
गेल्या काही वर्षांपासून जागतिक भुकेचा (Global Hunger) प्रश्न गंभीर बनत चालला आहे. कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्ध, वातावरणातील बदल, प्रतिकूल नैसर्गिक स्थिती इत्यादी कारणांमुळे जगात अन्न संकट (Food Crisis) ओढवण्याचा इशारा देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जगातील विकसित देश हा प्रश्न सोडवण्यासाठीचा एक उपाय म्हणून भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
जागतिक अन्न सुरक्षेचा (Food Security) प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेने चार देशांचा गट स्थापन केला आहे. या गटाचा सदस्य असलेल्या संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) भारतात ‘फूड पार्क’ साखळी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तब्बल दोन अब्ज अमेरिकी डॉलर्सचे कर्ज यूएई देणार आहे. भारत या फूड पार्कसाठी जमीन आणि शेतकरी पुरवेल. परंतु भारतात नियमित सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञान सुविधांची कमतरता आहे. त्या कामी अमेरिका आणि इस्राईलमधील खासगी कंपन्या मदत करणार आहेत.
या फूड पार्क साखळीच्या माध्यमातून शेतकरी, प्रक्रिया उद्योजक आणि किरकोळ विक्री क्षेत्रातील घटकांना एकत्र आणले जाईल. पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन मिळावे, जलसंवर्धन व्हावे आणि शेतीमालाची नासाडी कमीत कमी व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल. या उपक्रमामुळे पश्चिम आणि दक्षिण आशियात अन्न सुरक्षा बळकट करण्यासाठी मदत होईल, असा धोरणकर्त्यांचा होरा आहे.
‘‘भारतात केलेल्या या गुंतवणुकीमुळे भारतातील अन्न उत्पादन केवळ पाच वर्षांत तिप्पट वाढेल,’’ असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले. संयुक्त अरब अमिराती, इस्त्राईल आणि भारताच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या I2U2 या आभासी परिषदेमध्ये ते बोलत होते.
कोरोना महामारीमुळे जागतिक अन्न पुरवठा साखळी विस्कळीत झाली. त्यामुळे अन्नाचा तुटवडा आणि भडकलेल्या किमती यांचा सामना जगभरातील अनेक देशांना करावा लागत आहे. त्यात रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अन्नटंचाईची (Food Crisis) भीती आणखीनच गडद झाली आहे. रशिया आणि युक्रेन हे जागतिक धान्य निर्यातीत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. युद्धामुळे या देशांतून होणारा अन्नधान्य पुरवठा रोडावला आहे.
या पार्श्वभूमीवर विकसित देश भारताकडे एक मजबूत पर्याय म्हणून पाहत आहेत. परंतु जागतिक अन्नधान्य पुरवठ्यात भारताला मोठी भूमिका बजावायची असेल तर काही प्रश्नांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. उदा. भारत हा जगाला गहू पुरवठा (Wheat) करेल, अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारत जगाची भूक भागवण्यासाठी सक्षम असल्याची ग्वाही दिली होती. परंतु काही दिवसांतच भारताला घुमजाव करत गहू निर्यातीवर बंदी घालावी लागली होती. देशात उष्णतेच्या लाटेमुळे घटलेले गहू उत्पादन आणि वाढती महागाई यामुळे भारताने निर्यातबंदीचा निर्णय घेतला. यासंदर्भात विविध देशांनी आपापसात सहकार्य आणि समन्वयाची भावना ठेवली पाहिजे, असे मत ज्यो बायडेन यांनी व्यक्त केले.
गुजरात, मध्य प्रदेशला प्राधान्य
भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये ३०० मेगावॉट क्षमतेचे हायब्रीड पवन व सौरऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यात येणार आहे. तसेच मध्य प्रदेश या आणखी एका भाजपशासित राज्यामध्ये फूड पार्क साखळी उभारली जाणार आहे, असे ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात केळी, बटाटा, भात, कांदा आणि मसाला पिकांची लागवड करण्यावर भर दिला जाणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.