सातारा : राज्यातील आले (अद्रक) पिकात (Ginger Crop) वाढत्या अडचणींमुळे पिकाचा तिखटपणा व उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक गोडवा कमी झाला आहे. आले उत्पादक (Ginger Production) जिल्ह्यांत पीक ‘धरता ही येत नाही आणि सोडताही येत नाही’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. परिणामी, आले पीक उत्पादकतेत (Ginger Productivity) किमान ३० टक्के आणि उत्पादन खर्चात ४० टक्के वाढ झाल्याने आणि बाजारभावातही (Ginger Rate) शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांकरिता हे पीक आतबट्ट्याचे ठरू लागले आहे.
राज्यात ‘सातारी आले’ पिकांची स्वतंत्र ओळख आहे. सातारा जिल्ह्यात आल्याच्या या वाणाला तिखटपणामुळे मागणी चांगली असते. परंतु पाच ते सहा वर्षापासून आले पीक आणि उत्पादक शेतकरी विविध कारणाने अडचणीत आले आणि क्षेत्रातही मोठी घसरण झाली आहे. यात प्रामुख्याने रोग-किडींचे वाढते प्रमाण, घटलेली उत्पादकता, अति पाऊस, वाढता उत्पादन खर्च, बाजार दरातील तफावत यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
उत्पादन खर्च वाढला...
आले पिकांस कमीत कमी एकरी किमान ७५ हजारांपासून चे दीड लाखापर्यंत सरासरी खर्च येतो. मात्र मूळकुज, कंदमाशी, करपा आदी रोग-किडीमुळे फवारण्यांचा एकरी किमान ३० हजारांवर खर्च वाढला आहे. इतर पिकांच्या तुलनेत लागवडीपासून किमान सहा महिने हातावरील फोडाप्रमाणे जपावे लागते.
मागील चार ते पाच वर्षात कमी वेळेत जास्त होत असलेल्या पावसाचा फटका पिकास बसत आहे. अतिपाऊस व कंदमाशी यामुळे मूळकुज वाढली आहे. एकट्या सातारा जिल्ह्याचा विचार केल्यास एकूण क्षेत्राच्या ६० टक्के क्षेत्रावर मूळकुजीचा प्रादुर्भाव झाला आहे. हे कमी काय म्हणून जास्त आर्दतेमुळे आल्याच्या पानावर मोठ्या प्रमाणात करप्याचा प्रादुर्भाव वाढला आहे.
उत्पादकता घटली...
आले पीक किमान नऊ महिने जमिनीखाली राहिल्यास पक्व झाल्यावर उत्पादन मिळते. जमिनीखाली पीक असल्याने अनेक वेळा पीक उत्पादनाचे अंदाज चुकतात. अशात दरातील घसरण शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत असते. आले पिकांच्या एकरी सरासरी २५ ते ३० गाड्यांचे (प्रतिगाडी ५०० किलो) उत्पादनात मिळते. मात्र विविध समस्यांमुळे ३० टक्के उत्पादनात घट होत असल्याची दिसून आले आहे. यामुळे एकरी कशातरी १५ ते २० गाड्या मिळत आहेत. भांडवली खर्च, उत्पादनातील घट, कीड व रोगाचे वाढलेले प्रमाण ही गणिती जुळत नसल्याने आले उत्पादकांची होरपळ सुरूच आहे.
पीकविम्यात समावेश हवा...
आले हे नगदी पीक असून देशात आले उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे पीक उत्पादकता सतत प्रभावित होत आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा वाढला आहे. परिणामी, क्षेत्र घटू लागले आहे. या पिकाचा विम्यात समावेश नसल्याने शेतकऱ्यांना हे नुकसान अंगावर काढावे लागत आहे. राज्यशासनाने या नगदी पिकाचा समावेश पीकविमा योजनेत करावा, अशी मागणी आले उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.
दृष्टिक्षेपात आले पीक :
राज्यातील लागवड : सुमारे १५ ते २० हजार हेक्टर
प्रमुख जिल्हे : सातारा, औरंगाबाद, सांगली, पुणे बीड, वाशीम आदी
सर्वाधिक लागवड : सातारा आणि औरंगाबाद
वाण : सातारी आले, औरंगाबादी, ग्रोथा आदी
पीक उपयुक्तता : मसाले, अन्न, औषधनिर्मितीत वापर
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.