
केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयातशुल्क काढणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सीसीआय बाजारभावाप्रमाणे कापूस खरेदीत उतरली. याचा फायदा कापूस बाजाराला होणार आहे. मग शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळणार का? कापसाचे दर कधी मिळणार? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.
1. सोयाबीन बाजारात बदल नाही
आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीनचा बाजार वाढीसह बंद झाला होता. शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १४.८० डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. मात्र देशातील सोयाबीन बाजार सुस्तच होता. सोयाबीनच्या दरात आजही फारसा बदल दिसला नाही. तर दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बाजारातील आवक कमी केली आहे. सोयाबीन दरात जानेवारी महिन्यात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
2. तुरीची आवक कमीच
देशात खरिपातील तूर काढणी आता वेगाने सुरु आहे. मात्र त्या प्रमाणात बाजारातील आवक वाढली नाही. सध्या बाजारातील तूर आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. कमी आवकेमुळं तुरीचे दर टिकून आहेत. सध्या देशातील बाजारात तुरीला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. यंदा शेतकरी कापूस आणि सोयाबीनप्रमाणं तुरीची विक्री टप्प्याटप्प्याने करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीचा दर तेजीत राहण्याचा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय.
3. हरभरा बाजार दबावात
खरिपातील हरभरा लागवड आता मध्यात आली. मात्र तरीही बाजारातील हरभरा दर वाढलेले नाहीत. दुसरीकडे गुणवत्तापूर्ण हरभरा मिळत नसल्याचं व्यापारी सांगत आहे. सध्या गुणवत्तापूर्ण हरभऱ्याला चांगला दर मिळतोय. मात्र सरासरी दर प्रतिक्विंटल ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. दुसरीकडे सध्या हरभऱ्याला मागणी वाढली आहे. मात्र नाफेडकडे मोठा स्टाॅक असल्यानं दरात वाढ झाली नाही. रब्बीतील हरभरा पेरणी अपेक्षेपेक्षा कमी राहील्यास हरभरा दर वाढू शकतात, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
4. हिरवी मिरची नरमली
मागील महिनाभरापासून हिरव्या मिरचीच्या दरात नरमाई दिसून आली. सध्या बाजारातील आवक काहीशी वाढली आहे. मात्र मिरचीला मागणीही आहे. सध्या मिरचीला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काही दिवस बाजारातील आवक काहीशी जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं मिरचीचे दर कायम राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
5. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापूस दर स्थिर आहेत. मात्र उद्योगांच्या लाॅबिंगनंतर शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पण आता सरकारनं कापूस उत्पादकांना दिलासा देणारे दोन निर्णय घेतले. उद्योगांनी ११ टक्के कापूस आयातशुल्क काढण्याची मागणी केली होती. मात्र सरकारनं ही मागणी फेटाळली. तसेच भारतीय कापूस महामंडळ अर्थात सीसीआयने कापसाची बाजारभावाने खरदी सुरु केली. यामुळे बाजाराला मोठा आधार मिळणार आहे. सीसीआय नेमका किती कापूस खरेदी करणार हे आताच स्पष्ट केले नाही. मात्र एक मोठा खरेदीदार बाजारात उतरला. त्यामुळे कापूस खरेदीकत स्पर्धा निर्माण होणार आहे. परिणामी कापूस बाजारात सुधारणाही होऊ शकते आणि कापूस दर पाडण्याचा व्यापाऱ्यांचा डाव पूर्ण होऊ शकणार नाही, असं जाणकार सांगत आहेत. सध्या देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार ४०० रुपये दर मिळतोय. जानेवारीत आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर सुधारण्याचा अंदाज आहे. त्या परिस्थितीत देशातील कापूस दरही वाढतील, असा अंदाज आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करणं फायदेशीर ठरेल, असं आवाहन कापूस बाजारातील जाणकारांनी केलंय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.