
१) सोयाबीन दरात सुधारणा (Soybean Rate)
देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर सुधारत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील (International Market) तेजी आणि भारतातून सोयापेंडची निर्यात (Soya Meal Export) वाढल्याचा आधार सोयाबीन बाजाराला मिळत आहे.
सध्या सोयाबीनला (Soybean) सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे १५.२६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.
सोयापेंडचे वायदे ४९८ डाॅलर प्रतिटनावर होते. सोयाबीन दरातील सुधारणा कायम राहण्याचा अंदाज असल्याचे बाजारातील जाणकारांनी सांगितले.
२) कापूस भावात काहीशी वाढ (Cotton Rate)
देशातील बाजारात कापसाचे दर सुधारण्यास पोषक स्थिती निर्माण होत आहे. काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि युएसडीएने भारतातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी केला. तसेच देशातून कापूस निर्यातही सुरु आहे.
यामुळे कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते. सध्या कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळातही कापसाचे भाव सुधारु शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) हरभरा बाजार दबावातच
देशातील काही बाजारांमध्ये नवा हरभरा दाखल होत आहे. मात्र तरीही हरभरा बाजारभाव दबावात आहेत. दुसरीकडे नाफेड सतत स्टाॅकमधील हरभरा विकत आहे. त्याचा दबावही बाजारावर जाणवतोय.
सध्या नव्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ६०० ते ४ हजार ९५० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. त्यामुळं बाजारातील आवक वाढल्यास दराची भीस्त सरकारच्या नाफेड खरेदीवरच राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
४) कलिंगडाला उठाव वाढला
सध्या रात्री थंडी आणि दिवसा उन्हाचा चटका जाणवतोय. दुपारचं ऊन जास्तच तापत आहे. त्यामुळं उन्हाल्यात सर्वांच्या आवडच्या कलिंगडाला मागणी वाढली. सध्या बाजारात कलिंगडाचे दरही टिकून आहेत. बाजारात कलिंगला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.
पुढील काही दिवसांमध्ये उन्हाचा चटका आणखी वाढणार आहे. त्यामुळं कलिंगडाला मागणी वाढेल. दुसरीकडे बाजारातील आवकही वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळं कलिंगडाचे दर टिकून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
५) तुरीचे दर टिकतील का?
तुरीच्या दरात दोन दिवसांपासून वाढ झालेली दिसत आहे. देशात यंदा तूर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारने दुसऱ्या सुधारित अंदाजात तूर उत्पादन ३६ लाख टनांवर स्थिरावेल, असं म्हटलंय. मात्र उद्योग आणि व्यापारी देशातील तूर उत्पादन ३० ते ३२ लाख टनांच्या दरम्यान राहील, असं सांगत आहेत.
त्यातच सध्या देशात लग्न सराईचा मोसम आहे. सण आणि समारंभही आहेत. त्यामुळं तुरीच्या डाळीला उठाव मिळतोय. पण सध्या बाजारातील तूर आवक कमी आहे. त्यामुळं दोन दिवसांमध्ये क्विंटलमागं २०० रुपयांची सुधारणा दिसून आली.
बाजारात सध्या नव्या तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. तर चांगल्या गुणवत्तेच्या तुरीला कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारात ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर आहे.
बाजारातील चांगल्या गुणवत्तेच्या तुरीचा हातोहात निपटारा होत आहे. यंदा उत्पादन घटलं. आयातीतूनही पुरवठा अतिरिक्त होणार नाही. शिल्लक साठाही कमीच आहे. त्यामुळं यंदा तुरीचा बाजार शेतकऱ्यांना आधार देऊ शकतो. बाजारात तुरीची आवक वाढल्यास दर काही काळ दबावात येऊ शकतात.
पण यंदाच्या हंगामात तुरीला सरासरी ७ हजार ते ८ हजार रूपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच तुरीची विक्री करावी, असं आवाहन तूर बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.