
जळगाव ः खानदेशात केळीची आवक (Banana Arrival) सध्या प्रतिदिन सरासरी १२० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) आहे. मागील आठ ते १० दिवसांत आवकेत वाढ अपेक्षित होती. परंतु आवक स्थिर (Banana Rate) आहे. दरही प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये व सरासरी १२०० रुपयांपर्यंत टिकून आहेत.
सध्या पिलबाग किंवा खोडवा केळीमधील काढणी (Banana Harvesting) जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, यावल, चोपडा आदी भागांत सुरू आहे. अर्ली नवती केळी बागांमधून (मे व जून, जुलैमध्ये लागवडीच्या बागा) केळीची आवक अद्याप सुरू झालेली नाही.
या बागांत केळीची निसवण वेगात झाली आहे. काढणी फेब्रुवारीअखेर होईल. तसेच थंडीमुळे केळी पक्व होण्याची क्रीयाही मंद होती.
यामुळे केळी काढणीचा हंगाम काही भागात १५ ते २० दिवस लांबणीवर पडला आहे.
परिणामी केळीची आवक सध्या स्थिर किंवा कमी आहे. पिलबाग केळीचे चांगले व्यवस्थापन अनेकांनी केले होते.
दर्जेदार केळीची आवक पिलबाग केळीतून सुरू आहे. या केळीसही कमाल १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खानदेशात मिळत आहे.
दर टिकून असल्याने नफाही बरा आहे. कारण मागील काळात किंवा कोविडमध्ये मोठा तोटा केळी उत्पादकांना जिल्ह्यात सहन करावा लागला होता.
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही केळीची आवक कमी आहे. मध्य प्रदेशातील बडवानी, बऱ्हाणपूर या भागातही केळी काढणीवर नाही.
तेथेही सध्या प्रतिदिन १०० ट्रक केळीची आवक होत असून, किमान ९०० व कमाल १४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. राज्यात मुंबई, ठाणे, कल्याण, नागपूर परराज्यात छत्तीसगड येथे केळीची पाठणूक जिल्ह्यातून होत आहे.
उत्तर भारतात केळीला हवी तेवढी मागणी नाही. फक्त दिल्लीमधील काही मॉलधारकांकडून निर्यातक्षम केळीची मागणी येत आहे. ही मागणीदेखील कमी आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.