
यंदा देशात जून महिन्यात पावसाने (Rain) दडी मारली. तर जुलैमध्ये अतिपाऊस (Excessive Rain) झाला. परंतु तरीही देशात टोमॅटो (Tomato), बटाटा (Potato) आणि कांदा पिकांच्या लागवडीवर (Onion Cultivation) फारसा परिणाम झाला नाही, असे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे म्हणणे आहे. या तिन्ही पिकांचे लागवड क्षेत्र जवळपास गेल्या वर्षीइतकंच राहिलं असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, प्रमुख कांदा उत्पादक असलेल्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये यावर्षी २६,८४० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली. गेल्या वर्षी खरिपाच्या हंगामात हेच क्षेत्र २६,६७० हेक्टर एवढं होतं. वास्तविक महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात अति पावसामुळे कांद्याची लागवड कमी झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कृषी मंत्रालयाचा दावा आणि शेतकऱ्यांचं म्हणणं यात तफावत दिसून येत आहे.
बटाटा उत्पादक असलेल्या उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या प्रमुख पाच राज्यांमध्ये ५ जुलैअखेर ३६,१२० हेक्टर क्षेत्रावर बटाट्याची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ३६,५१० हेक्टर क्षेत्रावर बटाटा लागवड झाली होती. या आठवड्यात टोमॅटोच्या दरात घसरण झाली असून कांदा आणि बटाट्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.
नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड) द्वारे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून किंमत स्थिरीकरणासाठी रब्बी हंगामातल्या कांद्याची खरेदी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मागच्या वर्षी कांद्याच्या बफर स्टॉकसाठी दोन लाख टन कांदा खरेदी केली होती. यावर्षी मात्र अडीच लाख टन कांदा खरेदी करण्यात आला. ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान कांद्याच्या किंमती वाढल्यास हा बफर स्टॉक खुल्या बाजारात विक्रीसाठी खुला करण्यात येईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.