यंदा भारताची तांदूळ निर्यात (India Rice Export) २५ टक्के घटण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने तांदूळ निर्यातीच्या (Rice Export Policy Decision) संदर्भात घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे आयातदार देश (Rice Importer Country) भारताच्या स्पर्धक देशांतून स्वस्तात तांदूळ खरेदीला पसंती देण्याची चिन्हे आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे.
भारत हा जगातील सगळ्यात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली तसेच बिगिर बासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के कर लावला.
‘‘निर्यातीवरील करामुळे भारताचा तांदूळ महाग झाला आहे. त्यामुळे निर्यात किमान ५० लाख टनांनी घटेल,'' असे दि राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बी व्ही कृष्णा राव म्हणाले. त्यामुळे यंदा निर्यात १६२ लाख टन राहण्याची शक्यता आहे.
२०२१-२२ मध्य भारताने विक्रमी तांदूळ निर्यात केली होती. तब्बल २१२ लाख टन तांदूळ निर्यात करण्यात आला होता. थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि अमेरिका या जगातील चार बड्या निर्यातदार देशांनी मिळून केलेल्या तांदूळ निर्यातीपेक्षा हा आकडा मोठा होता.
केंद्र सरकारने केवळ पांढऱ्या तांदळावर निर्यात शुल्क लावलं आहे. त्यामुळे काही खरेदीदार परबॉईल्ड तांदळाची खरेदी वाढवतील. या तांदळाला निर्यातकरातून वगळलं आहे, असे राव म्हणाले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत भारताची तांदूळ निर्यात ९३.६ लाख टनावर पोहोचली. गेल्या वर्षी याच कालावधीत ८३.६ लाख टन तांदूळ निर्यात झाला होता.
‘‘ चालू आर्थिक वर्षात यापूर्वीच बराचसा तांदूळ निर्यात झालेला आहे. परंतु केंद्र सरकारने नुकतेच जे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, त्यामुळे येत्या काही महिन्यांत निर्यातीत मोठी घट होण्याची शक्यता आहे,'' असे नवी दिल्लीतील एक निर्यातदार देव गर्ग यांनी सांगितले.
भारतातून तांदळाचा पुरवठा घटल्यामुळे स्पर्धक देशांनी किंमती वाढवायला सुरूवात केली आहे; त्यामुळे येत्या काही दिवसांत भारताचा तांदूळ जागतिक बाजारात स्पर्धा करू शकेल, असे ‘ओलाम इंडिया'चे उपाध्यक्ष नितिन गुप्ता म्हणाले. भारताने निर्यातीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर थायलंड, व्हिएतनाम आणि इतर पुरवठादार देशांनी पांढऱ्या तांदळाची किंमत वाढवली आहे.
‘‘भारत हा पांढऱ्या तांदळाचा सगळ्यात स्वस्त पुरवठादार होता. आता सरकारने निर्यातीवर कर लावल्यामुळे भारताचा तांदूळ महाग होईल किंवा इतर पुरवठादार देशांतील दराच्या बरोबरीने हा तांदूळ पडेल,'' असे भारतातील सगळ्यात मोठा तांदूळ निर्यातदार फर्म असलेल्या सत्यम बालाजीचे कार्यकारी संचालक हिमांशु अगरवाल यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.