
१) कापूस दरात सुधारणा (Cotton Rate)
देशातील बाजारात कापूस दरात सुधारणा होत आहे. अनेक बाजारांमध्ये किमान दर आत ८ हजार रुपयांच्या दरम्यान पोचले. तर काही बाजारांमधील कमाल दर ८ हजार ८०० रुपयांपर्यंत पोचले. हा दर कमी मालाला मिळत असला तरी यातून दराची कमाल पातळी कळते.
आज देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील कापूस आवक (Cotton Arrival) आणखी कमी होईल. त्यामुळे दरवाढ कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) सोयाबीन बाजार स्थिरावला (Soybean Market)
सोयाबीन बाजार मागील दोन दिवसांपासून काहीसा स्थिरावला. बाजारातील सोयाबीन आवक सध्या कमी दिसत असली तरी सरासरीपेक्षा जास्त आहे.
देशातील मोठ्या बाजारपेठांमध्ये आवक अधिक आहे. तर सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे.
देशातील बाजारात सोयाबीनला मागणी आहे. तर शेजारच्या देशांकडून सोयापेंडला मागणी मिळतेय. त्यामुळे पुढील काळात सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) बाजरीला चांगला उठाव (Bajara Rate)
देशातील बाजारात सध्या बाजरीची आवक कमी आहे. महत्वाच्या बाजारांमध्ये सरासरी आवक घटल्यानं दर टिकून आहेत. यंदा देशातील बाजरी उत्पादनही सरकारच्या अंदाजापेक्षा कमी आहे. त्यातच कोरोनानंतर बाजरीला चांगला उठाव मिळतोय.
त्यामुळं बाजारीला सध्या प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ७०० ते ३ हजार ५०० रुपयांचा दर मिळतोय. बाजरीला पुढील काळातही उठाव राहून दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
४) वांग्याचे दर वाढले
राज्यातील बाजारात वांग्याची आवक घटली आहे. मागील आठवड्यात पावसाचा अनेक भागातील भाजीपाला पिकांना फटका बसला होता. त्यामुळं बाजारातील आवकेवर परिणाम झाला. सध्या पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या बाजारांमध्ये आवक काहीशी अधिक दिसत असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे.
त्यामुळे वांग्याला प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते २ हजार २०० रुपये दर मिळतोय. वांग्याची मागणी आणि दर पुढील काळातही टिकून राहील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
५) सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? (Onion Rate Update)
राज्यातील महत्वाच्या बाजारांमध्ये कांदा आवकेचा (Onion Arrival) दबाव सध्या कमी दिसतो. लाल कांद्यानं यंदा शेतकऱ्यांना पुरतं अडचणीत आणलं. सरकारच्या अनुदानासाठी ३१ मार्चपर्यंत कांद्याचं पॅनिक सेलिंग झालं. पण सध्या मार्चच्या तुलनेत कांदा आवक अनेक बाजारात निम्म्यावर आली.
आता बाजारांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढत आहे. पण राज्यातील अनेक कांदा उत्पादक पट्ट्यात पावसाचा फटका बसतोय. तर रोगांमुळेही नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १ हजार रुपये भाव मिळतोय.
यंदा रब्बी कांद्याची लागवड बऱ्यापैकी आहे. तसचं राज्यात कांद्याला फटका बसत असला तरी इतर राज्यांमध्ये क्षेत्र वाढल्यानं बाजारात नेमका किती पुरवठा होईल, हे आताच सांगता येणार नाही. हरियाना, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात मागील दोन वर्षांपासून कांदा लागवड वाढत आहे.
कांद्याचा शाश्वत पुरवठा व्हावा यासाठी सरकारने कांदा लागवडीला प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे देशातील कांदा लागवड आणि पुरवठा अधिक दिसतो, असे जाणकारांनी सांगितले. यंदा लागवड काहीशी अधिक दिसत असली तरी पिकाचे होणारे नुकसान लक्षणीय आहे.
त्यामुळं सरकारच्या अंदाजापेक्षा कांदा उत्पादन कमीच राहील. तर पुढील काही दिवसांमध्ये रब्बी कांदा आवकही वाढेल. त्यामुळं दरावर दबाव राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.