
१) सोयाबीन दरात सुधारणा (Soybean Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे काहीसे कमी झाले होते. तर सोयापेंडचे (Soyameal) वायदे सुधारले होते. सोयाबीनचे वायदे १५.२९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४९८ डाॅलर प्रतिटनांवर पोचले.
देशातील सोयाबीन दरात आज क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळाला. देशात सोयाबीनचे दर सुधारण्यासाठी पोषक स्थिती आहे, असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.
२) कापूस बाजारात चढ उतार (Cotton rate)
देशातील बाजारात कापूस दरात चढ-उतार होत आहेत. आज कापसाला सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांमध्ये साडेतीन टक्क्यांची वाढ झाली होती.
कापूस वायदे ८५ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. देशात सध्या कापसाचे दर दबावात असले तरी पुढील काही दिवसांमध्ये दर वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) तुरीचे दर तेजीत (tur rate)
देशात तुरीची काढणी वेगानं सुरु आहे. पण शेतकरी तुरीची लगेच विक्री करताना दिसत नाहीत. त्यामुळं तुरीचे दर सध्या तेजीत आहेत. आजही तुरीच्या दरात क्विंटलमागं ५० रुपयांची सुधारणा दिसली.
आज तुरीला सरासरी प्रति क्विंटल ७ हजार ४०० ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. शेतकरी सध्या तुरीची विक्री टप्प्याटप्यानं करत आहेत. त्यामुळं दर टिकून राहतील, असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
४) द्राक्षाला कमी भाव
राज्यात सध्या द्राक्षाची काढणी सुरु झाली. द्राक्ष निर्यातही होत आहे. पण द्राक्षाला यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच अपेक्षित दर नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. सध्या निर्यातीच्या द्राक्षाला किलोला ७० रुपयांपर्यंत दर मिळतोय.
तर स्थानिक बाजारात प्रतिक्विंटल ४ हजार ते ६ हजार रुपये भाव मिळतोय. यामुळं द्राक्ष उत्पादक अडचणीत आले आहेत. यापुढील काळात द्राक्षाची आवक वाढेल. पण दरात जास्त नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे, असा अंदाज द्राक्ष व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
५) सोयाबीनवर आणखी दबाव वाढेल का?
केंद्र सरकारनं यंदा खाद्यतेल आयातीला पायघड्या घातल्या. सरकारनं खाद्यतेल आयातीवरील शुल्क कमी केलं. त्यामुळं आयात स्वस्त झाली. पामतेल स्वस्त झाल्यानंतर देशात आयात वाढली. तसचं रशिया आणि युक्रेनमध्ये युध्दामुळं सूर्यफुल तेलाचे साठे मोठ्या प्रमाणात होते.
नव्या हंगामातील गाळप करण्यासाठी हे साठे कमी करणं गरजेचं होतं. रशिया आणि युक्रेननं हे साठे कमी करण्यासाठी सूर्यफुल तेलाचे दर कमी केले. त्यामुळं भारतात सूर्यफुल तेलाची विक्रमी आयात झाली.
पामतेल आणि सूर्यफुल तेल स्वस्त झाल्यानं सोयाबीन तेलावरही दबाव आला होता. त्यामुळं सोयाबीन तेलाचीही आयात वाढली. खाद्यतेलाचे दर कमी झाले. त्यातच केंद्र सरकारनं आयातशुल्क कमी केलं. त्यामुळं देशात विक्रमी साठे तयार झाले.
सध्या देशात ३५ लाख टन खाद्यतेलाचा साठा आहे. मागील वर्षी याच काळात देशातील साठा १८ लाख टन होता. म्हणजेच सध्या जवळपास दुप्पट स्टाॅक आहे. याचा दबाव देशातील सोयातेलावर आला. देशातून सोयापेंडची निर्यात वाढली.
त्यामुळं दोन आठवड्यांपासून सोयाबीन दरात ३०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. मात्र सोयातेलाचे दर दबावात असल्यानं दरवाढीला जास्त आधार मिळताना दिसत नाही. पण आंतरराष्ट्रीय बाजारात आता खाद्यतेलाचे दर वाढत आहेत.
तसचं केंद्र सरकार आयातशुल्क वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळं खाद्यतेलाच्या दरात वाढ होईल आणि सोयाबीनच्या दरालाही आधार मिळेल, असं अभ्यासकांनी सांगितलं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.