
Onion Rate : देशात सध्या कांदा दराचा प्रश्न चांगला पेटला. कांद्याला अगदी २०० रुपयांपासून दर मिळत असल्यानं शेतकरी चांगलेच संतप्त झाले. सरकारच्या कांदा निर्यातीच्या धरसोड धोरणाचा फटका बसत असल्याची टिका शेतकरी करत आहेत.
तर सरकार कांदा निर्यात (Onion Export) वाढल्याचा दावा करत आहे. यंदा एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांमध्ये कांदा निर्यात ४९ टक्क्यांनी वाढली तरी निर्यातीचे मुल्य केवळ १५ टक्क्यांनी वाढले आहे. यावरून यंदा कांद्याला भाव नसल्याचे स्पष्ट होत आहे.
जागतिक कांदा उत्पादनात भारताचा २५ टक्के वाटा आहे. तर नेदरलॅन्ड आणि मेक्सिकोनंतर भारत कांदा निर्यातीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय कांद्याला आग्नेय आशिया आणि पश्चिम आशियातील देशांकडून मागणी आहे.
भारताची कांदा निर्यात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांमध्ये ४९ टक्क्यांनी वाढून १७ लाख २० हजार टनांवर पोचली. तर निर्यातीचे मूल्य १५ टक्क्यांनी वाढून ३९ लाख ४० हजार डाॅलरवर पोचले.
नाफेडने केलेल्या उपायांमुळेच कांदा निर्यात वाढल्याचा दावा नाफेडकडून केला जात आहे. मलेशिया, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशांकडून कांद्याला मागणी वाढली. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला मागणी वाढली असून यंदा गेल्यावर्षीपेक्षा जास्त निर्यात होईल, असे अपेडाचे अध्यक्ष एम अंगामुथू यांनी सांगितले.
भारताने २०२१-२२ मध्ये एप्रिल ते डिसेंबर या काळात ४६ कोटी डाॅलरचा कांदा निर्यात केला होता. बांगलादेश, मलेशिया, युएई, श्रीलंका, नेपाळ, इंडोनेशिया, कतार, व्हिएतनाम, ओमान, कुवैत, सिंगापूर, सौदी अरब, बहरीन, मालदीव आणि माॅरिशस या देशांना भारतातून कांदा निर्यात होतो.
भारताची कांदा निर्यात चांगली होत असली तरी उत्पादन वाढले त्या प्रमाणात निर्यात वाढली नाही, असे हाॅर्टीकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजित शाह यांनी सांगितलं.
बांगलादेश मुख्य ग्राहक
भारतीय कांद्याचा मुख्य खरेदीदार बांगलादेश आहे. बांगलादेशने यंदा ५ लाख १० हजार टन कांदा खरेदी केला. गेल्यावर्षी ४ लाख ६९ हजार टनांची खरेदी केली होती. पण कांद्याचे रुपयातील मुल्य यंदा घटलं.
भारताने गेल्यावर्षी बांगलादेशला १२ कोटी ३३ लाख डाॅलरचा ४ लाख ६९ हजार टन कांदा निर्यात केला होता. पण यंदा ५ लाख १० हजार टनांची निर्यात करूनही केवळ ९ कोटी डाॅलर मिळाले.
निर्यातीचे मुल्य घटले
गेल्या हंगामात भारताने ११ लाख ५६ हजार टन कांदा निर्यात केला होता. त्यातून ३४ कोटी ३९ लाख डाॅलर मिळाले होते. तर यंदा १७ लाख २१ हजार टन कांदा निर्यातीतून ३९ कोटी ४० हजार डाॅलर मिळाले. म्हणजेच कांदा निर्यात ४९ टक्यांनी वाढली. पण निर्यातीचे मुल्य केवळ १५ टक्क्यांनी वाढलं. यावरून भारतीय कांद्याला यंदा भाव नसल्याचं स्पष्ट होतंय.
कांदा दरात मोठी घसरण
भारतात कांद्याला भाव नसल्याचा मुद्दा मागील काही महिन्यांपासून चांगाल तापला. सध्या तर कांद्याला अगदी २०० रुपयांपासून भाव मिळतोय. यंदा भारतात कांदा उत्पादन वाढले. पण कांद्याला देशांतर्गत आणि निर्यातीसाठी तेवढी मागणी वाढली नाही.
त्यामुळं कांदा दर दबावात आहेत. मार्च महिन्यातही कांदा दरावर काहिसा दबाव राहणार आहे. त्यामुळं चालू आर्थिक वर्षात कांदा निर्यात वाढली तरी निर्यातीचे मुल्य वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण डिसेंबरनंतर कांदा दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत, अशी माहिती निर्यातदारांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.