
कोल्हापूर : राज्यातील केळीला टनाला (Banana Rate) विभागानुसार १० हजार ते १५ हजार रुपये दर मिळत आहे. दोन महिन्यांच्या तुलनेत उच्चांकी नसले तरी नवरात्रीमुळे (Banana Rate Improve Due To Navratri) गेल्या महिन्याभरापासून टनास २००० ते ३००० रुपयांची वाढ झाली आहे. मागणीच्या (Banana Demand) प्रमाणात केळीचा पुरेसा पुरवठा (Banana Supply) नसल्याने येत्या दोन महिन्यांत तरी हे भाव स्थिर राहतील, अशी शक्यता केळी उद्योगातून (Banana Market) व्यक्त होत आहे.
राज्यातील केळी दराला अपेक्षित उच्चांकी भाव मिळत नसला तरी सध्या मिळणारे भाव समाधानकारक व अधिक काळ टिकणारे असतील असा आशावाद केळी व्यवसायातील सूत्रांचा आहे. केळी दरात गेल्या सहा महिन्यांपासून अनपेक्षित चढ-उतार आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केळी दरात घसरण झाली होती.
यामुळे अनेक उत्पादकांनी केळी बागा काढून टाकल्या. कोरोनाचा धोका दूर झाल्यानंतर जानेवारीपासून केळीच्या दरात मोठी वाढ होत गेली. पश्चिम महाराष्ट्रात तर अक्षरशः बोटावर मोजण्याइतक्या केळीच्या बागा उरल्या. यामुळे केळीच्या दरात शीघ्र गतीने सुधारणा झाली. केळीला मिळणारा ४००० ते ५००० रुपयांचा दर मे-जून या कालावधीत २० हजार रुपयांच्या पार जाऊन पोहोचला.
केळीची उपलब्धता नसल्याने दर कायमच तेजीत राहतील, असे चित्र या वेळी निर्माण झाले. पण जुलै-ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा केळीचे दर एकदम खाली आले. विशेष म्हणजे केळी कमी प्रमाणात असूनही केळीचा दर टनाला १० हजार रुपयांच्या आत आला. यामुळे केळी उत्पादकांमध्ये पुन्हा निराशा आली. साधारणतः गणेशोत्सवापर्यंत केळीचे दर मंदीतच होते.
गणेशोत्सवानंतर वाढ
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मात्र वाढती मागणी लक्षात घेता पुन्हा दरात हळूहळू सुधारणा होत राहिली. सरासरी राज्यातला दर १२ हजार ते १३ हजार रुपयांपर्यंत गेला. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दर उच्चांकी पातळीवर पोहोचतील किमान १८ हजार ते २१ हजार रुपयांपर्यंत जातील, अशी अपेक्षा होती. ती मात्र सध्या तरी पूर्ण होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. नवरात्र सुरू होऊन चार दिवसांचा कालावधी लोटला तरीही दर १० हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यानच आहेत.
मागणी कायम राहण्याची शक्यता
सणासुदीमुळे येथून पुढील एक ते दोन महिना तरी मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे दर या रेंजच्या खाली येणार नाहीत, अशी अपेक्षा केळी उत्पादक व व्यापाऱ्यांचीही आहे. दर एकदम कमी असण्यापेक्षा मिळणारे दरसुद्धा समाधानकारक असल्याचे केळी बागायतदारांनी सांगितले. मध्यंतरीच्या काळात दर एकदम २० हजार ते २१ हजार रुपये इतके उच्चांकी गेले होते.
त्या काळात केळीचा एकदमच तुटवडा निर्माण झाला होता. आता जळगाव व काही भागांत केळीची उपलब्धता कमी असली तरी एकदमच चणचण नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. खानदेश सोलापूरच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रात मात्र केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने या भागात स्थानिक केळीची उपलब्धता अत्यंत कमी असल्याचे केळी उबवनगृह चालकांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.