
१) सोयाबीन बाजारावर दबाव (Soybean Market)
देशातील बाजारात सोयाबीनचे भाव दबावात आहेत. बाजारातील आवक आणि खाद्यतेलाच्या दरातील नरमाई यामुळं सोयाबीन बाजारावर दबाव आहे. चालू आठवड्यात देशातील बाजारात दैनंदीन १ लाख ७० हजार ते २ लाख क्विंटल आवक होती. तर सोयाबीनला सरासरी ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० रुपये दर मिळतोय.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे १४.०९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तसेच सोयापेंडचे वायदे ४२८ डाॅलर प्रतिटनांवर पोचले. सोयाबीन बाजारावर काही दिवस दबाव राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
२) कापूस दरात नरमाई (Cottom Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. वायद्यांनी ८१ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. तर देशातील बाजारात कापूस दबावातच आहे. कापसाची दैनंदीन आवक आजही एक लाख गाठींपेक्षा अधिक होती.
त्यामुळं दरपातळी ७ हजार ८०० ते ८ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होती. देशातील बाजारात आवक असल्यानं दर कमी आहेत. पुढील काळात आवक मर्यादीत झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) कांदा भाव पडलेलेच (Onion Rate)
बाजारातील कांदा आवक सध्या अधिक दिसते. राज्यातील काही भागांमध्ये पाऊस होत आहे. यामुळं शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतोय. महत्वाच्या बाजारांमध्ये आवकेचा दबाव वाढत आहे. त्यामुळं कांद्याचे दरही काहीसे नरमले आहेत.
सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ६०० ते ८०० रुपयांचा भाव मिळतोय. पुढील काही दिवस बाजारातील कांदा आवक कायम राहून दरपातळी दबावातच दिसू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
४) कैरीला चांगला उठाव
आंब्याचा हंगाम सुरु झाल्यानंतर लोणचं तयार करण्यालाही सुरुवात होते. त्यामुळं कैरीला मागणी असते. बाजारात हळूहळू आंबा आणि कैरी आवक वाढत आहे. कैरीला उठावही चांगला मिळतोय. त्यामुळं कैरीचे भाव प्रतिक्विंटल २ हजार ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.
पुढील काळात बाजारातील कैरी आवक आणि मागणी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळं दर टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
५) तुरीच्या दरात वाढ होईल का? (Tur Rate)
तुरीच्या बाजारात सध्या काहीसे चढ उतार सुरु आहेत. पण सरासरी दरपातळी कायम आहे. सरकार अन्नधान्यसह खाद्यतेलाचे दर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील वर्षातील निवडणुकांच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन सरकारच्या हालचाली सुरु झाल्या.
सरकार तुरीच्याबाबतीत एवढं आक्रमक झालं की अगदी जिल्हा पातळीवरही त्याचा आढावा घेतला जातोय. जिल्हाधिकारी आपल्या क्षेत्रातील गोदामे, प्रक्रिया उद्योग आणि व्यापारी संस्थाकडे जाऊन पाहणी करून सहानिशा करत आहेत.
सरकारच्या या भुमिकेमुळे व्यापारी आणि प्रक्रियादार गरजेप्रमाणं काम करत आहेत. डाळीला मागणी येते त्या प्रमाणात प्रक्रिया केली जातेय. पण बाजारातील आवकच कमी असल्यानं याचा दरावर परिणाम जाणवत नाही. सध्या बाजारातील आवक मागणीपेक्षाही कमी आहे.
प्रक्रिया उद्योगांनाच गरजेप्रमाण तूर मिळत नाही. तसचं तुरीची डाळही हातोहात विकली जात असल्याचं प्रक्रियादारांनी सांगितलं. परिणामी स्टाॅकिस्टना तूर मिळत नाही. पण सरकारच्या धोरणामुळं वाढीव दरात खरेदीचीही हिम्मत दाखवली जात नाही.
सध्या तुरीला सरासरी ८ हजार ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारात कमी आवक, वाढलेली मागणी आणि मर्यादीत आयात दिसते. त्यामुळं पुढील काळातही तुरीच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.