
१) कापसाची आवक वाढती (Cotton Rate)
देशातील बाजारात कापसाची आवक वाढतच आहे. रोज एक लाख गाठींच्या दरम्यान कापूस आवक होत आहे. शेतकरी पावसाच्या आधी कापूस विक्रीची घाई करत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यामुळे कापसाचे भावही दबावात आले.
सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ४०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील कापूस आवक आणि दरावरील दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) सोयाबीनचे भाव नरमले (Soybean Rate)
सोयाबीन भावावरील दबाव सध्या वाढला आहे. खरिपाच्या तोंडावर गरज असलेले शेतकरी सोयाबीनची विक्री करताना दिसत आहेत. आवक वाढत असल्याचा दबाव दरावर जाणवत आहे. देशातील बाजारात १ लाख ३० हजार क्विंटलची आवक झाली होती.
मागील दोन दिवसांपासून आवक वाढलेली दिसते. तर सोयाबीनचे भाव ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीन दरावरील दबाव पुढील काही दिवस राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) कांद्याचे दर दबावातच (Onion Rate)
वाढत्या उन्हामुळे सध्या लिंबाला चांगला उठाव मिळत आहे. त्यातच लिंबाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या वादळी पावसाचा फटका बसला. परिणामी बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी आहे.
सध्या लिंबाला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. उन्हाचा चटका कायम असेपर्यंत लिंबाला उठाव कायम राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
४) मिरची दरात काहीशी सुधारणा (Chilli Rate)
हिरव्या मिरचीचे भाव सध्या तेजीत आहेत. वाढत्या उन्हामुळे हिरव्या मिरचीची बाजारातील आवक मर्यादीत झाली. उठाव मात्र चांगला आहे. त्यामुळे मिरचीला चांगला भाव मिळत आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या बाजारांमध्ये आवक काहीशी अधिक दिसते.
मिरचीला सध्या प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. मिरचीचे भाव पुढील काळातही तेजीतच राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
५) हरभरा बाजार कसा राहू शकतो? (Chana Rate)
खरिप हंगाम तोंडावर आला तरी हरभरा भाव दबावात आहेत. मागील तीन ते चार दिवसांपासून बाजारातील आवक काहीशी वाढत आहे. हरभरा बाजार हंगामाच्या सुरुवातीपासूनच दबावात दिसतो. मागील दीड वर्ष हरभरा दराने हमीभावाचा टप्पा गाठला नाही. त्यामुळे हंगामात शेतकरी नाफेडच्या विक्रीलाच पसंती देत आहेत.
नाफेडच्या खेरदीची गतीही कमी झाली. नाफेडने मंगळवारपर्यंत २० लाख ६५ हजार टनांची खरेदी केली. नाफेडच्या खरेदीत मध्य प्रदेशची आघाडी कायम आहे.
मध्य प्रदेशात ७ लाख २७ हजार टनांची खरेदी झाली. तर महाराष्ट्रात ६ लाख ९६ हजार टन हरभरा नाफेडला विकला गेला. म्हणजेच केवळ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातच १४ लाख टनांपेक्षा जास्त खरेदी झाली. नाफेडची खरेदी यंदाही चांगली झाली. पण खुल्या बाजाराला आधार मिळाला नाही.
खुल्या बाजारात हरभरा भाव हंगामाच्या सुरुवातीपासूनच ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. नाफेडने मागील हंगामात स्टाॅकमधील हरभरा नंतर टप्प्याटप्प्याने बाहेर काढून दर दबावात ठेवले होते. यंदाही सरकार असेच करू शकते, अशी भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.
त्यामुळे चालू भाव हमीभावापेक्षा कमी असले तरी स्टाॅकीस्ट जास्त सक्रीय दिसत नाहीत. परिणामी बाजार दबावातच दिसतो. पुढील काळात हरभरा बाजार माॅन्सूनचा पाऊस आणि सरकारच्या धोरणावर अवलंबून असेल, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.