
Akola News स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातील ‘स्मार्ट कॉटन’ (SMART Cotton) या उपप्रकल्पाअंतर्गत अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात राज्यात सर्वाधिक कापूस गाठी (Cotton Bales) तयार करण्यात आल्याचा दावा होत आहे. या गाठी आता सातासमुद्रापार जाण्यास तयार आहेत.
कृषी विभागाच्या पुढाकाराने व शेतकरी गटांच्या माध्यमातून ही अभिमानास्पद कामगिरी घडली आहे. ‘स्मार्ट’ प्रकल्पाअंतर्गत अकोट तालुक्यात ‘स्मार्ट कॉटन’ हा उपप्रकल्प २०२२-२३ मध्ये राबविण्यात आला.
या अंतर्गत अकोट तालुक्यातील एकजिनसी कापसावर प्रक्रिया करून तयार झालेल्या रुई गाठींचा ‘अकोट ब्रँड’ तयार करणे व त्याची राज्यांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात ई लिलावाद्वारे विक्री करून थेट शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा पोचविण्यात आला.
४ शेतकरी गटांनी या प्रकल्पात सहभाग घेतला. कृषी सहाय्यकांमार्फत या सर्व गावांमध्ये लागवड पूर्व प्रशिक्षण, वाणाची निवड, पिकाच्या स्थिती नुसार शेतीशाळा, शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञामार्फत वेचणीपूर्व प्रशिक्षण घेऊन स्वच्छ व एकजिनसी कापूस निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात आले.
१४ गटांपैकी एकता शेतकरी गट मिर्झापूर, रॉयल कास्तकार शेतकरी गट पुंडा, श्री झोटिंग महाराज शेतकरी गट रंभापूर व लक्ष्मी माता शेतकरी गट अडगाव खुर्दमधील शेतकऱ्यांनी एकूण २८६८ क्विंटल कापूस एकत्रित करून त्यावर प्रक्रिया केली. रुई आणि सरकी वेगळी करून रुईच्या गाठी तयार करण्यासाठी ‘खुशी कॉट्सपिन’ अकोट यांच्याशी ‘महाकॉट’मार्फत करार करण्यात आला.
प्रक्रिया करून तयार झालेली सर्व गटांची एकूण १७६४ क्विंटल सरकी ई लिलाव पद्धतीने विक्री करून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या कापसाच्या प्रमाणात वर्ग केली. सरकीला ३४४० ते ३९४० असा उच्च दर मिळाला.
या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, ‘स्मार्ट कॉटन’चे राज्याचे नोडल अधिकारी जयेश महाजन, तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे, तत्कालीन आत्मा प्रकल्प संचालक आरिफ शहा, विभागीय नोडल अधिकारी श्री. सातपुते,
तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे, जिल्हा नोडल अधिकारी मिलिंद जंजाळ, मनीष मनभेकर, मंडळ कृषी अधिकारी पुरुषोत्तम धुमाळे, अतुल भारसाकले, अनंत देशमुख, कृषी पर्यवेक्षक गणेश निगुडे, सदानंद इंगळे, कृषी सहाय्यक वैजनाथ मिसाळ, राजू राजूरकर,
प्रशांत ठाकरे, किशोर आचपळे, शेतकरी गटाचे प्रमुख उमेश सपकाळ (मिर्झापूर), अविनाश गीते (रंभापूर), विजय कुलट (पुंडा) व रमेश धुळे (अडगाव खुर्द), जीवन गावंडे, हितेश सरप, नवीन चांडक यांचे योगदान राहिले.
दोन तालुक्यांत ८२२ गाठी तयार
‘स्मार्ट कॉटन’ प्रकल्पात नऊ जिल्ह्यांचा सहभाग होता. या जिल्ह्यांत २ हजार ९७२ गाठी तयार झाल्या. त्यात सर्वाधिक ६०७ गाठी एकट्या अकोट तालुक्याने तयार केल्या. त्यामुळे अकोला जिल्हा हा अकोट आणि अकोला तालुक्याच्या मदतीने ८२२ गाठी तयार झाल्या. प्रत्येक गटाच्या रुईची सिरकॉट नागपूर मार्फत तपासणी करून त्यांची तंतू लांबी, ताकद, माईक, शुद्धता याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
गटनिहाय गाठी --
एकता शेतकरी गट (मिर्झापूर) ः १३२ गाठी
रॉयल कास्तकार शेतकरी गट पुंडा ः १५२ गाठी
श्री झोटिंग महाराज शेतकरी गट रंभापूर ः१६५ गाठी
लक्ष्मी माता शेतकरी गट अडगाव खुर्द ः १५८ गाठी
एकूण ः ६०७ गाठी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.