Kharip Sowing: देशातील खरीप पेरणीची कशी स्थिती आहे ?

देशभरात पावसाचे (Rain) प्रमाण वाढल्यामुळे पेरण्यांना वेग आलाय. परंतु तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही पेरण्यांचा (Sowing) टक्का कमीच आहे. (Kharip Sowing)
Kharip Sowing
Kharip SowingAgrowon

देशभरात पावसाचे (Rain) प्रमाण वाढल्यामुळे पेरण्यांना वेग आलाय. परंतु तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही पेरण्यांचा (Sowing) टक्का कमीच आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडील (Agriculture Ministry) १ जुलै पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात सुमारे २७९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्यात. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरणी ५.३ टक्के कमी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत देशात सुमारे २९४ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.

मागच्या आठवड्याच्या तुलनेत मात्र पेरणीची स्थिती सुधारली आहे. २४ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात पेरणी आधीच्या वर्षीच्या तुलनेत २३.८ टक्के कमी होती. ती तफावत आता ५.३ टकक्यावर आली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि राजस्थानात पेरा वाढलाय.

कापूस लागवडीत ३.८ टक्के वाढ
कापसाचा पेरा गेल्या वर्षीपेक्षा ३.८ टक्के वाढलाय. गुजरातमध्ये सुमारे १०.८६ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झालीय. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे ११.४६ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. महाराष्ट्रात यंदा आतापर्यंत २३.६५ लाख हेक्टरवर कापूस लागवड पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण १९.५९ लाख हेक्टर होतं.

भात पिछाडीवर
भाताची पेरणी मात्र अजूनही खूप कमी आहे. गेल्या वर्षी १ जुलैपर्यंत सुमारे ५९ लाख हेक्टरवर भात पेरणी झाली होती. यंदा मात्र सुमारे ४३ लाख हेक्टरवरच पेरणी झाली आहे. देशातील मुख्य भात उत्पादक पट्ट्यात अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. १५ जुलैपर्यंत भाताच्या पेरणी क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज आहे.

कडधान्यांचा पेरा ७ टक्के वाढला
एकूण खरीप कडधान्य पिकांचा पेरा गेल्या वर्षीपेक्षा ७ टक्के वाढला आहे. परंतु तूर आणि उडदाचा पेरा मात्र अजूनही कमीच आहे. गेल्या वर्षी १ जुलैपर्यंत देशात सुमारे १२ लाख हेक्टरवर तुरीचा पेरा होता. यंदा तो जवळपास १० लाख हेक्टर आहे. तर उडदाचा पेरा गेल्या वर्षीच्या ३.७९ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा ३.४५ लाख हेक्टर आहे. देशभरात मुगाचा पेरा मात्र ३१.८ टक्क्यांनी वाढलाय. राजस्थात ६३.५ टक्के तर कर्नाटकात १०.२ टक्के वाढ झाली आहे.

तेलबिया लागवड ९ टक्के कमी
देशातील तेलबिया पिकांची लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ टक्के घटलीय. गेल्या वर्षी १ जुलैपर्यंत ५०.३६ लाख हेक्टरवर तेलबिया पिकांची लागवड झाली होती. यंदा मात्र ४६.३४ लाख हेक्टर लागवड आहे. सोयाबीन लागवडीत किंचित वाढ झालीय. यंदा ३०.५२ लाख हेक्टरवर लागवड झालीय. गेल्या वर्षी याच कालावधीत ३०.२९ लाख हेक्टरवर पेरा होता.

भरडधान्यांचं क्षेत्र किंचित वाढलंय. गेल्या वर्षीच्या ३६.३२ लाख हेक्टरवरून ते यंदा ३७.०७ लाख हेक्टरवर गेलं आहे. बाजरीचा पेरा मात्र ४६.७
टक्के वाढलाय.

उसाचं क्षेत्र गेल्या वर्षी ५३.४१ लाख हेक्टर होतं. ते यंदा ५२.९२ लाख हेक्टर आहे. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात ऊस पेरा वाढलाय, तर महाराष्ट्रात मात्र किंचित कमी झालाय.

जुलैचा पाऊस महत्त्वाचा
जून महिना देशातील अनेक भागांत जवळपास कोरडा गेला. काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. परंतु देशाच्या मध्य भागात पावसाने दडी मारली. त्यामुळे देशात जून महिन्यात सरासरीच्या आठ टक्के पावसाची तुट राहिली. जुलै महिन्यात दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या तुलनेत ९४ ते १०६ टक्के मॉन्सूनचा पाऊस होईल, असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. पेरण्यांच्या दृष्टीने जुलै महिना अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com