
Dairy Update : केंद्र सरकार (Central Government) दुग्धजन्य पदार्थ जसे की, लोणी आणि तूपाची मर्यादित आयात करण्याची शक्यता आहे.
याबाबतचे संकेत पशुसंवर्धन आणि दुग्ध विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह (Rajesh Kumar Singh) यांनी बुधवारी (ता.५) पत्रकार परिषदेत दिले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांची चिंता वाढली आहे.
आधीच लम्पीच्या (Lumpy) तडाख्यात सापडलेल्या दूध उत्पादकांची (Milk Producer) सरकार आयातीचा निर्णय घेऊन कोंडी करण्याची शक्यता आहे.
"उन्हाळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेकडील राज्यातील दुधाचा साठा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकार तूप आणि लोणी आयातीच्या दृष्टीने पाऊल टाकू शकते.
मर्यादित प्रमाणात लोणी आणि तुपाच्या आयतीला परवानगी देण्याचा सरकार विचार करत आहे." असे पशुसंवर्धन आणि दुग्ध विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह म्हणाले.
लम्पी आणि कोविडमुळे देशात दुधाच्या मागणीत ८-१० वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार लोणी आणि तूप आयातीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारताने यापूर्वी २०११ मध्ये दूधजन्य पदार्थांची आयात केली होती.
त्यानंतर २०२१-२२ मध्ये देशातील दूध उत्पादन ६.२५ टक्क्यांनी वाढून २ हजार २१० लाख टनावर पोहचले होते. जे की मागच्या वर्षी २ हजार ८० लाख टन दूध उत्पादन झाले. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांची लोणी आणि तुपाची टंचाई निर्माण होऊ शकते.
सिंग म्हणाले की, "२०२२-२३ मध्ये दूधाचे उत्पादन एकतर स्थिर राहील किंवा १ ते २ टक्क्यांनी वाढेल. कोविडनंतर दुधाच्या मागणीत ८-१० टक्के वाढ झाली. सहकारी संस्थांच्या दुधाच्या उत्पादनातही वाढ १ ते २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर खाजगी क्षेत्रातील आकडेवारी स्थिर असल्याचे दिसते."
मागील काही दिवसात देशातील महत्त्वाच्या डेअरीने दुधाच्या विक्री दरात वाढ केली आहे. देशातील महागाईचा आगडोंब रोखण्यात सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता आयातीचे शस्त्र उगारून दूध उत्पादकांच्या ताटात माती मिसळण्याच्या तयारीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया दूध उत्पादक व्यक्त करत आहेत.
पुढे सिंग म्हणाले, "आयात लोणी आणि तूपावर कोणतीही सूट दिली जाणार नाही. तसेच त्यांच्या किंमतीही देशांतील उत्पादित लोणी आणि तुपापेक्षा स्वस्त नसतील, याची काळजी सरकार घेणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांची सरकार काळजी घेईल. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या मार्फत ही आयात केली जाईल. तसेच सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाईल."
"देशाच्या दूध पुरवठ्यात कसल्याही मर्यादा नाहीत. दूध पावडरही गरजे इतके आहे. परंतु चीज, लोणी आणि तूपाचा साठा मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे लोणी आणि तूपाची आयात केली तरी त्याच्या किंमती लगेच कमी होणार नाहीत. कारण अलीकडच्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात लोणी आणि तुपाच्या किंमती स्थिर आहेत." असेही सिंग म्हणाले.
"मागील काही दिवसांपासून देशातील विविध भागात पाऊस पडतो आहे. त्यामुळे तापमानात घट झाली. परिणाम चार पिकांची टंचाई भासणार नाही. त्यामुळे उत्तर भारतात दुग्धजन्य पदार्थांचा तुटवडा होणार नाही.
देशात लम्पी स्कीन आजाराने थैमान घातल्याने मागच्या वर्षी १.८९ लाख गायीचा मृत्यू झाला. त्याचाही परिणाम दूध उत्पादनावर झाला. त्यामुळे दरवर्षी ६ टक्क्यांनी वाढणाऱ्या दूध उत्पादनात यंदा १ ते २ टक्के वाढ होऊ शकेल. किंवा उत्पादन स्थिर राहण्याची शक्यता आहे." असेही सिंग म्हणाले.
दरम्यान, यावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी केंद्रीय पशुसंवर्धन, डेअरी आणि मत्स्य विभागाचे मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना पत्र लिहून केंद्र सरकार भविष्यात लोणी आणि तूप दुग्ध उत्पादनांच्या आयातीचा विचार करत आहे. केंद्र सरकारचा या संदर्भातील कोणताही निर्णय स्वीकारता येणार नाही, असे पवार या पत्रात म्हणाले.
दूध उत्पादनांची आयात केल्यास याचा देशातील दूध उत्पादकांवर थेट परिणाम होईल. केंद्र सरकारचा अशा प्रकारचा निर्णय दूध व्यवसाय पुन्हा उभारी घेत असताना झाल्यास त्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
केंद्र सरकारनं या गोष्टीकडे लक्ष द्यावं. आपल्या मंत्रालयानं यासंदर्भात दखल घेऊन दूध उत्पादनांची आयात करण्याच धोरण रद्द केल्यास आनंद होईल, असं शरद पवार म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.