
Hapus Market Update : जिल्ह्यात हापूस आंब्याला वाढती मागणी असताना आवकेत (Mango Arrival) मात्र घट झाली आहे. ऐन हंगामात हापूसची आवक घटल्यामुळे चाकरमान्यांना आंबा मिळेनासा झाला आहे. तिसऱ्या टप्प्यातील हापूस संकटात सापडल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. दरम्यान, आंब्याचा दर प्रतिपेटी साडेतीन ते चार हजार रुपये कायम आहे.
सिंधुदुर्गात या वर्षी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ५० टक्के उत्पादन आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु धुके, ढगाळ वातावरण आणि वाढत्या तापमानामुळे तिसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहोराचे नुकसान झाले. किरकोळ प्रमाणात मोहोर टिकला.
एप्रिल मध्यापर्यंत दुसऱ्या टप्प्यातील आंब्याची आवक सुरू होती. त्यानंतर आवक कमी होऊ लागली. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुंबई आणि पुण्याहून लाखो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. याशिवाय सुट्टी असल्याने हजारो पर्यटक सिंधुदुर्गात दररोज येत आहेत.
परंतु आंबा व्यवसायासाठी चांगला हंगाम असताना आवकेत मात्र घट झाली आहे. त्यामुळे आंब्याचे दर स्थिर राहिले आहेत. सध्या देवगड हापूस आंबा प्रति डझन ८०० ते ९०० रुपयांनी विक्री केला जात आहे. तर पेटी डझनाचा दर साडेतीन हजार ते चार हजार रुपये आहे.
देवगड, मालवण, वेंगुर्ला तालुक्यांतील आंब्याची स्थिती अशाच प्रकारची असून पूर्वपट्ट्यातील आंब्याने देखील निराशा केली आहे. पूर्वपट्ट्यातील आंबादेखील अजूनही बाजारपेठेत दिसेनासा झाला आहे.
पूर्वपट्ट्यातील वैभववाडी, कणकवली आणि कुडाळ तालुक्यांतील काही आंबा एप्रिल अखेरीपासून बाजारपेठेत विक्रीला येतो, परंतु अजूनही आंबा आलेला नाही. काही भागात आता सुपारीच्या आकाराचे आंबे आहेत त्यामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा २० जूनला तयार होण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.