बियाणे दरवाढीचे दरवर्षी शेतकऱ्यांच्या डोक्यावर ओझे

खरीप हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी बाजारात बियाणे आले की कंपन्यांकडून बियाण्यांचे दर जाहीर केले जातात.
Seed
SeedAgrowon

अकोला ः खरीप हंगामाला (Kharif Season) सुरुवात होण्यापूर्वी बाजारात बियाणे (Seed) आले की कंपन्यांकडून बियाण्यांचे दर (Seed Price) जाहीर केले जातात. मागील तीन-चार वर्षांत सर्वच प्रमुख पिकांचे बियाणे महागले (Seed Rate Increased) आहे. प्रामुख्याने सोयाबीन बियाणे (Soybean Seed) तीन वर्षांत जवळपास प्रतिबॅग हजार रुपयांनी महाग झाले आहे. याची मोठी झळ शेतकऱ्याच्या खिशाला बसते आहे.

खरीप हंगामात सोयाबीन व कापूस ही दोन मुख्य पिके आहेत. सोयाबीनचे पीक प्रामुख्याने सर्वत्रच घेतले जाते. बाजारपेठेत दर बऱ्यापैकी मिळत आहेत. त्यामुळे तसेच इतर पिकांच्या तुलनेत व्यवस्‍थापनाचा ताण कमी असल्याने सोयाबीन पिकाला पसंती कमी झालेली नाही. मागील दोन वर्षांत काढणीच्या काळात पावसाने अतोनात नुकसान केले. तरीही यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात घट होईल, अशी परिस्थिती नाही.

अद्याप पाऊस आलेला नसल्याने पेरण्या सुरु झालेल्या नाहीत. मात्र, बियाणे बाजारात घडामोडी जोरात आहेत. सोयाबीनच्या बियाण्याने यंदा हनुमान उडी घेतली आहे. साधारणपणे दोन वर्षांपूर्वी ३० किलो वजनाची बॅग २९०० रुपयांपर्यंत मिळत होती. यंदा सर्वच कंपन्यांचे बियाणे हजार रुपयांनी महागले. महाबीजसारख्या शासनाच्या अंगीकृत महामंडळाने सोयाबीन बियाण्याचा दर यंदा १३० ते १४५ रुपये प्रतिकिलो असा जाहीर केला. गेल्या हंगामात हाच दर ७५ ते ८२ रुपयांपर्यंत काढलेला होता. एकाच वर्षात हे बियाणे किलोमागे ५५ रुपयांपासून ७० रुपयांपर्यंत महाग केले आहे. वाढीचा हा दर जवळपास दुप्पट आहे.

कपाशी बियाणेही महागले

कपाशीचे बीटी बियाणे पाकीटही वर्षाला ३० ते ४० रुपयांनी महाग होत आहे. दोन वर्षांपूर्वी ३० रुपयांनी दरवाढ झाली होती. यंदा पाकिटामागे ४० रुपये दर वाढवण्यात आले. यंदा पाकिटाची एमआरपी ८१० रुपये ठेवलेली आहे. बाजारात प्रत्यक्षात ७५० पासून ७७० रुपयांपर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांचे कापूस बियाणे मिळते. मक्याच्या बियाण्याचा दर फारसा वाढलेला दिसत नाही. यंदा हजारपासून १२५० रुपयांपर्यंत मक्याच्या बियाण्याची चार किलोची बॅग मिळते. यापूर्वी जवळपास एवढाच दर होता, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

कापूस, सोयाबीन या पिकांचा उत्पादन खर्च वर्षाला वाढत आहे. दुसरीकडे उत्पादनात शाश्‍वती राहिलेली नाही. सोयाबीनसारखे पीक पावसाच्या तडाख्यात सापडण्याचे प्रकार सर्रास होत आहेत.

निंभारा (ता. बार्शीटाकळी) येथील प्रगतिशील शेतकरी गणेश नानोटे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांवर संकट चौफेर येत आहे. बियाण्याची भाववाढ मागील काही वर्षांत दरवर्षाला १५ ते २० टक्के होत आहे. त्या प्रमाणात मागील वर्ष वगळता सोयाबीनचे भाव बघितले तर ते स्थिर आहेत. आपण भाववाढ दराचा विचार केला तर हंगामात शेतकरी जवळपास ६० ते ७० टक्के शेतकरी सोयाबीन विक्री करतात. त्यानंतर सोयाबीन भाववाढ झालेली दिसते.’’

आता शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे विकत घेण्यासाठी १२० ते १३० रुपये द्यावे लागत आहेत. बाकी बियाण्यांची सुद्धा भाववाढ होत आहे. तुरीचे चांगल्या दर्जाच्या बियाण्याचे भाव वाढले आहेत.
गणेश नानोटे, प्रगतिशील शेतकरी, निंभारा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com