
Chana Bajarbhav : देशातील अनेक भागात सध्या हरभरा काढणी (Chana Harvesting) जोमात सुरु आहे. पण नाफेडच्या कामगिरीमुळं हरभरा बाजार दबावात आहे. सध्या हरभऱ्याला हमीभावापेक्षा ८०० रुपयांपर्यंत कमी दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी नाफेडला हरभरा विक्रीसाठी धडपड करत आहेत.
नाफेडने शेतकऱ्यांची नोंदणी सुरु केली. पण नाफेड हरभऱ्याची गत कांद्याप्रमाण करतं की काय? असा संशय येतो आहे. कारण सध्या खूपच कमी खेरदी केंद्रांना मान्यता मिळाली.
नोंदणीला केवळ ५ दिवस शिल्लक असताना केंद्रांची संख्या वाढवण्यात आली नाही. नाफेडने कमी खरेदी केल्यास खुल्या बाजारातील दरावर दबाव येऊ शकतो.
नाफेडने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंत मुदत दिली. पण अनेक केंद्रांना उद्याप मान्यताच मिळाली नाही. मान्यता मिळेल की नाही? याची शाश्वतीही दिली जात नसल्याचं चित्र आहे. केंद्र सकारनं यंदा देशात विक्रमी हरभरा उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला.
व्यापारी आणि उद्योगाच्या मते उत्पादन यापेक्षा कमीच राहील. त्यातच नाफेडने मागील वर्षभर स्टाॅकमधील हरभऱ्याची टप्प्याटप्प्याने कमी दरात विक्री केली. त्यामुळं हरभरा दरात ऑफ सिझन आणि सणासुदीतही मध्येही तेजी आली नाही.
दरावरील दबाव आजही कायम आहे. बाजारात हरभरा आवक काही प्रमाणात होतेय. पण आवकेचा दबाव पुढील काही दिवसांमध्ये येईल.
सध्या हरभऱ्याला ४ हजार ६०० ते ५ हजार रुपये दर मिळत आहे. तर सरकारने यंदा ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. म्हणजेच खुल्या बाजारात हमीभावापेक्षा ४०० ते ७०० रुपये कमी दर मिळत आहे.
त्यामुळे नाफेडला हरभरा घालण्यासाठी शेतकऱ्यांची चढाओढ सुरु आहे. बाजारात दर दबावात असल्याने नाफेड खरेदी करेल, असे सरकारने सांगितले. पण नाफेडने सुरु केलेली खरेदी केंद्रे पाहता, सरकारचा बेत वेगळाच दिसतो.
नाफेड शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून हरभरा खरेदी करत असते. शेतकरी उत्पादक कंपन्यांना खेरदीची परवानगी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांची नोंदणी सुरु होते. पण यंदा नाफेडने गेल्यावर्षीपेक्षा केवळ एक तृतियांश खेरदी केंद्रांनाच मान्यता दिल्याचे सांगितले जाते.
नाफेडने यंदा खूपच कमी खरेदी केंद्रांना मान्यता दिल्याचे जालना जिल्ह्यातील फार्मफ्यूचर फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीचे संचालक गोवर्धन भुतेकर यांनी सांगितले.
नाफेडने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंत मुदत दिली. पण अनेक केंद्रांना मान्यताच मिळाली नाही. आम्ही यासंदर्भात नाफेड आणि संबंधीत मध्यस्थ संस्थांकडे विचारणा केली.
मात्र प्रतिसाद मिळाला नाही. पण मुदत संपत आली तरी नोंदणी होत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला. नाफेडने जास्त हरभरा खेरदी केल्यास किमान हमीभाव तरी मिळू शकतो, असे शेतकरी सांगत आहेत.
नाफेडची खरेदी महत्वाची का?
हरभरा बाजारातील स्थिती पाहता नाफेडच्या खेरदीच भीस्त दिसते. यंदा उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी राहीले तरी गेल्या हंगामातील शिल्लक साठा मोठा आहे. नाफेडकडे सध्या १६ लाख टन हरभरा आहे. तर व्यापारी आणि उद्योगाकडे ६ ते ७ लाख टन माल असू शकतो.
त्यातच यंदाच्या उत्पादनाची भर पडणार. त्यामुळं बाजारावर दबाव राहीलं. नाफेडने गेल्यावर्षीप्रमाणे किमान २५ लाख टन हरभरा खेरदी केल्यास खुल्या बाजारातील दराला आधार मिळेल. खुल्या बाजारातील दर हमीभावाच्या दरम्यान राहू शकतात.
पण नाफेडचं सध्याचं धोरणं पाहता यंदाची खरेदी कमी होण्याची शक्यता दिसते. नाफेडने खरेदी वाढवावी, जास्तीत जास्त खरेदी केंद्रांना मान्यता द्यावी, यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या भागातील लोकप्रतिनिधींकडे पाठपुराव करावा.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.