
Palghar Paddy Procurement News : आदिवासी विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयामार्फत ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यांमध्ये ५१ धान खरेदी केंद्रांवर (Paddy Procurement Center) ६ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे.
खरेदी योजनेची (Paddy Procurement Scheme) अंतिम मुदत ३१ जानेवारी असल्याकारणाने ३० हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली असताना केवळ १५ हजार शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर विक्रीकरिता धान दिले आहे. आधारभूत किंमत धान खरेदीला शासनाने मुदतवाढ दिली नसल्याने मंगळवारी (ता. ३१) धान खरेदी बंद झाली आहे.
अद्यापही १५ हजार शेतकऱ्यांकडे धान असल्याची माहिती असून मुदतवाढ न मिळाल्यास शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दारात जाऊन कमी किमतीत धान विकावा लागणार आहे.
राज्य शासनाच्या आधारभूत खरेदीची ३१ जानेवारी अंतिम मुदत होती; परंतु आदिवासी विकास महामंडळ विभागीय कार्यालय जव्हार अंतर्गत एकूण तीस हजार शेतकऱ्यांनी धान्य विक्री करण्याकरिता ऑनलाईन नोंदणी केली होती.
त्यापैकी पंधरा हजार शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यात आली असून उर्वरित पंधरा हजार शेतकऱ्यांचे धान अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे खरेदीची मुदत संपल्याने शेतकरी हवालदिल होऊन व्यापाऱ्यांच्या दारात जाताना दिसत आहे.
प्रशासकीय स्तरावर अजून काही दिवस धान खरेदीची मुदत वाढवून देणे गरजेचे असून येथील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी प्रशासन स्तरावर निर्णय घेणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मुदत संपल्याने शेतकरी चिंताग्रस्त
जव्हार भागातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्य विक्रीतून आलेल्या पैशांचा उपयोग हा प्रपंचासाठी होत असतो.
त्यातच काही शेतकऱ्यांची खरेदी होणे बाकी असताना धान्य खरेदीची मुदत संपते की काय, अशी द्विधा मनस्थिती झाल्याने खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणलेले भात पुन्हा घेऊन जाण्याची वेळ येते की काय, वाहतुकीचे पैसे पाण्यात जाऊन शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल, अशा विवंचनेत शेतकरी पडले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.