
१) सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा (Soybean Rate)
देशातील बाजारात कालपासून सोयाबीन दरात काहीशी सुधारणा झाली होती. सोयाबीनचे किमान दर अनेक बाजारांमध्ये ५ हजार रुपयांच्या दरम्यान पोचले होते. तर सरासरी दर ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होता.
प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार ३०० ते ५ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान होते. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात कहीशी नरमाई दिसून आली.
सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत १४.२७ डाॅलरवर होते. पुढील काही दिवस सोयाबीन बाजारात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) कापूस बाजार जागचा हालेना (Cotton Rate)
देशातील बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार दिसत आहेत. आज कापसाचे भाव काहीसे नरमले होते. अनेक बाजारांमधील किमान दरात आज नरमाई दिसली. तर सरासरी भावपातळी ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे कमी होऊन दुपारपर्यंत ८१.६२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील बाजारातील कापूस आवक सरासरीपेक्षा जास्तच दिसते. त्यामुळं दरावर दबाव असल्याचं जाणकार सांगतात.
३) सरकारची गहू खरेदी उद्दीष्टाकडे (Wheat Market)
केंद्र सरकारची हमीभावाने गहू खरेदी वाढत आहे. केंद्र सरकारने ७ मे पर्यंत जवळपास २४७ लाख टन गहू खरेदी केला. मागील हंगामात याच तारखेपर्यंत केवळ १७५ लाख टनांची खरेदी झाली होती. यंदा केंद्राने ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवले आहे.
यापैकी ८५ टक्के खरेदी पंजाब, हरियाना आणि मध्य प्रदेशात करण्याचं उद्दीष्ट होतं. ते साध्या झालं. पण उत्तर प्रदेशात खेरदी २२ टक्क्यांनी कमी झाली. खुल्या बाजारात गव्हाचे दर सुधारल्याचाही परिणाम सरकारच्या खरेदीवर जाणवत आहे. गव्हाचे भाव पुढील काळात आणखी सुधारणा दाखवू शकतात, अशा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
४) बाजारात उडिदही खातोय भाव (Urad Rate)
सध्या बाजारात उडादाचे भाव तेजीत आहेत. रब्बी हंगामातील नवा उडीद बाजारात विक्रीसाठी येत आहे. पण उत्पादनासाठी मुख्य हंगाम असलेल्या खरिपात यंदा उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळं रब्बीतील उडदालाही चांगला भाव मिळत आहे.
सध्या उडदाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. यंदा देशात उडदाचा पुरवठा कमी आहे. पण मागणी चांगली आहे. त्यामुळं उडदाचे भाव पुढील काळातही तेजीतच राहण्याचा अंदाज व्यापारी आणि जाणकार व्यक्त करत आहेत.
५) खुल्या बाजारात हरभऱ्याला काय भाव मिळतोय? (Chan Rate)
नाफेडच्या हरभरा खरेदीचा वेग मागील चार दिवसांपासून कमी झाला. या काळात नाफेडने देशभरात केवळ दोन लाख टनांच्या दरम्यान हरभरा खरेदी केल्याचं दिसतं. नाफेडने चालू हंगामातही हरभऱ्याची चांगली खरेदी केली. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पण नाफेड गेल्यावर्षीएवढा म्हणजेच २६ लाख टनांपर्यंत खरेदी करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
पण नाफेडच्या खरेदीचा वेग कमी झाला. तसेच अनेक केंद्रांवरील खेरदीही बंद झाली आहे. त्यामुळं यंदाही विक्रमी खेरदीची शक्यता मावळल्याचं दिसतं. नाफेडने आतापर्यंत देशभरात १७ लाख ९१ लाख टनांची खरेदी केली. यापैकी महाराष्ट्रात ६ लाख ३२ हजार टनांची खेरदी झाली.
तर मध्य प्रदेशात जवळपास ६ लाख टन आणि गुजरातमध्ये तीन लाख टनांची खरेदी झाली. म्हणजेच या तीन राज्यांतच १५ लाख ३२ हजार टनांची खरेदी झाली. तसचं ही तीन्ही राज्ये हरभरा उत्पादनात महत्वाची आहेत.
नाफेडची खेरदी चांगली झाली तरी खुल्या बाजारातील दराला आधार मिळताना दिसत नाही. बाजारातील आवकही मर्यादीत होत असल्याचं व्यापारी सांगत आहेत.
सध्या हरभऱ्याचे भाव ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान कायम आहेत. हरभरा बाजारात पुढील काही काळ स्थिरता दिसू शकते, असा अंदाज सध्याच्या परिस्थितीवरून जाणकारांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.