आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत
1. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे (Soybean Rate) दर सध्या तेजीत आहेत. सोयाबीनच्या दरात मागील दोन दिवसांमध्ये वाढ झाली. मात्र देशातील बाजारात सोयाबीनचे दर (Soybean Market Rate) स्थिर आहेत. देशातील बाजारात सोयाबीनची आवकही ४ ते साडेचार लाख क्विंटलच्या दरम्यान होतेय. सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. मात्र जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
कापूस दर स्थिर
2. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाच्या वायद्यांमध्ये कापसाचे दर कमी झाले होते. तर प्रत्यक्ष खरेदीतील दर म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्स सुद्धा कमी झाला होता. मात्र देशातील बाजारात कापूस दर आज स्थिर होते. आज देशात कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. तर राज्यातील सरासरी दर ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर होते. सध्या बाजारातील कापूस आवक जास्त असली तरी सरासरीच्या तुलनेत कमीच आहे. जानेवारीत बाजारातील कापूस आवक मर्यादीत होऊन दर सुधारू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
हिरव्या मिरचीचे भाव टिकून
3. राज्यातील बाजारात सध्या हिरव्या मिरचीची आवक मर्यादीत स्वरुपात होतेय. मात्र मागील काही दिवसांपासून हिरव्या मिरचीच्या दरात काहीशी घट दिसून आली होती. सध्या महत्वाच्या बाजार समित्या वगळता मिरचीची आवक सरासरी ३० क्विंटलपेक्षा कमी होतेय. तर हिरव्या मिरचीला २ हजार ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. पुढील काळात हिरव्या मिरचीची आवक आणखी मर्यादीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळं दरात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
बाजरीचे दर तेजीत
4. देशात यंदा बाजरीच्या उत्पादनात काहीशी घट झाली होती. त्यामुळं बाजारीच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. सध्या देशातील बाजारात बाजरीची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. तर थंडीच्या काळामुळं बाजारीली मागणी चांगली आहे. परिणामी बाजाराचे दर टिकून आहेत. सध्या बाजारीला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज आहे.
देशातील तूर बाजारावर काय परिणाम होईल?
5. मागीलवर्षी सरकारने मुक्त तूर आयातीचे धोरण राबविले होते. त्यामुळे देशात तुरीची विक्रमी ८ लाख ६० हजार टन आयात झाली होती. तर देशातील तूर उत्पादनही चांगले होते. त्यामुळं बाजारात तुरीचे दर दबावात येऊन शेतकरी अडचणीत आले होते. सरकारने मुक्त आयातीला ३१ मार्चे २०२३ पर्यंत मुदत दिली होती. आता मुदत पुन्हा वाढवून २३ मार्च २०२४ पर्यंत केली. म्हणजेच जास्तीत जास्त तूर आयातीचा सरकारचा प्रयत्न असेल. पण जागतिक पातळीवर १० लाख टनांपेक्षा जास्त तूर उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे.
कारण भारत वगळता इतर देशांमध्ये आहारात तुरीचा वापर होत नाही. तुरीचा मुख्य ग्राहक भारतच आहे. त्यामुळं केवळ भारताला पुरवठा करण्यासाठीच म्यानमार आणि आफ्रिकेत तूर पिकवली जाते. पण यंदा देशातील तूर उत्पादन कमी आहे. देशात ३२ ते ३५ लाख टनांपर्यंतच उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. तर गेल्यावर्षीऐवढी आयात झाली तर देशात तुरीची टंचाई जाणवेल. त्यामुळं सरकारनं मुक्त आयातीला मुदतवाढ दिली तरी तुरीला चांगला दर मिळू शकतो. सध्या तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. हा दर टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.