
१) कापसाचे दर टिकून (Cotton Rate)
देशातील बाजारात कापसाचे दर आज टिकून होते. आज कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर (Cotton Bajarbhav) मिळाला. काही बाजारांमधील दरपातळी ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान पोचली. मात्र काही बाजारांमध्येच हा दर मिळाला.
तर आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. देशात सध्या कापूस दर सुधारण्यास पुरक स्थिती आहे. त्यामुळं दरातील सुधारणा कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) सोयाबीन बाजार स्थिर (Soybean Rate)
देशातील बाजारात आज जवळपास ३ लाख ५० हजार क्विंटल सोयाबीन (Soybean) विक्रीसाठी आलं होतं. आज महाराष्ट्रातील सोयाबीन आवक जास्त होती. तर सोयाबीनला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला.
तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ५५० ते ५ हजार ६२५ रुपयांच्या दरम्यान होते. सध्या देशातून सोयापेंड (Soya Meal) निर्यात वाढली. त्यामुळं सोयाबीन दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
३) केळीला चांगला उठाव (Banana Rate)
राज्यातील बाजारात सध्या केळीची आवक कमी आहे. त्यामुळं केळीचे दर तेजीत आहेत. सध्या यावल आणि पंढरपूर बाजारात काहीशी अधिक आवक आहे. मात्र इतर बाजारांमधील आवक नगण्य पातळीवर आहे. पण उठाव चांगला आहे.
त्यामुळं सध्या केळीला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ४०० ते २ हजार ३०० रुपये दर मिळतोय. पुढील काही दिवस केळीचे दर कायम राहू शकतात, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
४) गवारचे दर तेजीत
गवारचे दर सध्या तेजीत आहेत. बाजारातील गवारची आवक खूपच कमी झाली. मात्र उठाव चांगला आहे. सध्या मुंबई, पुणे, नागपूर या बाजारांमधील आवक काहीशी अधिक दिसते. मात्र येथील आवकही सरासरीपेक्षा कमी आहे.
तर इतर बाजारांमधील आवक २ ते ३ क्विंटलच्या दरम्यान आहे. त्यामुळं गवारला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हा दर पुढील महिनाभर दिसू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
५) देशात खाद्यतेलाचा साठा किती आहे?
देशात मागील तीन महिन्यांमध्ये खाद्यतेलाचा लोंढाच आला. त्यामुळे देशातील सोयाबीन आणि मोहरी उत्पादकांसह रिफायनरी उद्योगांनाही फटका बसला. साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएने देशातील खाद्यतेल आयात विक्रमी वाढल्याचे स्पष्ट केले.
चालू तेल विपणन वर्षात पहिल्या तिमाहीत अर्थात नोव्हेंबर ते जानेवारी या काळात भारताची खाद्यतेल आयात ३१.५६ टक्क्यांनी वाढली. सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाची आयात तर विक्रमी पातळीवर पोचली. पहिल्या तिमाहीत भारतानं ४७ लाख ४६ हजार टन खाद्यतेल आयात केलं.
मागील वर्षात याच काळातील आयात ३६ लाख टन होती. खाद्यतेलाची वाढती आयात देशातील सोयाबीन गाळप यामुळं खाद्यतेलाचा स्टाॅकही विक्रमी पातळीवर पोचला. देशात १ जानेवारीपर्यंत ३२ लाख २३ हजार टन खाद्यतेलाचा साठा होता.
मागील हंगामात याच तारखेला साठा २७ लाख ७२ हजार टन तेल होतं. म्हणजेच सध्या देशात विक्रमी साठा आहे. तर दुसरीकडे देशात सोयाबीनचा हंगाम सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने सोयाबीन मागे ठेवले.
पण सोयाबीनला सोयातेलाच्या बाजुने आधार मिळत नाही. सोयातेलाचे दर दबावात आहेत. आयातीचा वेग असाच राहील्यास हा दबाव आणखी वाढेल. त्यामुळं सरकारने खाद्यतेल आयातीवरील शुल्क वाढविणं आवश्यक आहे.
सध्या सोयाबीनला ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळतोय. मात्र सोयाबीन दरावाढीसाठी सध्या पोषक स्थिती असल्याचे जाणकारांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.