
अमरावती : सोयाबीनचे दर (Soybean Rate) पाच हजार रुपयांवर स्थिरावल्याने येत्या काळात दरवाढ होईल यापेक्षा शेतकरी आपला शेतीमाल तारण (Agriculture Produce Mortgage) ठेवण्यावर भर देत आहेत. अमरावती बाजार समितीने तब्बल ३४ कोटी रुपयांचे वाटप तारणापोटी वाटप केले आहे.
विदर्भातील बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनची आवक मंदावली आहे. येत्या काळात सोयाबीनच्या दरात तेजी येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्याच कारणामुळे शेतकरी सोयाबीन विकण्याऐवजी गरजेपुरता पैसा उपलब्ध करून घेण्यासाठी सोयाबीन तारण ठेवण्यावर भर देत आहेत. विदर्भातील सर्वच बाजार समित्यांमध्ये ही स्थिती असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीमध्ये हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी सोयाबीन तारण ठेवण्यावर भर दिला. त्यामुळे बाजार समितीचे सर्व गोदाम हाउसफुल झाले आहेत. तब्बल वीस हजार क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांनी तारण ठेवले आहे. अमरावती बाजार समितीमध्ये देखील शेतकऱ्यांनी सोयाबीन तारण ठेवत ३४ कोटींची उचल केली आहे.
अकोला, वाशीम, वर्धा या बाजार समितीमध्ये देखील शेतकऱ्यांनी शेतीमाल तारण ठेवण्यावरच भर दिला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या योजनेत मूग, हरभरा, सोयाबीन, तूर, सूर्यफूल, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा हा शेतीमाल तारण ठेवता येतो.
१८० दिवसांपर्यंत तीन टक्के व्याज आकारणी
शेतीमाला तारण योजनेत शेतकरी सोयाबीन, तूर व हरभरा तारण ठेवू शकतात. यावर १८० दिवसांपर्यंत तीन टक्के व त्यानंतर वार्षिक सहा टक्के व्याजाची आकारणी बाजार समितीद्वारे केली जाते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.