रंगाचे सुई टोचल्याप्रमाणे डाग दिसून येतील. जास्त प्रादुर्भावाच्या स्थितीत पानांना छिद्रेही पडलेली दिसतात. जिवाणूजन्य करपाही अशाच प्रकारे पानांवर पसरताना दिसून येईल.

या रोगाचे जिवाणू किंवा बिजाणू काडीमध्ये घुसले की फळछाटणी झाल्यानंतर घडावरही त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. द्राक्ष मण्यावरही असेच तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. अशी द्राक्षे खाण्याजोगी नसतात. यावर महत्त्वाचे नियंत्रण म्हणजे शेंड्याकडील काडी त्वरित काढून टाकावी. करपाचा प्रादुर्भाव असलेल्या फुटी पाऊस उघडण्याची वाट न पाहता त्वरित काढून टाकाव्यात. त्यानंतर बोर्डो मिश्रणाची किंवा कॉपरयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यावी. फुटी पिंच केल्यानंतर झालेली जखम या वेळी बुरशीनाशकामुळे भरून येईल.

या वेळी बागायतदार बोर्डो मिश्रणाच्या फवारणीवर जास्त जोर देतात. हे बुरशीनाशक स्वस्त आणि गुणकारी असले तरी रंगीत जातींवर जर याचे विपरीत परिणाम होत असल्यास फक्त हिरव्या द्राक्षजातीमध्ये त्यांचा वापर करता येईल. रंगीत द्राक्ष जातींमध्ये फवारणीची संख्या मर्यादित (दोनपेक्षा जास्त नको) ठेवावी. अन्यथा, ताम्रयुक्त घटकांच्या अधिकतेमुळे विषारीपणाची पानावर लक्षणे (कॉपर टॉक्सिसिटी) येण्याची शक्यता अधिक असते.

पानांवर कोणत्याही प्रकारची टॉक्सिसिटी आल्यास पाने एकतर सुकायला लागतात किंवा करपतात, त्यामुळे पानांतील हरितद्रव्यांचे नुकसान होते. पुढील काळात पानांद्वारे अन्नद्रव्ये तयार करण्यात अडचणी येतात. रंगीत द्राक्षजातींमध्ये बोर्डो मिश्रणाऐवजी कॉपर हायड्रॉक्साईड दीड ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करून घेता येईल.

बऱ्याचशा बागेमध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळे बागेत कामच करता येत नसल्यामुळे दाट कॅनॉपी तयार झाली असेल. अशा वेळी जैविक नियंत्रणावर जोर दिल्यास कमी खर्चात चांगले रोगनियंत्रण करणे सोपे होईल. यावेळी ट्रायकोडर्माचा वापर जितका जास्त करता येईल, तितका करावा. अन्नद्रव्यांचा वापरासारखाच ड्रेचिंगच्या माध्यमातून ट्रायकोडर्माचा वापर फायद्याचे नसेल. मात्र जास्तीत जास्त वेळेला फवारणी करून जिवाणूंची संख्या तितक्याच पटीत वाढेल. त्याचा फायदा रोगनियंत्रणासाठी होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com