Sugar Export: श्रीलंकेतून भारतीय साखर, गहू पीठ, तांदळाला मागणी घटली

आता श्रीलंकेतून भारतीय साखर (Wheat), गहू पीठ (Wheat Flower), तांदूळ (Rice), काळी मिरची आणि ईलायचीला मागणी घटली.
Sugar
Sugar Agrowon

श्रीलंकेत आर्थिक संकट (Economic Crisis) निर्माण होऊन आणीबाणी लागू झाली. श्रीलंकेची अर्थव्यवस्था रसातळाला गेल्यानं भारतानंही निधी, अन्नधान्य आणि युरिची मदत केली. मात्र श्रीलंका आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर झाल्याचा भारतालाही फटका बसतोय. कारण भारतातून श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात शेतीमालाची निर्यात होते. पण आता श्रीलंकेतून भारतीय साखर (Wheat), गहू पीठ (Wheat Flower), तांदूळ (Rice), काळी मिरची आणि ईलायचीला मागणी घटली. श्रीलंकेत दर महिन्याला ४० ते ५० हजार टन साखरेचा वापर होतो. यापैकी जवळपास ९० टक्के भारतातून आयात केली जाते. यावरून भारताच्या शेतीमाल निर्यातीत श्रीलंकेचं महत्व लक्षात येतं. पण सध्या निर्यात घटली त्यामुळं इतर बाजारपेठा शोधाव्या लागतील.

खाद्यतेल ग्राहकांना दर नरमल्याचा फायदा नाहीच

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे (Edible Oil) दर कमी झाले. त्यानुसार देशातही महिनाभरात १० ते २० टक्यांपर्यंत किमती कमी झाल्याचा दावा केला जातोय. परंतु केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाच्या आकडेवारीवरून हा दावा फोल ठरतो. १४ जून ते १४ जुलै या एक महिन्यात सोयाबीन तेलाचे दर केवळ ३.४४ टक्क्यांनी कमी झाले. तर सूर्यफुलतेलाचे (Sunflower Oil) भाव फक्त ४ टक्क्यांनी नरमले. मोहरी तेल २.१६ टक्के तर भुईमूग तेलाच्या दरात नगण्य घट झाली. पामतेलाचे दर मात्र ९ टक्क्यांनी नरमले. पामतेल वगळता इतर खाद्यतेलाचे दर किरकोळ प्रमाणात कमी झाले. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात दरात घट होऊनही ग्राहकांना दिलासा मिळाला नाही.

भारताचे कापूस उत्पादन १२ टक्क्यांनी वाढणार

गेल्या हंगामात कापसाचे दर विक्रमी पातळीवर पोचले होते. त्यामुळं २०२२-२३ मध्ये कापूस लागवड आणि उत्पादन वाढीचा अंदाज होता. युएसडीनंही जागतिक कापूस उत्पादन ३.३ टक्क्यांनी वाढून १५३.७ दशलक्ष गाठींचा अंदाज दिलाय. एक कापूस गाठ १७० किलोची असते. भारतात मात्र १२ टक्क्यांनी उत्पादन वाढून ३५.२ दशलक्ष गाठींवर पोचेल, असा अंदाज वर्तविला. तर अमेरिकेत चालू हंगामात शेतकऱ्यांना ९२ सेंट प्रतिपाऊंड दर मिळाला. तो पुढील हंगामात ९५ सेंटपर्यंत राहील, असंही युएसडीएनं म्हटलंय. मात्र कापूस उत्पादनवाढीचा अंदाज आल्यानंतर बाजारात कापसाचे दर नरमले. इंटरनॅशनल काॅटन एक्सचेंजवर कापसाचा दर गेल्या दहा महिन्यांतील निचांकी पातळीवर पोचला. कापसाला सरासरी ९४ सेंट प्रतिपाऊंड दर मिळतोय.

Sugar
Wheat Export : सोळा लाख टन गहू निर्यातीचा मार्ग मोकळा

गहू निर्यातबंदीचा बांगलादेशलाही बसतोय फटका

भारताने २०२१-२२ मध्ये ७० लाख टन गहू निर्यात केला. त्यापैकी जवळपास ५० टक्के निर्यात बांगलादेशला झाली. बांगलदेशला वर्षाला ६२ लाख टन गव्हाची गरज असते. बांगलादेशला भारताकडून गव्हाची आयात करणं परवडतं. कारण वाहतूक रस्त्यामार्गे होत असल्यानं खर्च कमी येतो. पण भारतानं गहू निर्यातबंदी केलीये. त्यामुळं बांगलादेश इतर देशांकडून गहू खरेदीचा प्रयत्न करतोय. त्यासाठी निविदाही काढल्या. मात्र काही निर्यातदारांनी ४७६ डॉलर प्रतिटनाने गहू देऊ केला. हा दर भारतीय गव्हापेक्षा जास्त आहे. त्यामुळं बांगलादेशनं ही निविदा रद्द केली. म्हणजेच भारताच्या गहू निर्यातबंदीचा बांगलदेशला फटका बसतोय. तसचं देशातही गव्हाचे दर हळूहळू वाढत आहेत.

देशात सोयाबीन पेरणीची मुसंडी

देशात जून महिन्यात पाऊस कमी होता. त्यामुळं सोयाबीनसह तेलबिया पिकांची लागवड रखडत सुरु होती. अगदी मागील शुक्रवारपर्यंत देशात सोयाबीनची लागवड (Soybean Cultivation) गेल्यावर्षीपेक्षा जवळपास २८ टक्क्यांनी कम होती. मात्र मागील आठवडाभरात देशात सर्वत्र पाऊस झाला.

पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी लागवडी उरकल्या. १४ जुलैपर्यंत तेलबिया पिकांचा पेरा मागीलवर्षाच्या तुलनेत साडेसात टक्क्यांनी अधिक झाला. आत्तापर्यंत देशात १३४ लाख हेक्टरवर तेलबिया लागवड (Soybean Cultivation) झाली. तर मागीलवर्षी याच काळातील लागवड १२५ लाख हेक्टरवर झाली होती.

सोयाबीनची लागवड (Soybean Cultivation) मात्र यंदा १० टक्क्यांनी वाढली. मागील हंगामात ९० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाल होता. मात्र यंदा ९९ लाख हेक्टरक्षेत्र सोयाबीनखाली आले. राज्यनिहाय विचार करता १४ जुलैपर्यंत महाराष्ट्रात ३ लाख हेक्टर अधिक पेरा झाला. राज्यात ४१ लाख हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली. तर मध्य प्रदेशात सोयाबीन लागवडीत ६.७ लाख हेक्टरने वाढ झाली. तेथेही जवळपास ४१ लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आले.

तसचं राजस्थानमध्ये ४ लाख हेक्टरची वाढ होऊन १० लाख हेक्टरवर पेरा झाला. मागील हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळाला. त्यामुळे यंदा पेरा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मागील आठवड्यात देशभरात पेरणी वेगाने झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असलेला पेरा एकाच आठवड्यात १० टक्क्यांनी अधिक झाला. त्यामुळं देशात सोयाबीनचा पेरा आणखी वाढू शकतो, असा अंदाज आहे. मात्र सोयातेल आणि सोयापेंड बाजारातील स्थिती पाहता सोयाबीन (Soybean) दर साडेपाच हजारांच्या दरम्यान राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com