
सोयाबीन दरात काहीशी वाढ
1. देशातील काही बाजारांमध्ये सोयाबीनच्यात दरात (Soybean Rate) काहीशी वाढ पाहायला मिळत आहेत. कालपासून काही बाजारंमध्ये सोयाबीनच्या किमान दरात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली.
आजही देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजारर ५५० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ उतार पाहायला मिळत आहे.
मात्र देशातील सोयाबीनची दरपातळी पुढील काही दिवसांमध्ये वाढू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसाच्या दरात चढ उतार
2. आंतरराष्ट्रीय बाजारात काल दिवसभर सुधारणा पाहायला मिळाली. मात्र शेवटच्या टप्प्यात दरात घसरण झाली. आज बाजार सुरु झाल्यानंतर दरात चढ उतार सुरु आहेत.
तर देशातील सरासरी दरपातळी काहीशी सुधारली आहे. आज देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ३०० ते ८ हजार ६०० रुपये दर मिळाला. देशातील कापसाचे दरही पुढील काही दिवसांमध्ये सुधारण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.
लाल मिरची तेजीत
3. यंदा देशातील मिरची पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसला. त्यामुळं यंदा मिरचीचं उत्पादन घटलं. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात यंदा मिरची उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळं बाजारात लाल मिरची भाव खात आहे.
सध्या लाल मिरचीला व्हरायटीनुसरा क्विंटलला १५ हजार ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. लाल मिरचीचे दर यंदा तेजीत राहतील, असा अंदाज मिरची बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
पेरुचे दर दबावात
4. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून पेरुची आवक वाढली. मात्र थेंडीमुळं पेरुला कमी उठाव मिळतोय. बाजारातील आवक सध्या सरासरीपेक्षा कमीच आहे.
तरी पेरुला प्रतिक्विंटल २ हजार ते ३ हजार रुपये दर मिळतोय. हा दर खुपच कमी असल्याचं शेतकरी सांगत आहेत. तर थंडीचा कडाका कमी झाल्यानंतर पेरुचे दर सुधारु शकतात, असा अंदाज पेरू व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
तुरीची सरासरी दरपातळी काय राहील?
5. देशातील बाजारात सध्या नव्या तुरीची आवक वाढत आहे. राज्यातील सोलापूर, लातूर, जालना, अमरावती या बाजारांमध्ये नवी तूर येत आहे.
राज्यातील बाजारात तूर आवक वाढत असली तरी दर मात्र टिकून आहेत. भारताने मागील काही महिन्यांमध्ये आफ्रिकेतील मोझांबिक, मालावी आणि टंझानिया या देशांमधून मोठ्या प्रमाणात तूर आयात केली.
त्यामुळं या देशांमध्ये सध्या तुरीची उपलब्धता कमी आहे. तर म्यानमार देशांमधील तूर पुढील काही दिवसांमध्ये बाजारात येईल. म्हणजेच पुढील काळात भारतात म्यानमारचीच तूर आयात होण्याची शक्यता आहे. यंदा देशातील तूर उत्पादनात मोठी घट येण्याचा अंदाज आहे.
त्यामुळं भारत सरकारने तूर आयातीवर भर दिला. मागील वर्षी भारताने विक्रमी ८ लाख ६० हजार टन तूर आयात केली होती. यंदाही यादरम्यान आयातीची शक्यता आहे.
तर काही जणांच्या मते सरकार यंदा ९ ते १० लाख टन तूर आयातीसाठी प्रयत्न करेल. मात्र तरीही देशात यंदा मागणी आणि पुरवठ्यात तफावत जाणवेल. त्यामुळे यंदा देशात तुरीचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.
सध्या बाजारात नव्या तुरीमध्ये ओलावा जास्त असूनही सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. यंदा तुरीचे हा दर टिकून राहू शकतो. सरकारने बाजारात हस्तक्षेप केला नाही तर तुरीची सरासरी दरपातळी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.