
Poultry Industry News नाशिक : गेल्या दोन-तीन वर्षांपासून कुक्कुटपालन (Poultry Farming) व्यवसायात कुक्कुट खाद्यासाठी (Poultry Feed) लागणाऱ्या कच्च्या मालामध्ये मका, सोयाबीन, तांदूळ कणी या दरात मोठी वाढ झाली आहे. परिणामी अंडी उत्पादन खर्च (Egg Production Cost) वाढता आहे.
मात्र असे असताना राष्ट्रीय अंडी समन्वय समितीचे जाहीर होणारे दर उत्पादन खर्चापेक्षा अनेकदा कमी राहिल्याने कुक्कटपालकांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
उत्पादन खर्चाच्या खाली अंडी दर मिळत असल्याने राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या मनमानी कारभाराबद्दल कुक्कटपालकांनी संताप व्यक्त केला आहे. या बाबत उत्तर महाराष्ट्र अंडी उत्पादक संघटनेने पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट प्रवरानगर (जि. नगर) येथे भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले आहे.
मागील तीन वर्षांपासून अंड्याचे दर हे मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून नसून राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या हातात असल्याची स्थिती आहे. त्यामुळे उत्पादन खर्च व मिळणाऱ्या दरात तफावत असल्याने मागील पंधरा दिवसांत नाशिक जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या पोल्ट्री व्यवसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
परिणामी अंडी उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास ४० टक्के पक्षीगृह सध्या बंद असल्याची स्थिती आहे.त्यामुळे कुक्कुटपालक व संबंधित उद्योजक मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जात आहे.
असे असताना थोड्याफार वाढलेल्या भावाचा फायदा मिळण्यासारखी मागच्या महिन्यात परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यात मागणी आहे, असे असताना अचानक अंड्याचे दर कमी केल्याने अंडी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.
या प्रश्नावर उत्तर महाराष्ट्रातील अंडी उत्पादक शेतकऱ्यांनी मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या.
अंड्याला योग्य ती मागणी असतानाही अचानक एक-दोन दिवसांत दीड रुपयाने अंड्याचे दर कमी करून राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने मनमानी कारभार प्रदर्शन केल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप केला करण्यात आला आहे. या बाबत निवेदन देण्यात आले आहे.
दखल घेत समस्यांवर विचार करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन विखे यांनी दिले. या वेळी कुक्कटपालक व संघटनेचे उपाध्यक्ष शशिकांत तिसगे (मालेगांव), प्रकाश बिरारी, मनोज बिरारी, दिनेश हिरे, प्रभाकर बिडगर, दिनेश मराळकर यासह राज्यस्तरीय कुक्कुटपालन समन्वय समितीचे सदस्य सुदर्शन पोकळे, एकनाथ मुंगसे, धनंजय आहेर उपस्थित होते.
भाव पाडण्यामागे कोणाचा हात?
राष्ट्रीय अंडी समन्वय समितीचे देशभरात सर्वच राज्यात अंड्याचे दर काढण्यासाठी राज्यनिहाय प्रमुख आहेत; परंतु ही सर्व पदे फक्त नाममात्र आहेत.
त्यांना कुठलाही अधिकार नसून सर्व सूत्रे व्यंकटेश्वरा कंपनीच्या सर्वेसर्वा अनुराधा देसाई यांच्याच हातात आहेत, असा थेट आरोप करण्यात आला आहे.
त्या राज्याच्या कोणत्याही प्रमुखांशी बोलत नाहीत किंवा राज्यभरातल्या कुठल्याही प्रमुखांकडे त्यांचा फोन नंबर सुद्धा नाही. संवाद खंडीत आहे.
त्यामुळे मागणी असतानाही अचानक मोठ्या प्रमाणात भाव कमी करण्यामागे कोणाचा हात आहे हे शोधून काढण्याची गरज आहे, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांनी विखे पाटलांकडे केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.