
Vegetable Market Update नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Nashik APMC) सध्या पालेभाज्यांची आवक (Vegetable Arrival) मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात या पालेभाज्यांची आवक वाढल्याने दरात (Vegetable Rate) मोठी घसरण झाली आहे.
असेच कमीअधिक चित्र राज्यभरातील बाजारांमध्येही आहे. एकीकडे उंच दरात लिलाव होतात. मात्र प्रत्यक्षात दर निच्चांकी मिळत आहेत.
त्यामुळे कोथिंबीर जुडीला १ रुपया भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने विक्री न करता भाजीपाला रस्त्यावर जाणाऱ्या ग्राहकांना अक्षरशः फुकट वाटत रोष व्यक्त केला आहे.
बाजार समितीत भाजीपाला आवारात पालेभाज्या आवक वाढली आहे. एकीकडे भारनियमन वाढलेले मजुरी खर्च कृषी निवेष्ठांच्या दरा झालेली भरमसाट वाढ व त्यातच भर कडाक्याच्या उन्हात भाजीपाला वाचवत सकाळी लवकर काढणी होत आहे.
तो शेतमाल बाजार समिती आवारात आणला जात आहे. मात्र कष्टाने पिकविलेल्या शेतीमालाला अपेक्षित दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना त्यांचा भ्रमनिरास होत आहे.
कोबीची आवक अवघा दीड ते दोन रुपये किलो दराने बाजारात विक्री होत आहे. त्यामुळे पीक संरक्षण खर्चही वाढला असताना परतावा मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे कोबी उत्पादक शेतकरीही मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
नाशिक बाजार आवारात शुक्रवारी (ता. २४) एक किलो वजनाची कोथिंबीर जुडी १ रुपयाला लिलावात पुकारली. दर पडले तरी अनेक शेतकरी नुकसान सोसून परततात.
एकीकडे लिलाव करण्यासाठी भाजीपाला खाली करायचा आणि लिलाव झाल्यानंतर तो पुन्हा भाजीपाला भरायचा, हे परवडत नाही, त्यामुळे भीक मागितल्यासारखी परिस्थिती आहे.
एखादे नग कमाल दरात बोली लावून खरेदी केले जाते, तर दुसरे पडत्या दरात खरेदी होते. दराच्या बाबतीत मोठी दिशाभूल केली जात आहे, अशी घडलेली परिस्थिती शेतकरी सुभाष पुरकर यांनी सांगितली.
पिकविणारा तोट्यात; विकणारा नफ्यात
बाजार समितीतून लिलाव झाल्यानंतर एक किलो वजनाची पालेभाजीची मातीमोल दराने खरेदी होते. मात्र लिलाव झाल्यानंतर भाजीपाला विक्रेते याच एका जूडीपासून चार ते पाच जुड्या तयार करून ग्राहकांना विक्री करतात.
त्यामुळे विभाजन करूनही याच भावाने एका जुडीची विक्री होते. त्यामुळे पिकविणारा तोट्यात व विकणारा नफ्यात अशी परिस्थिती आहे.
एक किलो वजनाच्या जुडीला मिळालेले सरासरी दर
पालेभाजी...किमान...कमाल...सरासरी
कोथिंबीर...१,५००...१,७५०...१,२००
मेथी...४००...१,५००...१,०००
शेपू...२००...१,०००...५५०
कांदापात...६००...१,८००...१,४००
(संदर्भ : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, १८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान)
बाजारात आणलेला भाजीपाला पडत्या भावात विकावा लागत आहे. त्यातच व्यापारी लिलाव झाल्यानंतर वांधा काढतात. त्यामुळे अवघ्या १ रुपया दराने कोथिंबीर विकली जात आहे. त्यामुळे काढणी व वाहतूक परवडत नाही. व्यापाऱ्यांची मनमानी अडचणीची ठरत आहे.
- सुभाष पुरकर, भाजीपाला उत्पादक, धोंडगव्हाण, ता. चांदवड
पदरमोड करून भांडवल उभे करायचे, शेतमाल उत्पादन घ्यायचे. त्यातही भाव नसल्याने सर्व अवघड झाले आहे. व्यापारी एकी करून भाजीपाल्याचे दर पाडतात. शासकीय यंत्रणांनी यात लक्ष देणे गरजेचे आहे.
-कृष्णा उगले, भाजीपाला उत्पादक, जोपुळ, ता. दिंडोरी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.